कृष्णजन्म -

 

  कृष्णजन्म -

`` तुला गिळणारा काळ लवकरच जन्माला येईल दुष्ट कंसा ------!! आकाशाला भेदत गेलेल्या शब्दांमधून त्या वृद्ध ऋषींच्या मुखातून त्यांची शारिरीक पीडा आग ओकत बाहेर पडली. कंसाने घोड्याऐवजी त्याच्या रथाला त्या वृद्ध ऋषींना जुंपलं होतं. ------ का? तर ते कंसाच्या जुलमी सत्तेचा पुरस्कार करत नव्हते. कंसाच्या अन्यायी राजवटीचा निषेध करत होते. अहंकाराने अंध झालेल्या, मत्सराने माजलेल्या रेड्यासारख्या कंसाला ही गोष्ट मंजूर नव्हती. त्रिखंडात कंसाचा जयजयकार झाला पाहिजे. त्रैलोक्यात कंसाचाच उदोउदो ऐकू आला पाहिजे. सर्वत्र कंसाच्याच पराक्रमाचे पवाडे गायले गेले पाहिजेत अशी सक्ती जेथे होती तेथे कंसाचे वाभाडे काढायची हिम्मत! कंसाची निर्भर्त्सना करण्याची ही धमक! कंसाला जाब विचारण्याचं हे धैर्य! अशक्य!! कंसाने त्या म्हातारड्याला थेट आपल्या रथालाच जुंपल. सर्व विश्वातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून कंसाविषयी गौरवोद्गार काढणं ज्यांना मंजूर नव्हतं असे अनेक ऋषी त्याच्यासोबत कंसाचा रथ ओढत होते. कंसाने घोड्याच्या पाठीवर ओढावा तसा काडकन आसूड त्या वृद्धाच्या अंगावर ओढला. `विनाशकाले विपरीत बुद्धिः' काळ जवळ आला की माणसाची बुद्धी सरळमार्ग आचरता वाकड्या वाटेने जायला लागते. जे करायला नको नेमकं तेच करते. माणूस नको नको त्या चुका मोठ्या आत्मविश्वासाने बिनदिक्कत करतो. कंसानेही केल्या.  हातातील काठी सुटताच ती जशी खाली गळून पडावी तसा म्हातारा ऋषी भूमीवर कायमचा कोसळला. ज्या धरणीवर कोसळाला त्या धरणीने त्याची पीडा कायमची शांत केली. पण भूमीवर सांडलेली त्याची ती असह्य पीडा भूमीत झिरपत झिरपत असंतोषाच्या वृक्षाच्या रूपाने बहरून आली. त्याला फुटलेल्या प्रत्येक पानातून, प्रत्येक पारंबीतून स्पंदनासारखे शब्द उमटत होते, -

`` तुला गिळणारा काळ लवकरच जन्माला येईल दुष्ट कंसा ------!!

`` तुला गिळणारा काळ लवकरच जन्माला येईल दुष्ट कंसा ------!!

`` तुला गिळणारा काळ लवकरच जन्माला येईल दुष्ट कंसा ------!!

मथुरेच्या लोकतंत्राचा पंतप्रधान असलेल्या उग्रसेनाला तेंव्हाच्या सैन्यप्रमुखाने, कंसाने बंदिखान्यात बंद केले. उग्रसेन आणि कंस ह्यांच्यातील पिता-पुत्राचे नाते त्या दिवशीच संपले. एक राजबंदी तर दुसरा हुकुमशहा! सत्तालोलूपतेतून एका नवीन संबंधाचा उदय झाला.  एक प्रजासत्ताक राज्य एका हुकुमशहाच्या ताब्यात गेले. कंसाची मनमानी चालू झाली. राजा हा प्रजेच्या सम्पत्तीचा उपभोगशून्य मालक असतो हे विसरून कंसाने प्रजेच्या संपत्तीची स्वतःच्या मौजमजेसाठी अक्षरशः धूळधाण सुरू केली. अनेक अत्यावश्यक गोष्टींवरही जबरदस्त कर लावले. दुध, दही, लोणी ह्या अत्यावश्यक गोष्टींवरचे कर वाढवले. कंसाचे पाळीव गुंड दूध, दही, लोणी फुकटात कोणाकडूनही लाटू लागले. बळजबरीने कोणाच्याही संपत्तीवर अधिकार सांगू लागले. अत्याचारांपुढे तोंड उघडायला कोणी धजावत नव्हते.

 पाण्याच्या प्रचंड दबावाखाली वाळू आणि मातीही दबून दबून दबून त्याचा संगमरवर तयार होतो. तर पृथ्वीच्या पोटातील प्रचंड उष्णता आणि असह्य दबाव सहन करून कोळशाचाही हिरा बनतो. त्याचप्रमाणे जनअत्याचार मनात दबत दबत एका असंतोषात बदलत होता. असंतोषातून एक सुंदर संगमरवरी समाजशिल्प आकाराला येणार होतं. पृथ्वीच्या पोटात डोळे दिपवून टाकणार्‍या तेजाचा एक लखलखता हिरा जन्म घेत होता.

`एक म्हातारा माझं काय वाईट करू शकणार आहे?' असं कंसाला वाटल असाव. पण सर्वत्र पसरलेल्या निःशब्द शांततेत त्याचे ते शब्द सर्वांच्याच मनातला अंगार फुलवत गेले. किंबहुना सार्‍या जनतेच्याच मनातील आग, संताप, क्षोभ, तळतळाट जणु त्या एका ऋषीच्या मुखातून आग ओकत बाहेर पडला होता. सर्वांच्याच मनात दबलेले शब्द त्या महर्षीच्या मुखात एकवटले गेले. बर्हिगोल भिंगावर पडणारे किरण जसे मध्यभागी एकवटून त्याच्या समोर येणारा पदार्थ जाळून टाकतात त्याप्रमाणे हजारो हजारो जनांची एकत्रित झालेली मने कंसाच्या ध्वंसासाठी एकवटली होती. त्याची जुलमी सत्ता उलथवण्यासाठी आसुसली होती. वाट बघत होती.

हातात त्रिशूळ घेऊन महिषासुराला मारण्यासाठी सज्ज झालेल्या महिषासुरमर्दिनीचं रूप अजून वेगळं काय असतं? ते जनाजनातून प्रकट होतं असतं. जनता-जनार्दनरूपी सिंहावर आरूढ झाल्यावरच ह्या महिषासुरमर्दिनीला शत्रूवर झेपावण्याचं तेज प्राप्त होतं.

जनमानसात वणव्यासारखी पेटत जाणारी अन्यायाची टोकाची चीड, जनसामान्यांवर होणार्‍या जुलमाविरुद्ध ठामपणे पाय रोवून उभे राहण्याचे हृदयात अंकुरीत होणारे धाडस आणि ह्या प्राप्त झालेल्या धैर्याचे रूपांतर कृती करण्यासाठी पेटून उठण्यात होणे अशा ह्या तीन `टोका'च्या क्रियांचा त्रिशूळ मरणभयही दूर करतो. हा त्रिशूळ लाभल्याशिवाय महिषासुरमर्दिनी शस्त्रसज्ज होत नाही. अन्यायाविरुद्ध आघात करायला सज्ज झालेल्या जनसमुदायाची गदा महिषासुरमर्दिनीला लाभावी लागते. जनताजनार्दनाच्या ताणलेल्या हृदयाच्या प्रत्यंचेतून जुलमी राज्यकर्त्याच्या हृदयाचा वेध घेणारा टणत्कार जेंव्हा आकाश भेदून जातो तेंव्हाच जय मिळवून देणारे विजय धनुष्य महिषासुरमर्दिनीला लाभते.

आकाशवाणी होते का नाही हे मला माहीत नाही. पण जेंव्हा प्रत्येक मना मनाच्या अवकाशात एकच गोष्ट, एकच विचार, एकच निश्चय झंकारत राहतो, घुमत राहतो तेंव्हा समाजरूपी मनाच्या असीम आकाशातही तो एकच एक सामुदायिक प्रतिध्वनी समद्राच्या गाजेसारखा घुमत राहतो. एकच साद सर्वांना घातली जाते, `उत्तिष्ठत! जाग्रत!---उठा! -- जागे व्हा!  मुर्दाडासारखे क्लेश सहन करू नका.' आणि मना मनातून एकच प्रतिसाद येत असतो, ``निश्चय झाला आहे. आणि ठरवलेले होणारच.'' ------ तीच आकाशवाणी!

कंस आपल्या बहिणीच्या देवकीच्या लग्नाच्या वरातीत तिच्या रथाचं सारथ्य करतांनाच आकाशवाणी निनादली ,

`` दुष्टा, नराधमा कंसा ! देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल. ''

सर्वांच्या हृदयातील असंतोषातून एका असंतोषाच्या जनकाचा जन्म होतांना कंसाने अनुभला. हा अमूर्त असलेला असंतोष काही कालावधीतच मूर्त स्वरूपात आपल्यासमोर प्रकट होईल तेंव्हा त्याचा धगधगता जाळ किती प्रखर असेल ही तीव्र संवेदना, प्रखर जाणीव कंसांच्या पायापासून मस्तकापर्यंत शहारत गेली.   तेंव्हा मात्र कंस हादरला. घाबरला. काहीही करून ह्या बालकाचा जन्मच झाला नाही तर माझे सिंहासन अबाधित राहील असा विचार करत रथाचे सारथ्य करण्यासाठी हातात धरलेले लगाम तसेच टाकून कंसाने आपल्या कमरेचे लखलखते खड्ग उपसले आणि थेट देवकीवरच हल्ला चढवला. नाती किती तकलादू असतात नाही? आत्ता हृदयात प्रेमाचे स्थान मिळवलेला आप्त जरा जरी बाधक होत आहे असं वाटलं, प्राणापलिकडे प्रिय व्यक्तीच प्राणघातक होणार आहे असं नुसत कोणी भविष्य जरी वर्तवलं तरी त्या व्यक्तीचं स्थान इतकं ढळतं की प्राणापलिकडे जिवलग वाटणारी व्यक्ती काळसर्पाप्रमाणे भयानक दिसू लागते. मुकुटाप्रमाणे डोक्यावर घेतलेल्या नातलगाला दुसर्‍याक्षणी तुच्छ गवताप्रमाणे पायदळी तुडवायला मन मागेपुढे बघत नाही. कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो वा कोणी कोणाचा कायमचा शत्रूही नसतो. परिस्थितीप्रमाणे शत्रूत्व मित्रत्वात तर मित्रता शत्रूत्वात बदलत राहते.

 वसुदेव मधे पडला. ``अरे देवकी तुझी लाडकी बहीण आहे. ती तुझी शत्रू नाही. शत्रू आहे तो तिचा पुत्र. त्याला तू ठार मार.'' कंसाने खड्ग खाली घेतलं. देवकीला वाचवण्यात वसुदेव यशस्वी झाला. पण रथातूनच वसुदेव आणि देवकी दोघांचीही रवानगी थेट कारागृहात झाली. एकंदर कृष्णजन्माचा मार्ग निर्धोक झाला.

 तसेही चैतन्याला कोण रोखणार? घनदाट अंधार सूर्याला उगवण्यापासून का रोखू शकतो? वडवानल समुद्राला का आटवू शकतो? उधाण आलेल्या समुद्राच्या लाटा पृथ्वीला का गिळू शकतात?

---------------------------------------------

जन्मलेल्या मुलाच्या, कृष्णाच्या जन्माची नांदी ही अशा संघर्षातून झाली.   जन्मलेल्या एका जीवाला नियती जणु उधाण आलेल्या समुद्रात भिरकावून गेली. सजीव सृष्टीत ज्याने आपले इवलेसे पाऊलही उमटवले नाही त्या बालकाला जणु कड्यावरून खाईत लोटून गेली. ज्याच्या गर्भावस्थेला सुरवातही झाली नाही त्या अदृष्य गर्भाला दावानलात ढकलून गेली. त्याच्या जन्माआधीच त्याच्यावर चौक्या पहारे बसवून गेली आणि त्याही स्थितीत त्याने आपलं असामान्यत्व सिद्ध करायच आव्हान देऊन गेली. `यदा यदा हि धर्मस्य* ग्लानिर्भवति भारत अभ्युथानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।' *(जेंव्हा जेंव्हा अयोग्य, निंद्य, समाजास लांछन असेल अशा कर्माला उधाण येईल, सत्कर्म, विहित कर्म, वंद्य कर्म, योग्य काम लोकांच्या हातून होणार नाही, विस्तवावर राख साचली जावी तसं सत्कर्म विझत जाईल तेंव्हा तेंव्हा अकर्तेपणाची राख उडवून, योग्य कर्माची वाट दाखवत, संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी मी जन्म घेईन.' (येथे धर्म हा शब्द सनातन धर्म किंवा वेदांमधे सांगितलेले नीती नियम पाळणे इतकाच मर्यादित आहे. ) अशी प्रतिज्ञा करायला नियतीने भाग पाडलं.

  त्या जन्मलेल्या बालकाकडून नियतीने जणु हे शब्द वदवून घेतले. कर्तव्याचा एक प्रचंड डोंगर फोडून सर्वसामान्य जनतेसाठी वाट तयार करण्यासाठी पुढचा प्रत्येक क्षण ह्या बालकाला फक्त आणि फक्त संघर्षच करावा लागला. थेट देहत्यागाच्या क्षणापर्यंत युद्ध आणि युद्धच! `परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् --' सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांना यमसदनाला पाठवण्यासाठी  हा बालक सज्ज झाला. `सर्वप्रहरणायुध' म्हणजे सर्व दुर्जनांवर प्रहार करण्यासाठी सर्व आयुधे हातात सतत तळपत राहतील असा सज्ज झाला. शत्रूच्या मनात कायम धडकी भरेल असा सज्ज झाला. त्याला पाहून दुर्जनांना जणु काही आपला मूर्तिमंत काळ आला असं वाटावं असा सज्ज झाला.

 ज्याच्या हातातील पाञ्चजन्य शंखाचा ध्वनी ऐकून शत्रूच्या छातीत धडकी भरली, ज्याच्या कौमोदकी गदेचा महिमा शत्रूची हृदये विदीर्ण करून गेला, ज्याच्या तर्जनीवरील सुदर्शन चक्राने दुष्टांना पळता भुई थोडी केली, ज्याच्या हातातील नंदकी खड्गाने दहशतवाद्यांवरच दहशत बसवली, ज्याच्या शारङ्ग धनुष्याचा टणत्कार ऐकताच भले भले दांडगे पापीही गलितगात्र झाले, ज्याच्या शिरावर जन्माला येण्याच्या आधीपासून मृत्यू नागाच्या फण्याप्रमाणे आपली छाया धरून होता, त्या कमललोचनाच्या मुखावरील आश्वासक मंद स्मिताने आणि हातातील कल्याणकारी कमलाने अन्याय अत्याचाराखाली भरडून निघालेल्या जनतेला दिलासा दिला. लुळे, लंगडे, पांगळे, दरिद्री अशा असहाय्य लोकांना जीवन जगण्याची एक नवीन उमेद दिली. अनेक विषयात संशोधनासाठी जीवन वाहून घेतलेल्या ऋषी, मुनींना, विद्येच्या उपासकांना आपल्या कार्यासाठी भरघोस मदत मिळेल असे आश्वासन मिळाले. त्यांच्या संशोधनात कोणी व्यत्यय आणणार नाही, त्यांचा अभ्यास अव्याहत चालू ठेवता येईल असे योग्य वातावरण राहील अशी हमी मिळाली.

त्याच्या जैत्र रथाची पताका, कपिध्वजा दूरवरून जरी दिसली तरी "कृष्ण आला कृष्ण आला आमचा जीवनदाता कृष्ण आला. नीती नियमांचे पालन करणारा कृष्ण आला." असे म्हणत अत्यानंदाने उचंबळणारे सारे सज्जन, विद्वान  ऋषी, मुनी रस्त्याच्या दुतर्फा त्याला बघण्यासाठी थांबत. "स्वस्ति अस्तु स्वस्ति अस्तु -- तुझे कल्याण असो" असा मनापासून आशीर्वाद देत, कृष्ण भेटण्याची प्रतिक्षा करत. त्यांचे प्रेम पाहून कृष्णालाही गहिवरून येई. अशा ह्या जगन्नाथाचे वर्णन श्री आद्य शंकराचार्यांनी मोठे सुरेख केले आहे.  

रथारूढो गच्छन्पथि मिलित-भूदेवपटलैः

स्तुतिप्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः।

दयासिन्धुर्बन्धुः सकलजगतां सिन्धुसुतया

जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे ।। 5

( भूदेवः - ब्राह्मण। पटल  समुच्चय,राशी। )

 

रथाची पाहोनी फडकत पताकाचि दुरुनी

पथी पाहोनीया अवचित रथारूढ हरिसी

दुतर्फा मार्गाच्या थबकति द्विजांचे गण किती

करी जागोजागी स्तवन हरिचे हे ऋषिमुनी ।। 5.1

 

तया कल्याणाची करिति मनि इच्छा सकलही

तयांच्या प्रेमाने हरि गहिवरे चित्ति सहजी

द्विजांचे सार्‍या त्या नित कुशल कल्याण करिसी

करे दीनार्तांसी हरि-स्मितचि आश्वासित मनी ।। 5.2

 

गमे प्रत्येकाला जणु गवसला प्राण मजसी

मिळाला जन्माचा मजसिच सखा सर्व म्हणती

रमा रम्या नित्या करित तुजसी सोबत अशी

जगन्नाथस्वामी नयनि मम राहो तव छबी ।। 5.3

----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –