कंसवध -
कंसवध -
शत्रूला आपल्या राज्यात
येऊ देऊन तेथे त्याच्याशी लढण्यापेक्षा शत्रूच्या राज्याचे गुप्तचरांमार्फत सर्व भेद जाणून, सर्व खबरदारी घेत, शत्रूच्याच राज्यात घुसून, सर्व ताकदिनीशी शत्रूला धडा शिकवणं ही प्रक्रिया अनेक प्रसंगी जास्त झटपट आटोपणारी, हमखास यश देणारी आणि कमी नुकसानीची ठरते. आजच्या मितीला कुठलाही प्रगत देश आपल्या भूमीवर युद्ध होऊ नये ह्याचीच खबरदारी घेत असतो. युद्ध शत्रूच्या भूमीवर लढलं गेलं पाहिजे असेच सर्व प्रगत देशांचे मत असतं.
राम असो
वा कृष्ण, दोघांच्याही रणनीतीमध्ये एक कमालीचं साम्य आहे. दोघांनीही शत्रूच्या बालेकिल्यात शिरून, शत्रूच्या थेट गढीत जाऊन तेथेच त्याचा निःप्पात केला आहे. श्रीराम स्वतः राजा असले तरी 14 वर्षांसाठी राज्यत्याग करून वनवासात
आले असल्याने त्यांच्याकडे स्वतःचे असे सैन्य नव्हते. असे असूनही त्यांनी अयोध्या सोडून चित्रकूट, निमिषारण्य, दंडकारण्य अशा अनेक
दुर्गम भागातील ठिकठिकाणच्या असुरांचा वारंवार नायनाट केला.
``मी
14 वर्षांसाठी राज्याचा त्याग केला म्हणजे राजेपणाचा किंवा क्षत्रियत्त्वाचा त्याग केलेला नाही. मी राजाही आहे आणि क्षत्रियही आहे. राजाच्या कर्तव्यास अनुसरून जेथे जेथे अन्याय दिसेल तेथे तेथे मी तो दूर करीन.
खलनिर्दालन करीन.’’ अशीच श्रीरामांची भूमिका होती. कोठेही अनाठायी अहिंसेची बाजू त्यांनी घेतली नाही. श्रीरामांची प्रतिमा जेवढी सौम्य,
कधी कधीतर मिळमिळीत
वाटेल इतकी रडी उभी केली तशी ती अजिबातच नाही. उलट गंभीर आणि आक्रमकच आहे. ``पाहू पुढे काय होतं?’’ अशी बचावाची भूमिका यांनी कधीही घेतली नाही. शत्रूने चाल केली की मग आपण उत्तर देऊ म्हणून ते कधी वाट पहात बसले नाहीत. तर आपणहून अनितीविरुद्ध व्यूहरचना त्यांनी आखली आहे. वालीचा वध ही अशीच घटना आहे. वालीला असा वर होता की जो कोणी त्याच्याशी लढायला त्याच्या समोर उभा राहील त्याची अर्धी ताकद वालीला मिळेल. त्यामुळे वाली कोणाहीपेक्षा वरचढच ठरणार होता. अशावेळेला त्याच्या वरदानाला धोपटमार्गाने उत्तर देऊन चालणार नव्हते. समोरासमोर लढणे हा आत्मघात होता. अशावेळेला वालीला झाडामागून बाण मारणे गैर कृत्य नव्हते. वालीही सुग्रीवाइतकाच रामाचा भक्त होता. त्याने अंतसमयी रामाला अशा प्रकारे त्याला मारण्याचे कारण विचारले. श्रीरामांचेही वालीसोबत शत्रुत्व नव्हते. पण त्याने सुग्रीवाच्या पत्नीला पळवून नेले होते. एका विवाहित स्त्रीला असे पळवून
नेणे धर्माविरुद्ध/न्यायाच्या विरुद्ध आहे आणि
त्यासाठी शिक्षा प्राणदंड हीच आहे. हे श्रीरामांनी वालीला सांगितले. त्यालाही ते पटले. ह्याच कारणासाठी रामाने रावणालाही प्राणदंड दिला. रावणासहित
रावणाच्या दुर्वर्तनाला पाठींबा देणार्या रावणाच्या सार्या कुळालाच धुळीला मिळवलं. त्यानंतर असुरांना अशी काही दहशत बसली की पुढची हजार वर्षे तरी त्यांनी डोकं वर काढलं नाही ना त्यांना कुठल्या स्त्रीला पळवून न्यायची त्यांची हिम्मत झाली नाही. किंवा ना कुठल्या स्त्रीला पुढे करून दहशत
पसरवण्याची!
ज्या समाजात स्त्रीला
आदर आणि सन्मान मिळतो तोच
समाज सुसंस्कृत असतो. स्त्रीचा अपमान आणि विटंबना करणार्याला देहदंड मिळाल्यानेच
समाजातही त्याचा योग्य तो संदेश पोचून स्त्रियांचा अपमान करण्यास कोणी धजावत नाही.
धर्मशास्त्राप्रमाणे स्त्री वध्य नाही. आपल्या वैदिक धर्मातील ही
थोर परंपरा असली तरी ती
शत्रूंनी वैदिक धर्म पाळणार्यांच्याच विरुद्ध शस्त्रासारखी वापरायला सुरवात केली. ह्या नियमाचा
गैरफायदा वैदिक धर्म न
पाळणारे राक्षस ऋषीमुनींचा उच्छेद करण्यासाठी घेऊ लागले. ते आपल्या स्त्रियांना पुढे करून त्यांच्याकरवी आश्रमा आश्रमांमधे चाललेल्या अध्ययन अध्यापनावर टाच आणित. ऋषीमुनींना ठार मारत. आजही फार वेगळे नाही. आजही समाजकंटक त्यांच्या स्त्रियांना धरणे, आंदोलन, मोर्चा ह्यासाठी रस्ते आडवून बसवून ठेवतात. त्यांच्या अंगाला हात लावलाच तर जागतिक बोंबाबोंब करणे सोपे असते. आणि जगभरातील वृत्तपत्रेही त्या बातमीला उचलून धरण्यास सरसावून बसलेल्या असतात. पण निर्ढावलेपणाने हिंसा करायला सरसावलेली आणि हिंसा करणारी स्त्री ही पुरुषाएवढीच दोषी आहे, वध्य आहे हा कायद्यातील बदल विश्वामित्राने केला. आणि श्रीरामांनी तो अमलात आणला. त्राटिका मारली. हे काम राजवाड्यात बसून होणारे नव्हते. ते ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊनच करायला पाहिजे होते. राजा दशरथ सर्व सैन्य विश्वामित्रांच्या दिमतीला देण्यास तयार होता. पण विश्वामित्रांनी फक्त राम-लक्ष्मणांचेच सहाय्य घेतले कारण जेंव्हा त्या देशीचा राजपुत्रच अशी जरब बसवतो तेंव्हाच शत्रूला दहशत बसते. राजाची नीतीमत्ता, जनतेप्रति असलेलं कर्तव्य, योग्य परराष्ट्रनीती धोरण हे राष्ट्रस्थैर्यासाठी आवश्यक आहे. रामाकडे सैन्य नव्हते.
पण त्यावेळी विश्वामित्र आणि आश्रमवासी कुमार नक्कीच मदतीला आले असणार. जेंव्हा स्थानिक लोकांच्या सहाय्याने एखादी मंत्रणा पार पाडली जाते तेंव्हा ती यशस्वी होण्याची शक्यताही खूप असते. कारण स्थानिक बारकावे, तेथील परिस्थिती, परिसराचं ज्ञान त्यांना चोख असते. रावणाशी लढतांनाही सुग्रीव आणि वालीपुत्र अंगदाच्याच सैन्याला नेतृत्त्व देऊन श्रीरामांनी लढाई जिंकली.
रावण असो
वा कंस दोघांनाही आपण आपल्या सुरक्षित गडात शत्रूला येऊ देऊन अथवा निमंत्रित करून तेथेच त्याचा निःप्पात करणे सोयिस्कर वाटत होते. आपल्या परिचयाच्या सुरक्षित क्षेत्रात शत्रू आला की चहूबाजूने त्याला घेरून मारणे दोघांनाही सोपे, हितावह वाटत होते.
रावणाची लंका अभेद्य
होती. चहू बाजूने तिला पाणी, विषारी सर्प, अग्नी इत्यादीने युक्त असे खोल खंदक होते. तर मथुरेमधे कंसाची बळकट सत्ता होती. तो बलशाली होता. शिवाय त्याला अनेक प्रकारच्या भक्कम सुरक्षाकवचांची जोड होती. त्याला घेरून सारे मंत्री व पट्टीचे योद्धे उभे होते. कृष्णाचा काटा काढण्यासाठी मथुरेत पदोपदी त्याने व्यूह रचले होते. असे असूनही ना रावण विजयी झाला ना कंस! त्यांच्या सुरक्षा-कवचाने त्यांचीच रणभूमी संकुचित, मर्यादित झाली. सुरक्षाकवचानेच त्यांचा घात केला. माठात/ कुंभात घातलेली विविध भाजी व मसाला,
माठाचे तोंड कणकेने बंद करून,
तो उलटा मातीत पुरून,
त्याला चहूबाजूने जाळ करून ज्याप्रमाणे उबडियो नावाची भाजी
शिजवतात त्याप्रमाणे रावण आणि कंसाचा `कुंभीपाक' होऊन त्यांना मरण आले.
श्रीकृष्ण तर किशोरवयीन
12-14 वर्षाचा मुलगा. त्याच्याकडे कसले आले सैन्य? पण ज्या गोपमित्रांसोबत तो रोज खेळत होता त्यांच्या आणि कृष्णाच्या मनाचा इतका सुचारु मेळ होता की कृष्णाच्या एका इशार्यावर त्यांना काय करायचे
हे कळत होते. हे गोपबालांचे सैन्यच ऐनवेळेला कृष्णाच्या मदतीला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कंसवधाआधी झालेल्या कुस्तीच्या स्पर्धांमधे चाणुर आणि मुष्टिक ह्या मल्लांना कृष्ण बलरामांनी ठार केले तेंव्हाच पळून जाणार्या एकेका मल्लाला
पकडून गोपबाळांनी त्यांचा प्रतिकार मोडित काढला.
रामदूत हनुमानानेही खुद्द रावणाच्या लंकेत जाऊन तेथे धुमाकूळ घातला. लंका जाळली. शत्रूच्या राज्यात घुसून त्याचे वारेमाप नुकसान केले. योग्य वेळ पाहून नरसिंह खांबातून थेट हिरण्यकश्यपूच्या सभेतच प्रकट झाला. अचानक प्रकटलेल्या नरसिंहाने बेसावध हिरण्यकश्यपूचा अंत साधला. छोट्याशा बटु वामनाने बळीच्या यज्ञात जाऊनच विश्व व्यापणारी तीन पावलं भूमी मिळवली. कंसाप्रमाणे नंतर नरकासुराच्या राजधानीत शिरून द्वारकाधीशाने नरकासुराचाही अंत केला होता. श्रीकृष्ण भीम अर्जुन वेश पालटून जरासंधाच्या मगधातील राजधानीत थेट त्याच्याकडेच गेले. थेट मल्लयुद्धाचीच भिक्षा मागितली. जरासंध कृष्णाकडून वारंवार पराभूत झाला होता. त्याला कृष्णाच्या सुदर्शन चक्राची भीती होती. अर्जुनाचा पराक्रम त्याने डोळ्याने द्रौपदीस्वयंवर प्रसंगी पाहिला होता. त्यामुळे त्याला भीमासोबत लढण्यावाचून पर्याय नव्हता. त्याला तिथेच संपवून त्याने बंदिवान बनवलेल्या सर्व राजांचा पाठिंबा मिळवून मगच युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञाला सुरवात केली. आत्ता आत्ता शाहिस्तेखानाने बळकावलेल्या लाल महालात शिरूनच ही मामाची ब्याद घालवण्यात शिवाजीला यश आलं. शिवाजी शत्रूंच्याही स्त्रियांना अभय देतो ही माहिती शास्ताखानाला असल्याने तो
जनान्यात शिरला आणि थोडक्यात वाचलाही. शत्रूला
टाळण्यासाठी, शत्रूपासून स्वसंरक्षण म्हणून कितीही बंदोबस्तात बसल्याचा फारसा उपयोग होत नाही. उलट हा सारा बंदोबस्त आपल्याच नाशासाठी उपयोगी पडतो. शत्रूला कुठलीही जागा अगम्य नसते. शत्रू चाल करून येईल तेंव्हा पाहू असे म्हणून आपल्या गढीत सुसज्ज बसणार्याची सुरक्षा व्यवस्था कधी ना
कधीतरी एखादेवेळेस तरी ढिली होते. शत्रू नेमकी तेवढीच संधी साधतो. एकदा का शत्रू स्वस्थ बसणारा नाही हे लक्षात आल्यावर त्याच्या राज्यात घुसून त्याला धडा शिकवणेच श्रेयस्कर असते. त्याने शत्रूच्या संपत्तीचा, सैन्याचा मोठ्याप्रमाणात नाश करता येतो. शत्रूची भूमी, संपत्ती आणि शत्रूकडील अनमोल नररत्ने
त्यानिमित्ताने आपल्याकडे वळवता तरी येतात नाहीतर त्यांचे निर्दालन करून शत्रूला धाक तरी बसतो. रावणाच्या वधाच्या निमित्ताने बिभीषणासारखा नीतीमान मित्र श्रीरामांना मिळाला. त्याला लंकेच्या सिंहासनावर बसवल्याने दक्षिणेकडून अयोध्येला असलेला धोका कायमचा नष्ट झाला. शत्रूची भूमी, संपत्ती आणि शत्रूकडील अनमोल नररत्ने
ह्या पैकी एकाचा जरी लाभ झाला
तरी युद्ध सुफळ झाले म्हणता येईल. कधी कधी ह्या तिनही मौल्यवान गोष्टी अशा छाप्यांमधे गवसतात. आपली स्वतःची भूमी, संपत्ती मात्र अबाधित राहते.
--------------------------------------------
कृष्णाने बैलाच्या रूपातील आरिष्टासूराला ठार मारले. हीच योग्य वेळ आहे हे जाणून नारदमुनी कंसाकडे गेले. कंसाचा आदर सत्कार स्वीकारल्यावर कंसाला म्हणाले, `` कंसा, काही
वर्षांपूर्वी तू देवकीची मुले मारलीस तेंव्हा शेवटची जी मुलगी तुझ्या हातून सुटून गेली, जिने आकाशात जाता जाता `ती' शापवाणी उच्चारली, ती देवकीची मुलगी नव्हतीच. ती यशोदेची मुलगी होती. व्रजपुरीत असलेला जो श्रीकृष्ण आहे तो खरा देवकीचा पुत्र आहे तर बलराम हा रोहिणीचा पुत्र आहे. तुझ्या भीतीने वसुदेवाने गुपचुप त्या दोघांना आपल्या मित्राकडे नंदरायकडे सोपवले आहे. आत्तापर्यंत तू व्रजपुरीला पाठवलेल्या सर्व दैत्यांना त्या दोघांनीच ठार मारले.''
हे ऐकल्यावर
कंसाच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. आपल्याला फसवल्याचे लक्षात येताच तो तलवार उपसून वसुदेवावर धावून गेला. पण परत एकदा तलवार म्यान करत त्याच्या मनाने निश्चय केला की, वसुदेवाच्या देखतच आणि नंदाच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलांची हत्या झाली पाहिजे. म्हणूनच परत एकदा त्याने वसुदेवदेवकीला कारागृहात बंद केले. ज्याच्या हातून आपले मरण आहे असं देवांना वाटत आहे तो नक्की कोण हे
कळल्यावर त्याला ठार मारायला विलंब कशाला? त्याला मारायची हीच अखेरची संधी आहे. ती वाया घालवून
चालणार नाही. हा
गोकुळात आपल्याला ताकास तूर लागू देत नसेल तर त्याला मथुरेत बोलावून यमसदनास
पाठवले नाही तर तो बलाढ्य झाल्यावर कोणालाच आवरणार नाही. म्हणून कंसाने
येणार्या चतुर्दशीलाच धनुर्यागाचे आयोजन केले. आणि आमावास्येला कृष्ण, बलराम, वसुदेव, नंद ह्या सार्यांचाच
भैरवाला बळी देण्याचा निर्धार केला. त्याने लगेचच चाणूर, मुष्टिक आदि खास खास मल्लांना बोलावून रंगशाळेत कुस्ती
महोत्सवाचे मोठे आयोजन करण्यास सांगून तेथेच ह्या मुलांना ठार मारायचा आदेश दिला. माहुताला बोलावून
कुवलयापीड हत्तीचा वापर करून
कुस्तीच्या प्रवेशद्वारापाशीच ह्या दोन बालकांना ठार मारण्यास सांगितले. प्रत्येकाला
बोलावून तो आपली योजना समजावून देत होता. ह्या सर्व कंसनिष्ठांना त्याने हेही सांगितले की, देवांना वाटत आहे
की माझा वध ह्या कृष्णाच्या हातून होणार आहे. तरी सर्वांनी जेथे संधी मिळेल तेथे कृष्ण बलरामाचा
काटा काढावा. सारे
त्याप्रमाणे कृष्ण-बलरामाच्या `स्वागताची' तयारी/सिद्धता करू लागले.
नंदरायाचा
ज्याच्यावर विश्वास बसेल अशा अक्रूराला कंसाने बोलावणे धाडले. अक्रूराची त्याने
खूप स्तुती केली. ``तुमच्या
इतके उदार, दानी
कोणी नाही एक तुम्हीच आहात ज्यांना माझ्या भल्याची काळजी असते. म्हणूनच मी आपल्याला माझे सर्वात जवळचे मित्र मानतो.'' असे बोलून
अक्रूराचा विश्वास संपादन केल्यावर कंसाने खरी गोष्ट बोलायला सुरवात केली. ``अक्रूर, विष्णुच्या
भरवंशावर राहणारे हे देव, ``ही दोन्ही मुले माझ्या मृत्यूचे कारण आहेत’’
म्हणून घोषणा करीत सुटले आहेत. त्यांना ताबडतोब रथात घालून तुम्ही मथुरेला घेऊन या. धर्नुयज्ञाच्या
निमित्ताने नंदराय आणि बाकी गोपांनाही निमंत्रण द्या. कंसमहाराजांसाठी मोठ्या मोठ्या किमती भेटी घेऊन यायला
सांगा. त्यांना
ठार मारण्यासाठीच हा समारंभ आहे हे काही बोलू नका.
" अक्रूर
म्हणाला, महाराज, आपल्या डोक्यावरी
टांगत्या तलवारीसारखं असलेलं मृत्यूचं संकट टाळण्यासाठी आपण ह्या सर्व योजना आखत आहात. त्या आपल्या
विचारानुसार ठीक असतीलही पण माणसानी मनोरथांचे कितीही पूल बांधले तरी प्रारब्ध जर
प्रतिकूल असेल तर अंती कशाचाच उपयोग होत नाही. तरीही मी आपल्या आज्ञेचे पालन करीन.'' राजाने विचारो वा
ना वाचारो, राजाच्या
सचिवांनी राजाला वारंवार खरा आणि योग्य तो सल्ला देणे हे त्यांचं कर्तव्य असतं. अक्रूराने जराही
भय न बाळगता कंसाला सत्य सांगितलं.
खरं
तर माणूस मृत्यूच्या हातातील बाहुलं असतो. मृत्यू दोर धरून जसं त्याला नाचवेल तसं तो नाचतो. मृत्यू जसा असेल
तसा माणूस आपणहून वागू लागतो हेच खरं. कंसाची वेळ भरली असल्याने त्याने आपणहून आपल्या
श्रीकृष्णरूपी मृत्यूला
बोलावणं धाडलं. मरायचीही घाई होते कधी कधी माणसाला. माणसे आपणहून
आपल्या मृत्यूचा व्यूह रचतात.
अक्रूर
व्रजपुरीस आला असता, त्याला आपल्या मधुर वाणीने कृष्णाने पुरते जिंकून
घेतले. अक्रूराला
काका असे संबोधून त्याची आपुलकीने चौकशी
केली. अक्रूर कृष्णाच्या मधुर स्वभावावर मोहित झाला. अक्रूराच्या
रूपाने कृष्ण बलरामाला मथुरेची अद्ययावत खडान् खडा माहिती देणारा अहवालच जणु हाती
आला. `अनेकजण
कंसच्या विरोधात आहेत. कंसाने वरवर जरी धर्नुयज्ञासाठी आमंत्रित केले असले
तरी त्याचा उद्देश ह्या दोन्ही बालकांना ठार करणे हाच आहे.' ह्या सोबत कितीतरी
मोलाची, अत्यंत
गुप्त माहिती अक्रूराने आपणहून कृष्णाला दिली.
जर
कंसाच्या मनात काळेबेरं असेल तर कृष्ण बलरामाला मथुरेला पाठवायलाच नको असा
नंदाने पवित्रा घेतला. कृष्ण मात्र ह्या संकटालाच संधीमधे बदलण्यास उत्सुक
होता. कृष्णाला
घेऊन नंद मथुरेला न गेल्यास कंस त्याच्या सार्या सैन्यानिशी गोकुळावर हल्ला करेल
आणि संपूर्ण गोकुळाचाच विनाश करेल. हा मोठा विनाश टाळण्यासाठी तरी कृष्णाला घेऊन मथुरेला
येणेच श्रेयस्कर असल्याचे अक्रूरानेही नंदाला पटवून दिले. श्रीकृष्णालाही
हेच पाहिजे होते. (operation Mathura) मथुरेची शल्यचिकित्सा आवश्यक होती.
कृष्ण बलराम
अक्रूरासोबत जाणार असले तरी नंद, बाकी गोप आणि कृष्णाचे सखे सवंगडी त्यांच्या आधीच मथुरेला पोचून नगरीबाहेर उपवनात कृष्ण-बलरामाची वाट बघत थांबणार होते. मथुरेजवळच्या त्या उपवनापाशी पोहचल्यावर श्रीकृष्ण गोड हसत म्हणाला, ``काका! आपण दमला असाल. आपण विश्रांती घ्या. आम्ही दोघे येथेच उतरतो. नंदबाबांना भेटतो. नंतर आम्ही मथुरा नगरी पहायला येऊ.'' `` हे यदुराज, मी आपल्याशिवाय मथुरेत प्रवेश करू शकत नाही. आपण मला असं जायला सांगू नका. आपली पायधूळ माझ्या घराला लागावी, आपण माझ्या आतिथ्याचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे.''
``काका!
बलरामदादा आणि मी आम्ही दोघेही तुमच्याकडे येऊ.'' अत्यंत मधुर स्वरात देवकीनंदन म्हणाला, ``पण आधी ज्यासाठी मथुरेत आलो आहोत ते काम पूर्ण होऊ दे. सार्या यादवांच्या जीवावर उठणार्या ह्या दुष्ट कंसाला यमलोक दाखवला की मग सगळ्या सज्जनांना भेटायला, त्यांची सुखदुःख जाणून घ्यायला मी येईनच.'' देवकीनंदन अगदि सहजपणे बोलला. बोलतांना त्याच्या चेहर्यावरील सहजभाव आणि गोडवा पाहून अक्रूर आश्चर्यचकित
झाला. त्या गोपालकृष्णाच्या वागण्यातील माधुर्याच्या पाठीशी असलेलं ते अदृश्य पण अद्वितीय धैर्य अनुभवी अक्रूराच्या नजरेतून सुटलं नाही. `माधुर्य धैर्य सुभगं गरलाभिरामम्' असं ते हरीचं अद्वितीय रूप होतं. त्याचं मार्दव, अत्यंत गोड बोलणं, शांत स्वभाव हे महत् धैर्याच्या बळकट पायावर उभं होतं. त्यामुळेच कंसवधाच विषारी बोलणंही त्याच्या कंठात शोभून दिसत होतं.
अक्रूर मनात दचकलाच. अशा अमोघ धैर्यामुळेच त्या कृष्णचंद्राच्या चेहर्यावर विलक्षण शांतभाव व्यापून राहिले होते.
अत्यंत शांत अशी प्रभा त्याच्या मुखाभोवती पसरली होती. देवकीच्या आठव्या पुत्राची ती खूण अक्रूराच्या मनाला उमगली
अक्रूर एकदम
सुन्न झाला. पुढे काही न बोलताच गप्प बसला. मनातून मात्र अस्वस्थ झाला. गोकुलेशाचा कंसवधाचा निश्चय झालेला होता. नंदनंदनाच्या बोलण्यात कुठलाही उथळपणा नव्हता. तो जे काय बोलत होता त्यातील ठामपणा शब्दाशब्दातून व्यक्त होत होता. त्याचा अजोड आत्मविश्वास अनुभवतांना एका काठोकाठ भरलेल्या महान जलाशयाच्या किनार्यावर आपण उभे
असल्याचा भास अक्रूराला झाला. शांत गंभीर तळ्याची खोली कळत नाही त्याप्रमाणे ह्या कंसाचा
काळ होऊन आलेल्या कृष्णाच्या हृदयाचा ठाव लागणं
अवघड होतं. पुढे काय घडणार आहे ह्याची अक्रूराला पुरेपूर कल्पना आली. भयाची, असुरक्षिततेची एक थंडगार लहर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सर्वांगातून सरसरत गेली. एक खोल निःश्वास सोडत खाली मान घालून श्रीहरीचा निरोप घेऊन अक्रूर निघाला. गोकुळच्या दोन्ही बालाकांना मथुरेत घेऊन आल्याचा निरोप त्याला कंसाला द्यायचा होता.
दुस र्या दिवशी दिवसाच्या तिस र्या प्रहरी सा र्या बाळगोपाळांना घेऊन कृष्ण-बलराम मथुरापुरी पाहण्यासाठी निघाले. रेशमी वस्त्रांची आकर्षक रंगांतील सजावट, तोरणे, पताका, ध्वज विविध सुवासिक फुलांचे हार, गजरे, मनोहारी रंगाच्या पुष्पगुच्छांनी सजलेली मथुरा नगरी मोठी आकर्षक दिसत होती. मूळचं मथुरेचं वैभव आणि सौंदर्य जास्तच खुलून दिसत होतं. सारी मथुरा नगरी श्रीकृष्णाला पहाण्यासाठी उत्सुक होती. मथुरावासीयांना ज्या श्रीकृष्णाला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. तो गोकुलेश त्याच्या मित्र परिवारासह मथुरेत प्रवेश करत आहे ही वार्ता वार्यासारखी सा र्या नगरीत पसरली.
वसुदेवनंदन श्रीकृष्ण आणि बलरामासहित
सार्या बाळ गोपाळांनी
मथुरेत प्रवेश केला. ह्या यशोदानंदनाच्या बालपणापासूनच्या लीला लोकांच्या कानावर होत्याच. पुतना, शकटक, तृणावर्त, वत्सासुर, बकासुर, अघासुर, धेनुकासुर, प्रलंबासुर अशा मातब्बर दैत्यांना लोळवणारा यशोदानंदन पाहण्यासाठी लोकांची गर्दी लोटली. देवकीचा आठवा पुत्र हाच तर नव्हे? त्या उत्सुकतेपोटी नगरातील स्त्री पुरुषांनी प्रचंड गर्दी केली. आपल्या मंद, मधुर स्मिताने प्रत्येकाच्या आभिवादनाचा स्वीकार करत दोघे कुमार जात होते. बघता बघता गर्दी वाढत गेली. गर्दीत अदांधुंदी माजल्याचा फायदा घेत अत्यंत दक्ष असलेल्या ह्या बालकांनी कंसाच्या बाजूच्या अनेक रक्षकांचा आणि कंसनिष्ठांचा तेथेच काटा काढला. देवकीच्या आठव्या मुलाने मथुरेत प्रवेश केल्याची साक्ष मथुरानगरीच्या प्रवेशद्वाराला पटली.
जाता जाता
एक धोबी कपडे रंगवतांना दिसला. त्याला पाहून श्रीरंगाने त्याच्याकडे त्यांच्या मापाच्या उत्तम वस्त्रांची मागणी केली. ``वास्तविक ही झुळझुळीत रेशमी वस्त्रे आम्हालाच मिळयला पहिजे होती. आम्हीच त्याचे अधिकारी आहोत. पण तू आपणहून आम्हाला योग्य वस्त्रे दिलीस तर तुझं कल्याण होईल'' श्रीरंगाचे बोलणे मधेच तोडत तिरीमिरी आल्यासारखा तो धोबी एकदम उसळून म्हणाला, `` अरे जा जा ! मोठा आलाय अधिकारी! डोंगरदर्यात जंगलात फिरणारे
तुम्ही भटके! असे कपडे कधी पाहिले तरी आहेत का? तुमची दडपशाही आणि जंगलराज माझ्यापाशी चालणार नाही. तुम्ही जास्तच उन्मत्त आणि उद्दाम झाला आहात. अरे उद्धटांनो आता तुम्हाला राजवस्त्रांची हाव सुटली आहे काय? अरे! तुझ्यासारख्या अशा अनेक
फुकट्यांना राजाचे सेवक कैद करून, बांधून घेऊन जातात. त्यांच्याकडील सर्व धन काढून घेऊन त्यांना ठार मारून टाकतात.'' धोब्याची जीभ जरा जास्तच चुरू चुरू चालायला लागलेली पाहून थोडासा रागाचा आव आणत श्रीरंगाने धोब्याला अशी काही चपराक दिली की त्याचं मुंडकं धाडकन् जमिनीवर जाऊन पडलं. ते भयानक दृश्य पाहताच त्या धोब्याचे बाकी नोकर हातातील कपड्याचे गठ्ठे रस्त्यातच टाकून धूम पळत सुटले.
कंसाच्या राज्यात कंसनिष्ठावंतांची काहीतरी कुरापत काढणे,
आगळीक करणे नितांत आवश्यक होते. कंसाला गोकुलेश नंदनंदन नव्हे तर देवकीनंदन वासुदेव आल्याची दखल घ्यायला
नको? घ्यायला लागलीच पाहिजे. कंसा! तू बोलावल्याप्रमाणे शत्रू
आला आहे, तो बलवान आहे, तुला घाबरून दोरीला बांधलेल्या शेळीमेंढरासारखा भयभीत होऊन दबकत आलेला नाही तर रानातील हा मदमस्त गवा तुझ्याशी टक्कर देण्यासाठी खुरांनी माती उकरतो आहे. हा निसर्गाच्या
कुशीत तरबेज झालेला नरकेसरी छावा तुझ्या राज्यात शिरला आहे ते तुझ्या नरडीचा घोट घ्यायलाच! रानावनातील भरार वार पिऊन आलेली गजेद्रशावकांची ही जोडी तुला सोंडेने उचलून भिरकावून देण्यासाठी, पायाखाली चिरडण्यासाठीच मोठ्या ऐटित डुलत डुलत येत आहे. हा संदेश कंसापर्यंत जाणार होता. रामकृष्णांच्या कृतींनी पोचणार होता. कंसाच्या निष्ठावंतांना मूळापासून हलवणारा हा संदेश होता. त्याचवेळेला उन्मत्त कंसाच्या अनितीच्या वागण्याने पिचलेल्या, देवकीच्या आठव्या पुत्राची डोळ्यात प्राण आणून वाट पाहणार्या कृष्णाच्या पक्षातील लोकांना परमानंद देणारा होता.
देवकीचा आठवा पुत्र मथुरेत आल्याची ती थोडीशी चुणुक होती. अजून खरी ओळख पुढे पटणारच होती. सगळ्या गोपाळांनी आपल्याला हवी ती मापाची वस्त्रे घेतली आणि घातली. बाकी कपडे जमिनीवरच लोळत होते. त्या राजवस्त्रांमधे त्या
दोन्ही राजकुमारांचं सौन्दर्य फारच खुलून दिसत होतं. ``हा तर आमच्या देवकीचा आठवा पुत्र! नक्की देवकीचाच आठवा पुत्र! आमच्या उग्रसेन महाराजांचा नातू! त्या कोपर्यावर बसलेल्या शिंप्याचं हृदय भरून
आल! त्यांना पाहून अत्यंत प्रसन्न झालेल्या त्या शिंप्याने त्यांना बोलावून ती वस्त्र त्यांच्या मापाची करून दिली. ह्या अनंताने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अनंत प्रकारचं वैभव प्रदान केलं.
रस्त्यातून डौलात जाणार्या ह्या राजपुत्रांना पाहून सुदामा माळी बघतच राहिला. ह्यांच्याकडे पाहून वसुदेव देवकीचा भास का बर होत आहे? त्यांना रस्त्यातून जातांना पाहून सुदामा इतका भावुक झाला की त्यांना घरी आणून त्याने त्यांचे चरण धुतले. अत्यंत सुंदर गजरे, हार गुंफून ह्या दोन्ही राजकुमारांना अर्पण केले. त्यांच्याबरोबर असलेल्या बालगोपालांनाही हार घालून त्यांचा सत्कार केला. त्याचा निरोप घेऊन पुढे चाललेल्या राजकुमारांकडे पाहून त्याला राजा उग्रसेनाची दमदार चाल नजरेसमोर तरळून गेली. बल आयु कीर्ती, कांती चा वर कृष्णाने दिला.
रस्त्यावरून पुढे जात
असतांना ह्या वसुदेवसुतांना कुब्जा दिसली. कुबडी कुब्जा पहाटपासून सहाणेवर चंदन उगाळत बसली होती. कंसमहाराजांना
अंगाला लेपन करण्यासाठी चंदनाची उटी तयार करत होती. पाठीवरील कुबडाने भर तारुण्यातही सरळ उभं राहू न
शकणारी, मान
वर करून न चालू शकणारी, वाकलेली स्त्री जगाच्या नजरेत एक थट्टेचा, हेटाळणीचा विषय
म्हणून कुबडी कुब्जाच होती. आज कुब्जा गोकुळातील गोपींना वेड लावणार्या
श्रीरंगाचा विचार करत करत चंदन उगाळत होती. आणि अचानक श्रीरंगाची नजर तिच्यावर पडली आणि काही
वेगळचं घडलं, ``हे
सुंदरी, मला
पण तिलक लावलशील?''
त्या मधाळ आवाजात सर्वांकडून वाट्याला येणारा नेहमीचा उपहास नव्हता, खिजवण्याचा मागमूस
नव्हता.
कधी न जाणवलेली आपुलकी त्या शब्दाशब्दातून ओथंबून जात होती. पौर्णिमेचा चंद्र
त्याच्या शांत, शीतल
प्रकाशाने निथळत असावा असा कुबड्या कुब्जेला भास झाला. ती मोहरून आली. कृष्णचंद्रच्या आपुलकीने भारावून गेली. ``सुंदरी? कोण सुंदरी? मी?'' आजपर्यंत
स्त्रीच्या मनाचं सौंदर्य निरखणारा कोणी भेटला नव्हता. कुब्जा गहिवरली. तिने कृष्णचंद्राच्या माथी थरथरत्या हातने तिलक लावला. मोठ्या प्रेमाने
त्याच्या कोवळ्या सुनील अंगाला उटी लावली. श्रीरंगाने एक हात कुब्जेच्या पाठीवरील कुबडावर तर
दुसरा हात कुब्जेच्या कायम अधोमुख असलेल्या हनुवटीखाली ठेऊन एका पायाने तिच्या
पावलावर जरासा जोर देऊन एक छोटासा झटका दिला. वाकलेली कुब्जा सरळ झाली. कुबडाचा बाक नाहिसा झाला. वरती उचलली न जाणारी, सदा खाली झुकलेली मान ताठ झाली. कुब्जा सौंदर्यवती
झाली.
कुब्जाचा स्वतःचा स्वतःवरच विश्वास बसेना. कोण ही कुबडी
कुब्जा? मथुरा
नगरीचं प्रतिक? का
प्रत्यक्ष मथुरा नगरीच? एकेकाळी मधुरा नगरी असावी. कंसाच्या अत्याचाराचा थरार अनुभवत, थरथर कापत मथुरा
झाली असावी. मथुरेश्वराच्या
अंग-लेपासाठी
दिवस उगवायच्या आधीपासून स्वतःच्या आयुष्याचं चंदन उगाळीत बसून झिजून झिजून गेलं
असावं तिचं आयुष्य. अत्याचारांनी वाढलेल्या हताशपणाचं, न्यूनगंडाच कायमस्वरूपी
कुरूप कुबड पाठीवर घेऊन चालणार्या नगरीची मान लाचारीनी इतकी खाली गेली होती की
नजर वर करून बघायचं धाडस, हिम्मत ती हरवून बसली होती. पण आज कोणीतरी तिच्या पाठीवर हिम्मत देणारा हात ठेवला
होता. तिची
झुकलेली मान स्वाभिमानाने ताठ केली होती. तिच्यातलं न्यूनगंडाचं, परवशतेच जोखड दूर केलं होतं. अत्याचारांनी हारलेली
पिचलेली कुबडी कुब्जा झालेली मथुरा नगरी कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन होऊन
स्वाभिमनाने जणु पहिल्यांदाच ताठ उभी राहत होती. वसुदेवनंदन, देवकीनंदन आले. आता माझ्यावर असलेला दैत्यभार हलका होणार, माझं कुबड जाणार! मथुरा आनंदली. देवकीचा आठवा पुत्र आला ! फुलांच्या परिमळासोबत सार्या मथुरेत आनंदवार्ता पसरली.
आता हा बाळगोपाळांचा
जथा मथुरेच्या बाजारात पोचला. सगळे व्यापारी त्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक होते. महाराज
उग्रसेनाच्या ह्या पौत्राने तेथील
व्यापारीवर्गाचीही भेट घेतली. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही ह्याची हमी दिली.
व्यापारीवर्गातर्फे चंदन तिलक लावून पान, फूल देऊन सर्वांचं मोठ्या आपुलकीने स्वागत करण्यात आलं. ह्या
देवकीनंदनाला पाहण्यासाठी जमलेल्या स्त्रियांना तर आपल्या अंगावरील कपड्यांची, दागिन्यांचीही
शुद्ध राहिली नव्हती. त्याच्या एका मधुर मंद स्मितातच त्या विरघळून जात
होत्या.
बाळ गोपाळांसमवेत, बलरामदादासोबत देवकी नंदन नगरी पहात पहात जात असतांना
रंगशाळेत पोहोचले. तेथे
इंद्रधनुष्याप्रमाणे एक अद्भुत धनुष्य उत्तमोत्तम अलंकारांनी सजवून ठेवलं होतं. त्यावर खूप
सुवर्णमुद्रिकाही लावल्या होत्या. हार, गंधाक्षतांनी त्याची पूजा केली होती. सैन्याची एक मोठी तुकडीच
त्याच्या रक्षणासाठी ठेवली होती. चला! कंसाची आगळीक करण्याची आणि ह्या बालवीराच्या
पराक्रमाची खबर कंसापर्यंत पोचवण्याची ही उत्तम संधी होती. धनुष्य
पाहण्यासाठी गर्दी केलेल्या ह्या बाळगोपाळांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न
सारे सैनिक करत असतांनाच त्यांना न जुमानता ह्या बालकृष्णाने ते धनुष्य डाव्या
हातानेच लीलया उचललं. असं काही सहजपणे उचलून हवेमधे फेकून वरच्यावर झेललं की
सारे सैनिक अवाक झाले. धनुष्य वाकवून
सहजगत्या त्याला
दोरी बांधली आणि बाण लावून मधोमध धरून त्याची दोरी ओढताच ते अजस्त्र धनुष्य काड--कडाड आवाज करत
तुटून तुकडे तुकडे होऊन खाली पडलं. त्या
भयंकर आवाजाने सारा परिसर दणाणून गेला. सारे रक्षक ह्या बालवीराला घेरून उभे राहिले. `` अरे बघता काय? पकडा पकडा त्याला. बांधून ठेवा त्याला पळून जाऊ देऊ नका.'' एकच हलकल्लोळ
माजला. त्यांचा
मनसुबा जाणून ह्या रामकृष्णासवे सारेच बाळगोपाळ धनुष्याचेच टोकदार तुकडे उचलून
त्या रक्षकांशी लढू लागले. बघता बघता हसत हसत सार्या रक्षकांचा त्यांनी संहार
केला. ह्या
रक्षकांच्या मदतीला धावून आलेल्या सैन्य तुकडीलाही ह्यांनी खडे चारले. यज्ञशाळेच्या
मुख्य प्रवेशद्वारातून हे बाळगोपाळ आनंदाने हसत खेळत बाहेर पडले आणि
मथुरापुरीची शोभा बघत गोपालांसमवेत हिंडू
लागले. कंसाची जबर कुरापत काढून झाली होती. आतापर्यंत
देवकीच्या आठव्या पुत्राची चाहूल आणि चुणुक राजा आणि प्रजेला दिसली होती. आता धनुष्यभंग आणि एवढ्या मोठ्या संख्येने सैन्याचा
विनाश होण्यामुळे देवकीचा आठवा पुत्र मथुरेत प्रवेश करत असल्याचे जणु नगारे वाजू
लागले. कंसाला
दवंडी पिटून सांगू लागले, ``कंसा तयार हो! तुझा काळ मथुरेत आला आहे.'' प्रजाजनांनाही ह्या राजकुमारांच्या शौर्याच्या कथा
दिवसभर ऐकू येत राहिल्या. त्यांचीही
खात्री होऊ लागली की हे दोन कुमार कोणी सामान्य वीर नाहीत. कोणी अलौकिक वीर
आहेत. काही
वर्षांपूर्वीची आकाशवाणी आठवून लोक एकमेकांना ते प्रसंग वर्णन करून सांगू लागले. अनेक जण मनात
म्हणू लागले, हा
दवकीचा आठवा पुत्र तर नव्हे? लोकांचा आनंद त्यांच्या हृदयात मावत नव्हता.
सारी नगरी पाहून संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर
कंसाच्या मनात अजून काय काय शिजत आहे ह्याचा पत्ता लावून सारे बाळ गोपाळ
नगरीबाहेरील त्यांच्या डे र्यात परत फिरले. हातपाय धुवून भोजन करून गाढ झोपी गेले.
कंसाला मात्र झोप कशी यावी? दिवसभर ह्या दोन
बालवीरांच्या पराक्रमाच्याच बातम्या कानावर येत होत्या. येता येताच त्याने गर्दीचा फायदा घेऊन अनेकांचा
काढलेला काटा, धोब्याचा
शिरच्छेद, शस्त्रागारावर
नेमलेल्या मुख्य अधिकार्याचा शिरच्छेद! धडकी भरवणार्याच बातम्या होत्या. शस्त्रागारावरचा
शस्त्रांस्त्रांचा माहितगारच नसेल तर उद्या केवढा गोंधळ उडेल? --- विचार करकरून कंस
भयग्रस्त होत होता. त्यात अजून ही महाभयंकर बातमी आली.
कृष्ण बलरामाने
खेळाखेळात धनुष्य तोडलं, हसत हसत एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रक्षकांनाही
ठार मारलं, त्यांच्या
मदतीला पाठवलेल्या सैन्यालाही गमतीगमतीत धूळ चारली, हे करतांना त्यांना कुठल काम `केल' असं वाटलच नाही. हात धुवून पुसून
साफ करावे इतक्या सहज रीतीने त्यांनी कंसाचं सैन्य `साफ' करून टाकलं. हे ऐकून कंसाला घाम फुटला. कंस पुरता हादरला. अस्वस्थपणे महालात फेर्या घालता घालता आरशासमोर उभा
राहिला तर आपल्या प्रतिबिंबाला मस्तकच नाही असा भास होऊन तो तेथून घाबरून दूर झाला. झोप नसल्याने मधूनच दिव्याच्या ज्योती दोन दोन दिसत
होत्या. त्याने
गच्च डोळे
मिटले.
कानात बोटं घातली तर त्याला जाणवलं की कानात बोटं घालताच आपल्या श्वासांचा ऐकू
येणारा आवाजच गायब आहे. तो दचकला. आपण लांबवर पसरलेल्या वाळुत चालत आहोत असं वाटून
त्याने मागे वळून पाहिलं तर त्या वाळूत त्याला आपल्या पावलांचे ठसे उमटतांना दिसतच
नव्हते. जरा
डुलकी लागावी तर कसल्या कसल्या अभद्र स्वप्नांनी त्याला दचकून जाग येत होती. कंस मृत्यूभयाने पछाडला होता. वेडापिसा झाला
होता.
दुसर्यादिवशी
सूर्योदयासोबतच कुस्ती-महोत्सवाला प्रारंभ झाला. रंगभूमी फुलांच्या माळांनी सुंदर सजवली होती. वेगवेगळ्या रंगाचे
झेंडे, पताका
फडकत होते.
आम जनतेसाठी बसण्यासाठी असलेले मंचही फुलांनी सजले होते. सन्माननीय
अतिथिगणांसाठी बसण्याची यथोचित व्यवस्था होती. कंसांच्या आधीन असलेल्या मांडलिक राजांसाठी निश्चित
अशी सिंहासनांची व्यवस्था होती. तर
सर्व राजांच्या मध्यभागी अजून उंचावर मथुरानरेश कंसाचे राजसिंहासन सेनापति, शस्त्रसज्ज रक्षक
ह्यांनी बळकट होते. मल्लांना उत्साह देणारी वाद्ये वाजत होती. आखाड्यात चाणूर, मुष्टिक, कूट, शल, तोशल इत्यादी मोठे
मोठे मल्ल षड्डु ठोकत, आव्हान देत माजावर आलेल्या सांडांप्रमाणे फिरत होते. मथुरानरेश कंस
त्याच्या अग्रस्थानी असलेल्या सिंहासनावर येऊन बसला पण कालच्या सर्व प्रकारांनी
त्याचं चित्त ठिकाणावर नव्हते. तो भेदरून गेला होता.
बलराम, श्रीकृष्ण आणि
सारे गोपबाळ स्नानादि आटोपून तयारच होते. नगार्यांचा येणारा आवाज ऐकून सारेच रंगभूमीच्या
दिशेने जाऊ लागले.
पाहिले तर रंगभूमीच्या दरवाजातच हत्ती उभा करून माहुत शांतपणे हत्तीवर बसला होता. कृष्णाने आपले
पितांबर काचा मारून चांगले कसून बांधले. केसांच्या पुढे आलेल्या अवखळ बटा मागे सारल्या आणि
माहुताला हाळी घातली. ``माहुत! ए माहुत! रस्त्यातून बाजूला हो. तुला ऐकू येतयं का नाही. ताबडतोब हत्ती बाजूला घे. तुझा ढिम्मपणा सोड. आम्हाला जायला रस्ता दे. नाहीतर आत्ताच्या आत्ता तुझ्यासकट ह्या हत्तीला यमपुरीची
वाट दाखवतो.'' कृष्णाची
चिथावणीखोर अरेरावीची भाषा ऐकून संतापाने माहुताच्या अंगाची लाही लाही झाली. जणु काही शब्दांचा
अंकुश त्याच्या मर्मस्थानी अचूक लागला. डिवचला गेलेला माहूत म्हणाला, ``मला अरे तुरे
करणारा कोण रे तू चिलट! ह्या ह्या दारू पाजून मदमस्त झालेल्या कुवलयापीडाची
ताकद तुला अशी तशी कळणार नाही थांब आत्ता दाखवतो.'' माहुताने कुवलयाच्या गंडस्थळावर जोरदार अंकुशाचा
प्रहार केला. आगळीकच
काढायची होती नंदनंदनाला. कंसाच्या एकएक बलस्थानांना उचकवून हल्ला करायला
प्रेरीत करून एक एक करून टिप्पून यमलोकी पाठवयचा कालपासून सपाटाच लावला होता
त्याने. म्हणजे
कंसाला मारतांना चहूबाजूंनी होणारा प्रतिकार शिथिल पडणार होता.
अंकुशाच्या
मर्मस्थानी प्रहाराने कळवळलेल्या त्या कुवलयाचे कान अत्यंत क्रोधाने मागे ताठ
झाले. तो त्याचे पाय दाण दाण आपटू लागला. सोंड वर करून
त्याने जोरदार चित्कार केला. त्याच्या सूक्ष्म बारीक नजरेत क्रोध मावत नव्हता. मोठ्या त्वेशाने
तो कृष्णावर धावून गेला. कृष्ण मोठ्या चपळाईने त्याच्या पोटाखाली शिरला. हत्ती सोंडेने
कृष्णाला पकडण्यासाठी जंग जंग पछाडू लागला. आपल्या पायांखाली कृष्णाला चिरडून टाकायचा प्रयत्न करू
लागला. कुवलयापीड
हा कंसाकडील सर्वात बलाढ्य आणि मदमस्त हत्ती होता. एकदा का तो हत्ती ह्या बालकांवर चालून गेला तर त्यातून
यम सुद्धा त्यांना वाचवू शकणार नाही अशी कंसाला खात्री होती. पण रोजच्या गाई
वळण्यामुळे डोंगर दर्या पहाडांमधे डोंगरी बकर्याप्रमाणे सहज काट्याकुट्यातून
फिरायची सवय झालेल्या, लांडग्या कोल्ह्यांपासून वाघ सिंह आणि इतर क्रूर
श्वापदांपासून स्वतःचे आणि गायींचे रक्षण करण्यात निष्णात झालेल्या ह्या बालकांना कुवलयापीड म्हणजे एक अचपळ सुस्त
प्राणी होता. चपळाईने
हत्तीचं शेपूट धरून कृष्ण सरसर थेट हत्तीवरच चढून गेला. हत्तीच्या डोक्यावर चढून सोंडेवरून खाली उतरू लागला. कृष्णाला आपल्या
डोक्याने जमिनीवर चिरडून मारण्यासाठी हत्ती खाली बसला पण कृष्णाने हत्तीचा भला
मोठा सुळा उपसून काढला. हत्ती वेदनेने जोरजोरात चित्कार करत खाली कोसळला. तोच भला मोठा
सुळा कुवलयाच्या पोटात खुपसून त्यांनी कुवलयापीडला शांत केलं. कुवलयापीडचा
उपसलेला मुसळासारखा हस्तिदंत कृष्णाने विजयपताकेसारखा खांद्यावर ठेवला आणि जणु
काही झालच नाही इतक्या सहजगत्या चालू लागला. बलरामाच्या
खांद्यावर नेहमी नांगर असे. पण आज त्याच्याही खांद्यावर आज कुवलयाचा दुसरा
हस्तिदंत होता. म्हणून
त्या हलधरला चिडवत, गम्मत जम्मत केल्याप्रमाणे दोघेही वीर रस्त्यातून
चालले होते.
घर्मबिंदूनी डवरलेल्या त्या दोघा बालवीरांच्या शरीरावर कुवलयाच्या रक्ताचे शिंतोडे
अंगावर उडले होते. लोक
आश्चर्याने डोळे विस्फारून त्यांचा हा पराक्रम बघत होते. एकमेकांना मोठ्या
आश्चर्याने सांगत होते, अहो,
प्रख्यात तो कुवलया अति पुष्ट देह
अंगावरीच गज चालुन ये मदांध
त्या धाडिले यमगृहा हरिनेच शीघ्र
घेई हरी उपसुनी गजदंत एक।।95.1
खांद्यावरी मुसळदंतचि पेलूनिया
हासे बघे ‘हलधरा’ करुनीच चेष्टा
कान्हाच जो चिडवितो बलरामदादां
तो कृष्ण खोडकरची हृदयी रहावा।।95.2
तो कृष्ण हृदयी रहावा असं तेथे उभ्या
असलेल्या प्रत्येकाला वाटू लागलं. श्वास रोधून त्यांचा हा पराक्रम पाहणार्या जनतेने
श्रीकृष्ण बलरामाच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास सुरवात केली. सर्व सामान्य
जनतेला त्यांच्या पराक्रमाची भुरळ पडून ही बालके म्हणजे असामान्य वीर जणु काही
नररत्नेच आहेत असे वाटु लागले. तर
ह्या
बछड्यांच्या अंगावरील चमकणारे घर्मबिंदू, खांद्यावर तोललेला रक्तात माखलेला तो कुवलयाचा प्रचंड
सुळा, अंगावर
उडालेल्या कुवलयाच्या रक्ताच्या चिळकांड्या, अस्ताव्यास्त झालेले केस हा सारा भयानक अवतार पाहून
मल्लांना त्यांचे देह जणु काही इंद्रवज्रासमान कणखर वाटू लागले.
त्यांचा
महा पराक्रम, मोहक
स्मित आणि पराक्रमानंतरही सहजपणे मित्रांसोबत चाललेली थट्टमस्करी पाहून स्त्रिया
इतक्या मोहित झाल्या की त्यांना जणु काही कामदेवच अवतरला आहे असं वाटू लागलं.
कंसाचे
हितचिंतक दुष्ट राजे त्याचा असामान्य पराक्रम पाहून मनातून हबकून गेले होते. आपल्याला शासन
करण्यासाठीच हा येथे आला आहे, कदाचित आपल्यालाही अशा निर्घृणपणे ठार तर नाही मारणार
ह्या कल्पनेने त्यांच्या मनाचा थरकाप झाला.
त्याचं
ते कोवळं वय, कोमल
हास्य पाहून तेथील तमाम पालक वर्गाला, वृद्धांना ह्या गोड गोजिर्याला एकदा तरी प्रेमाने जवळ
घ्यावं असं वाटत होतं. त्यांना तो छोटा बालकच वाटत होता. अडाण्यांना हा कोण उद्धट असं वाटत होतं तर तेथील
ऋषीमुनींना त्याला पाहून ब्रह्मानुभव येत होता.
कंसाला त्याच्या रथाला जुंपलेला तो वृद्ध ऋषि
नजरेसमोर तरळू लागला. त्याच्या अंगावर आसूड ओढताच खाली कोसळता कोसळता त्या
ऋषीने उच्चारलेली शापवाणी त्याच्या कानात घुमू लागली - `` तुला गिळणारा
काळ लवकरच जन्माला येईल दुष्ट कंसा ------!! तुझ्या लाडक्या बहिणीचा देवकीचाच आठवा पुत्र तुला ठार मारेल!'' कुवलयाच्या मृत्यूने कंस विलक्षण घाबरला. अक्षरशः हादरला. पण वरवर तसे न दाखवता सिंहासनावर बसून होता.
हसत हसत आत
आलेल्या रामकृष्णांना पाहून चाणूर आणि मुष्टिकाने मोठ्या प्रेमाचा आव आणत त्यांचं स्वागत केलं. चाणूर म्हणाला, हे नंदपुत्रांनो, तुम्ही दोघे असाधारण वीर आहात. आपण दोघे अत्यंत निष्णात कुस्तीपटु आहात असं आमचे कंसमहाराज आणि आम्ही ऐकून आहोत. आपल्या दोघांचे कुस्तीकौशल्य पाहण्यासाठीच महाराजांनी आपल्याला खास वृंदावनाहून येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे.
जी प्रजा मन, वाणी आणि आपल्या कर्माने राजाला रिझवते त्याचे राजा भलेच करतो. सर्वांनाच माहिती आहे गायीवासरे चरायला सोडली की तुम्ही गोपाल वनात आनंदाने कुस्त्या आणि तर्हेतर्हेचे खेळ खेळता. आज
कंस महाराजांना प्रसन्न करण्यासाठी चला आपण कुस्ती खेळू या.
मान डोलवत गोकुलेश
म्हणाला, `` चाणूर, आम्हीही कंस महाराजांची वनवासी प्रजाच आहोत. आम्हालाही महाराज कंसांना प्रसन्न केलेच पाहिजे. पण चाणुर, कुस्तीच्या नियमांप्रमाणे समान बळाच्या मल्लांमधे कुस्ती होते. आम्ही आमच्या वयोगटाप्रमाणे जी योग्य मुले असतील त्यांच्या सोबत कुस्ती खेळू. कुस्ती जर तुल्यबळांमध्ये झाली नाही तर ती पाहण्यासाठी आलेले दर्शक हेही अन्यायाचे समर्थक आणि पापाचे भागिदार होतात.'' नंदनंदनाने दर्शकांच्या आणि चाणूराच्या सदसद्विवेकबुद्धीला छेडून पाहिलं आणि थोडासा नरमाईचा पवित्रा घेतल्यासारखे दाखवत चाणूर आणि मुष्टिकाचा शक्तिमान असल्याचा अहंकार रूपी अंगार फुंकर घालून थोडासा अजुनच फुलवला.
चाणूर हसत हसत म्हणाला, ``छे छे!
अरे तुम्हाला बाळ किंवा कुमार असं कोण म्हणेल? अरे वीरांनो, आत्ता तर तुम्ही हजार हत्तींचं बळ असलेल्या कुवलयालाही मारलं. तुम्हाला बालक किंवा किशोर कसं समजावं? तुम्ही तर आमच्या सारख्या बलवानांसोबत कुस्ती खेळली पाहिजे. ह्यात कसला आलाय अन्याय! कृष्णा तू माझ्यासोबत तर तुझा बलरामदादा मुष्टिकासोबत कुस्ती खेळेल. आणि चाणूर आणि मुष्टिक दोन्ही क्रूरकर्मा मल्ल कृष्ण
बलरामाच्या कोवळ्या वयाचा विचारही न करता त्यांच्यावर धावून गेले. ते पाहून
दर्शकांमध्ये ``हा
अन्याय आहे हा अन्याय आहे. ही बालके आहेत. तर चाणूर मुष्टिक कसलेले मल्ल आहेत.'' म्हणून निषेध होऊ
लागला.
श्रीकृष्ण
आणि बलरामाला हे अपेक्षितच होतं. कृष्ण चाणूरासमवेत तर बलराम मुष्टिकासोबत भिडला. पंजे पंजांना
भिडवून डोकी डोक्यांना भिडवून, पाय जमिनीत रोवून जोडीदाराला पकडण्यासाठी, खाली आपटण्यासाठी
निरनिराळे डावपेच दोन्ही बाजून लढले जाऊ लागले. निसर्गाच्या शाळेत तयार झालेले हे बछडे युक्ती आणि
चपळता ह्यात कमालीचे श्रेष्ठ होते. प्रत्यक्ष
वाघसिंहाशी लढलेले होते. लांडग्या कोल्ह्यांसोबत झुंजले होते. कंसाने वारंवार
पाठवलेल्या राक्षसांशी युद्ध करून
युद्धनीतीतही तरबेज झाले होते. कंसाची कुटिल नीती लहानपणापासून अनुभवल्याने कंसांच्या
विविध चालींना
तोंड देण्यातही विषारद होते. कृष्णाच्या अचूक आणि मर्मभेदी ठोशांनी चाणूराच्या
मांसपेशी ढिल्या
पडल्या.
स्नायू शिथील झाल्याने तो गलितगात्र झाला. चाणूराचे दोन्ही दंड पकडून त्याला हवेत गोल गोल फिरवून
ह्या बालमल्लाने त्याला अशी काही धोबीपछाड दिली की चाणूर उठलाच नाही. सोसाट्याच्या
वादळात मोठा वृक्ष उन्मळून पडावा तशी गत बलरामापुढे मुष्टिकाची झाली. चाणूर आणि मुष्टिकासारखे मल्ल हा हा म्हणता धराशायी
झाले.
अंगावर धावून आलेल्या शलाचं शिर कृष्णाच्या पायाच्या एका तडाख्यातच उडून खाली पडलं. चाणूर
मुष्टिकासोबत हा हा म्हणता कूट, शल, तोशल इत्यादि सारे मल्ल धराशायी झाले. हे पाहून बाकी
मल्ल पळत सुटले. तेंव्हा
बाकी बाल गोपालांनी त्यांना धरून आणलं. ओढून ओढून
हौद्यात आणून त्यांच्यासोबत कुस्ती खेळू लागले. नगारे, भेरी , तुतार्यांच्या तालावर आपल्या पायातील घुंगरांचा ताल
धरत सारेच कुस्ती खेळू लागले.
चाणूर, मुष्टिक असे अति क्रूर मल्ल
केलेचि ठार हरिने अति ते बलाढ्य
चाणूर आणि
मुष्टिकांना धरणीवर लोळवल्यावर मात्र बघ्यांमधे एकच घबराट माजली. तेथील प्रेक्षकांच्या
मुखातून भयाने हा! हा! हा! हा! असे शब्द निघू
लागले.
सार्या मल्लाचा
नायनाट होतांना पाहून कंस भयंकर क्रोधित झाला. `` बंद करा! बंद करा त्या तुतार्या नगारे! बंद करा ती वाद्ये! वसुदेवाच्या ह्या
आततायी मुलांना मथुरेबाहेर हाकलवून द्या. ह्या गवळ्यांचं सारं असेल नसेल ते धन काढून घ्या. त्या बेअक्कल
नंदाला बेड्या ठोका. तो वसुदेव तर शत्रूला सामिल आहे त्याचा ताबडतोब
शिरच्छेद करा.
उग्रसेन जरी माझा पिता असला तरी तोही ह्या सर्वांच्याच विचारांचा आहे. त्याचाही वध करा. कोणालाही
जिवंत सोडू नका.’’
कंस जोर जोरात ओरडत होता आज्ञा सोडत होता.
आता
श्रीकृष्णाची नजर कंसाकडे वळली. कृष्णाच्या नजरेतला तो अंगार पाहताच कंस हादरला. सिंहासनावरून
उठून पळून जायच्या तयारीत कंस होता. कंसाभोवती त्याच्या संरक्षणासाठी मोठ्या मोठ्या
योद्ध्यांनी मोठी संरक्षक भिंत उभारली होती. कंसाने जेवढी कडेकोट सुरक्षा वाढवली होती तेवढाच तो
मनातून असुरक्षित अनुभवत होता. झालं ही तसच. त्या सगळ्यांच्या उपस्थितीत कृष्णाने कंसावर
चित्यासारखी झेप घेतली. कंस हातात ढाल तलवार घेऊन कधी डावीकडे तर कधी उजवीकडे
पळायचा प्रयत्न करत होता. पण गरुडाने सर्पावर झेप घेऊन पकडावं त्याप्रमाणे श्रीकृष्णाने एका हाताच्या पकडीत कंसाला
घट्ट पकडलं.
त्या गडबडीत कंसाच्या डोक्यावरचा मुकुट खाली जमिनीवर पडला. कंसाचे केस धरून
फरपटत कृष्णाने त्याला पायर्यांवरून ओढत सिंहासनाखाली आणले. खास राजांसाठी
असलेल्या मंचावरून त्याला खालच्या रंगभूमीवरील हौद्यात फेकत, जोरदार
आरोळी मारून, स्वतः त्याच्या अंगावर उडी घेतली. त्यानेच कंस
अर्धमेला झाला.
कंसाचा सुनाम नावाचा सेवक मधे पडला. कृष्णावर वार करण्यापूर्वीच बलरामाने त्याला ठार मारले. खाली पडलेल्या कंसाला उठायलाही वेळ न देता कृष्ण कंसाच्या अंगावर बसला. कंसाच्या छाताडावर बसून त्वेशाने मुष्टिप्रहार करू लागला. कंस रक्त ओकू लागला. एखादा पशू मारावा तसा कृष्णाने कंसाचा वध केला. कंसाचं मृत शरीर जमिनीवर गोल गोल ओढत नेणारा हा बालमल्ल पाहून महाबलवान सिंह शिकार केलेल्या पशुला जमिनीवरून खरडत, घासत, ओढत नेत असावा असं वाटत होतं. कंसाचे मुंडकं तलवारीने छाटून कृष्णाने उंच उडवलेलं पाहताच सगळीकडे हाहाक्कार माजला. कंसाचे कंक, न्यग्रोध असे सात भाऊ कृष्ण-बलरामावर धावून गेले. त्यांचीही तीच गत झाली. त्यांनाही दोघांनी धराशायी केले. हा सर्व प्रकार जनता डोळे विस्फारून बघत राहिली. हे काय भयंकर!!! कंसांच्या शासनाचे नियम धाब्यावर बसवून हे काय भलतेच! ( तथा हाहेति शब्दः समुहांस्तदाऽभूदुदिरीतः सर्व जनैर्नरेन्द्र । ) अत्याचारी कंस मेला असला तरी काही काळ अराजक उत्पन्न करणारी स्थिती लोकांमधे भय, असुरक्षिततेची भावना निर्माण करून गेली.
ततो
हा हा कृत सर्वम् आसीत् तद् रङ्गमण्लम्
अवज्ञया हतं दृष्ट्वा कृष्णेन मथुरेश्वरम् ।।
हाहाक्कारचि माजला चहुकडे सारे म्हणू
लागले
कंसासी भरल्या सभेत वधण्या हा
कृष्ण कैसा धजे
राजावीण कशी सुरक्षित प्रजा राहील
आता बरे
जेथे वाट फुटेल तेथ जन ते सारे पळू लागले
तर कृष्णाचा अलौकिक पराक्रम पाहून काही जण `हे कृष्ण! हे कृष्ण!' म्हणत मनात कृष्णाचच चिंतन करू लागले. कृष्णाचं ते रूप मोठं विलक्षण अद्भुत होतं. लोकाच्या हृदयात ते कायमचं कोरलं गेलं. ते रूप हृदयात तसच रहावं असही प्रत्येकाला वाटत होतं.
अंगार नेत्रि भरला कच अस्तव्यस्त
तो बाळ
अद्भुत दिसे वनराज श्रेष्ठ
तो बालवीर, बछडा, वनराज छावा
तो बालसिंह हृदयी ममची रहावा ।।96.2
कंसास घेरुनि उभे जवळीच मंत्री
रक्षार्थ सैनिक दळे असुनी सभोती
त्यांच्या समक्ष हरिने वधिलेच कंसा
यज्ञी पशू चढविलाच बळी जसा वा।।97.1
कंसास शासन करी यमलोक दावी
अन्याय दूर करुनी रिझवी प्रजेसी
आश्वस्त जो करितसे नित सज्जनांसी
तो बालवीर हृदयासनि नित्य राही।।97.2
छाटून मस्तक हरी, मथुरापतीचे
केसा धरून उडवी अति उंच क्रोधे
हासेचि तो खदखदा बघुनी शिराते
भूमीवरीच पडले जरि उंच फेके।।98.1
हासे बघोनि धरणीवर दुष्ट लोळे
ऐसा थरार बघता भयभीत सारे
तो बालवीर अति अद्भुत कृष्णनामे
माझ्याच ह्या हृदयमंदिरि राहु दे रे।।98.2
कृष्णाचा पराक्रम पाहून भयभीत
झालेल्या,
पळणार्या लोकांच्याही आश्चर्याला सीमा राहिली नाही. पळता पळता मधेच थांबून, वळुन वळुन मथुरावासी डोळे विस्फारून समोर घडणारे
प्रसंग बघत होते.
मधेच कंसारि देवकीसुताच्या नावाचा जयजयकार करत होते.
धाडिले यमलोकि त्या मथुरापतीसचि लीलया
रक्त माखुनि लाल लालचि देवकीसुत जाहला
केश विस्कटलेचि सुंदर गर्भ रेशिम ते मुखी
हर्ष होउनि लोक गर्जति घोष मंगल तो मुखी।।99.1
कंसाचा
वध केल्यानंतर मात्र काही क्षणात हा बालवीर थेट कारागृहाच्या दिशेने धावत सुटला. त्याला पाहूनच
ठिकठिकाणच्या पहारेकर्यांनी कारागृहाचे दरवाजे सताड उघडले.
पाहण्या निज माय, तातचि धावला पवनासमा
कोंडुनी निज माय तातचि ठेविले जिथ तेथ हा
होत आतुर भेटण्या नच धीर ज्या लव राहिला
तो मुकुंदचि धावुनी मम येउ दे हृदयात ह्या।।99.2
आणि पुढे जे घडलं ते अवर्णनीयच म्हणावं लागेल.
(वृत्त- मालिनी, अक्षरे -15, गण - न न म य य, यति-8,15)
कितिक दिवस काराद्वार जे बंद होते
उघडुनि अति वेगे धाव घेता हरीने
बघुनि हरि समोरी विस्मयाने तयासी
जननि जनक दोघे प्रश्न नाना विचारी।।100.1
``असशि कवण तूची ? कोठुनी आत येसी?
असशि सुत कुणाचा ? काम येथेच कायी?''
जननि जनक दोघे पाहुनी ते समोरी
हृदय भरुनि आले लोचना पूर येई।।100.2
अपरिमित तयांनी सोसले कष्ट पाही
अविरत यमुना ही ओघळे कृष्ण गाली
प्रथमचि बघता त्या माय ताता समोरी
हळु हळु मग बोले कृष्ण कान्हा मुरारी।।100.3
``बरसत घन होता श्रावणी अष्टमीला
गडद तमचि होता वद्य पक्षात काळा
पिउनि तवचि माते स्तन्य ते अल्प स्वल्प
निघुनि शिशु तुझा हा दूर गेला कृतघ्न''।।101.1
``परतुनि तुजपाशी आज आलो पुन्हा मी
कितिक दिवस गेले पाहिले ना तुला मी
तुजसिच बघण्याची लागली ओढ होती
चरण कमल दोन्ही वंदितो मी तुझेची''।।101.2
करुनि नमन बोले ``तात माझेचि तुम्ही,
उचलुनि मज भारा वाहिले मस्तकीही
उतरुनि यमुनेच्या रौद्र पात्रीच रात्री
सहज भयद कालिंदी नदी पार केली ''।।102.1
``समज मजसि तेंव्हा थोडिशीही न होती
असुनि पुढति माझ्या तात वात्सल्यमूर्ती
नमन कधि न केले आपुल्या पादपद्मी
चरणि शरण आलो आज बाबा तुम्हासी''।।102.2
पुत्रासंगे पहिलिवहिली भेट मातापित्यांची
होता ऐशी अवचित कशी, बाळ येता समोरी
वात्सल्याचा फुटुन हृदयी बांध ते मुक्त होई
नेत्रातूनी झरझर झरे नीररूपात गाली।।103.1
कृष्णासी ते हृदयि धरिती; चुंबिती गाल दोन्ही
स्पर्शाने त्या पुलकित अती जन्मदातेच होती
आनंदाश्रू सरिवर सरी कृष्णमाथी झरोनी
धारांमध्ये भिजुनि अवघा कृष्ण तो चिंब होई।।103.2
अश्रूंनी त्या गिरिधर शिरी हो अभीषेक पूर्ती
आनंदाचा विमल जणु हा सोहळा कृष्ण भोगी।।103.3
वसुदेव देवकीला
कारागृहातून मुक्त करण्यापूर्वी कंसाचे वडील मथुरा-नरेश उग्रसेनाची कृष्णाने बंदिवासातून सुटका केली. कंसाच्या
राण्यांनाही भेटून त्याने सांत्वना दिली. उग्रसेन
समस्त अंधकांचे नेता होते. सर्व जनतेने आणि राजा उग्रसेनानेही परत परत कृष्णालाच
राज्यावर बसण्याची विनंती केली. आत्तापर्यंत कृष्ण एका खेड्यातील मुलगा होता. साधा गोपालक होता. मनात आणलं असतं तर
सर्वांच्या विनंतीला मान देत आहोत असं वरवर दाखवून सार्या राज्याचा मालक बनू शकत
होता. पण
अत्यंत निस्पृहपणे त्यानी उग्रसेनाचे राज्य उग्रसेनाला परत केलं. कृष्णाने लढलेल्या
प्रत्येक संग्रामामधून त्याच्या स्वभावाचे, त्याच्या गुणांचे विविध पैलू स्पष्टपणे समोर येतात आणि
त्याने कृष्ण चरित्र अजूनच चमकून जातं.
कंसवधानंतर
श्रीकृष्णाने सार्या मथुरेच्या प्रजेला संबोधित केले. अत्यंत निरिच्छ
आणि विनीतपणे श्रीकृष्णाने सर्व प्रजेला सांगितले, ``मी कंसाचा वध राज्यासाठी केला नाही. प्रजेला एका
सुशासनाची आवश्यकता होती. उग्रसेन महाराज ह्या राज्याचे स्वामी आहेत तेच ह्या
राज्याचे स्वामी राहतील. शिवाय मी यदुचा वंशज असल्याने `आम्ही राजे होणार
नाही' असा
आम्हाला ययातिराजांचा शाप आहे. त्या शापाला स्मरून हे राज्य मी स्विकारू शकत नाही. ''
ययाति शापात्
वंशोयं अराज्यार्ह अपि साम्प्रतम्
मयि भृत्ये स्थिते
देव नाज्ञापयितु किं नृपैः ।।
न होती भूपती कोणी । यदुवंशी कधी कुणी
ययाती नृपतींचा हा । शाप आम्हा असे भुवी
सेवका करणे आज्ञा । महाराज सदा तुम्ही
सेवेसी आपुल्या पायी । नित्य तत्पर भृत्य मी
शापाचाही असा मान
ठेवणारा कृष्ण प्रत्यक्ष राजसिंहासनावर बसला नाही तरी सर्वांच्याच हृदयसिंहासनावर
खचितच आरूढ झाला.
कंसाचा वध हा
कृष्णाच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी देऊन गेला. गोकुळातून बाहेर पडलेला कृष्ण परत कधी गोकुळात गेला
नाही.
संपूर्ण आयुष्यात त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. खरतर तो कुठल्याच गुंत्यात कधीच अडकला नाही. न मां कमार्णि
लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा हे सत्यात
जगून दाखवणारा कृष्ण हा योगीयांचा योगी योगीश्वर झाला.
----------------------------------------------------------
कै. श्रीधर वर्णेकरांनी केलेल्या संस्कृत
वात्सल्यरसायनम् ह्या काव्या मधल्या अनेक श्लोकांचा भावानुवाद वरील लेखात आहे.
Comments
Post a Comment