सखा कृष्ण हरि हा
सखा कृष्ण हरि हा
कृष्ण ह्या दोन
अक्षरांमधे सर्वांची मने खेचून घेण्याची प्रचंड ताकद आहे. अगदी कृष्ण विवरासारखी.
कोणी त्याच्या रूपाकडे आकृष्ट होतात तर कोणी त्याच्या बाललीलांनी मोहित होतात.
कोणी त्याच्या रासक्रीडेत रंगून जातात तर कोणी त्याच्या योगीश्वर रूपासमोर नतमस्तक
होतात. कोणी त्याच्या नीरक्षीर विवेकाने अचंबित होतात तर कोणी त्याच्या
गीतारूपी विवेक चिंतामणीचे तेज पाहून विस्मित होतात. अर्जुनाच्याच नव्हे तर सार्या
मानवजातीच्या हाती आलेला हा गीतारूपी दिव्य चिंतामणी आजही अनेकांचे जीवन उजळवून
टाकतो तर ज्यांना कृष्णाचा विवेक कळला नाही ते त्याला दूषणे देत का होईना पण
त्याच्याच विचारात गुंतून पडतात.
विवेक म्हणजे योग्य
अयोग्याचं सूक्ष्म ज्ञान, धर्म आणि अधर्माचा
अचूक निवाडा. म्हणूनच विवेक हा स्थळ, काळ, प्रसंग आणि
व्यक्तिसापेक्ष बदलत असतो. कृष्णाने पार्थाला धर्माची सोपी व्याख्या सांगितली.
धर्म म्हणजे तरी काय? समाजातील थोर
मंडळींचे आचरण म्हणजे धर्म. ही थोर मंडळी जसे आचरण करतात, त्याचेच अनुकरण आणि अनुसरण
समाजातील बाकी लोक करतात.
यद्यदाचरति
श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत् प्रमाणं
कुरुते लोकस्तदनुवर्तते ।। 21 ।।
(गीता अध्याय 3)
हेच माऊलींच्या
शब्दात सांगायचे तर,
एथ वडिल जे जे करिती। तया नाम धर्मु ठेविती । तेचि येर
अनुष्ठिती । सामान्य सकळ ।। हे ऐसे असे स्वभावे। म्हणोनी कर्म न सांडावे । विशेषे
आचरावे । लागे संती ।। (ज्ञानेश्वरी)
कृष्ण सर्व कर्म
बंधनातून मुक्त होता. पण मार्गदर्शक म्हणून सारी प्रजा त्याच्याकडेच बघत होती हे
लक्षात घेऊन कृष्णाने सदोदित अत्यंत काटेकोरपणे यम-नियमांचे पालन केले. इतकेच नाही
तर पूर्वी कोणी केले नसेल इतके प्रत्येक काम उत्कृष्ट करून दाखविले.
नित्य नियमाने
वागणार्या न्यायी माणसालाही काही अपवादात्मक प्रसंगी नियम वाकवावे लागतात. बदलावे
लागतात किंवा मोडावेही लागतात. अशावेळेस ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर
लोककल्याणाच्या उद्देशाने वाकवले असतील, बदलले असतील किंवा मोडले असतील तर तो अधर्म होत नाही. तर तोच योग्य
धर्म ठरतो.
ज्याप्रमाणे भाजी, कापूस, सोने ह्या सर्व वस्तू एकाच तराजूने
तोलून चालत नाहीत त्याप्रमाणेच सर्व लोकांना एकच नियम लावून चालत नाही.
मिष्टान्न कितीही रुचकर असले तरी ते नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला किंवा रोग्याला
अपायकारकच ठरते. कृष्णाच्या अनेक निर्णयांमधून त्याने धर्माचा सूक्ष्म विचार व
त्याचा परम विवेकीपणा दाखवून दिला आहे. म्हणून वरवर विरोधाभास वाटणार्या
कृष्णाच्या कृतीमधून व्यापक जनकल्याणाचा उद्देश व नीतिमान जनतेचं रक्षण ह्या
उद्दिष्टांचीच पूर्ती झाली आहे.
वैयक्तिक पातळीवर
अत्यंत निर्मोही, निःस्वार्थ, निस्पृह आणि निरपेक्ष भावनेने काम
करणारा कृष्ण राष्ट्राचा, धर्माचा विचार
करतांना मात्र निर्मम आणि विशोक (शोकरहित) आहे. तेथे कुठलाही विकल्प त्याच्या मनात
नाही.
कृष्णाच्या
आचरणातील वरवर भासणारा हा विरोधाभास सूक्ष्मपणे विचार केल्यास कृष्णाच्या विचार
आणि आचारातील सुसंगती दाखवणारा आहे. श्रीविष्णुसहस्रनामात ही सुसंगती मोठी
सुंदर रीतीने दाखवली आहे. त्याच्या विवेकी स्वभावाचे उचित वर्णन त्यात सापडते.
विष्णुसहस्रनामात
वर्णन केल्याप्रमाणे भगवान कृष्ण `अमानी मानदो मान्यः' असा आहे. त्याला
कोणाकडूनही कुठल्याही मानाची अपेक्षा नाही. इतरांना मात्र तो मान देतो.
म्हणूनच सर्व लोकांमध्ये तो मान्य आहे. `अपमानं पुरस्कृत्य मानं कृत्वा च पृष्ठतः' म्हणजे अपमान पुरस्कारस्वरूप मानून, मान पाठीमागेच ठेवणारा कृष्ण इतरांना
मात्र अत्यंत मान देणारा आहे. सुदाम्याच्या प्रेमाखातर अनवाणी धावत जाणारा कृष्ण , सुदाम्याचे पाय स्वहस्ते धुणारा कृष्ण
आजही सर्व भारतीयांच्या हृदयात विराजमान आहे.
महाभारत युद्धात
थोडासा वेळ मिळताच अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना ताजेतवाने करण्यासाठी
चाबूक मुकुटात खोचून त्यांना अंघोळ घालणार्या, खरारा करणार्या, आणि अर्जुनाला रथात चढण्यासाठी स्वतः
ओणवे वाकून त्याच्या पाठीवर पाय ठेऊन अर्जुनाला रथात चढायला मदत करणार्या
कृष्णाची मूर्ती सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.
भीष्मांनी युद्धात
कृष्णाला हाती शस्त्र धरायला लावीन अशी प्रतिज्ञा केल्यावर त्यांच्या
प्रतिज्ञेसाठी आपली प्रतिज्ञा मोडणारा कृष्णही तितकाच विवेकी व लोभस आहे. त्यातून
त्याने दोन गोष्टीही साधल्या. भीष्मांना शस्त्र खाली ठेवायचा संदेशही दिला तर
भीष्मांशी लढायला कचरत असलेल्या अर्जुनामधे जिगीषा जागवण्याचे कामही केले.
शत्रूपक्षातील कर्णानेही आपल्या मृत्यूनंतर आपले क्रियाकर्म कृष्णाने करावे
ही व्यक्त केलेली इच्छाही कृष्णाने मोठ्या आत्मीयतेने पूर्ण केली.
कृष्णाला मनोहरो
जितक्रोधः संबोधलं आहे. स्वतःचा राग त्याने पूर्ण जिंकला आहे म्हणूनच त्याच्या
चेहर्यावर कोणालाही मोहून टाकेल असे स्मित कायम झळकत असते. क्रोधावरील संयम किती
लवचिक असावा, तो किती ताणावा आणि
तो कुठे सोडावा ह्याचं उत्तम उदाहरण शिशुपालवध आहे. पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या
सांगता सभेत कृष्णाला अग्रपूजेचा मिळालेला मान पाहून संतापलेल्या शिशुपालाने हीन
शब्दात कृष्णाची निर्भर्त्सना करायला सुरवात केली. त्याचे शंभर अपराध
मोजत कृष्ण शांत होता. शेवटी भीष्माचार्यांचाही अपमान करणार्या शिशुपालाला
शांतपणे त्याचा एक एक अपराध सांगून मगच कृष्णाने त्याच्यावर सुदर्शन चक्राचा
प्रयोग केला आहे.
कृष्ण धर्मगुप्
म्हणजे धर्माचे रक्षण करणारा आहे, धर्मकृत् म्हणजे
स्वतःच्या आचरणाने धर्म निर्माण करणारा आहे आणि धर्मी - म्हणजे धर्मानुसार
वागणाराही आहे.
दुर्योधनाची मुलगी
लक्ष्मणा ही कृष्णाच्या मुलाची सांबाची पत्नी असल्याने कौरव व पांडव दोघेही त्याचे
नातेवाईकच होते. पण धर्माची बाजू घेणारा कृष्ण सुनीतीच्या मार्गावर चालणार्या
पांडवांपाठी मेरूपर्वतासारखा खंबीरपणे उभा राहिला.
नरकासुराच्या
वधानंतर त्याच्या बंदिखान्यात खितपत पडलेल्या सोळा हजार स्त्रियांना ज्याकाळी
समाजाने जवळ केले नसते त्यांना कृष्णाने सन्मानाने समाजाच्या मुख्य धारेत आणले. त्यांना
पत्नीचा मान देणार्या कृष्णाने नियम वाकवून धर्माला जास्त सहिष्णु बनविले.
कौरवांकडे
शिष्टाईला जाणार्या कृष्णाने द्रौपदीला `हे युद्ध होणारच आणि ह्या युद्धात तुझा प्रतिशोध पूर्ण होणारच' हे आश्वासन आधीच दिले होते. तरीही
आडमुठ्या दुर्योधनाच्या तोंडून `मी सुईच्या टोकावर
राहील एवढी भूमीही पांडवांना देणार नाही' हे वाक्य येणे गरजेचे होते. शिष्टाईच्या निमित्ताने सर्व महारथींशी
संवाद साधत दुर्योधनाची मदार ज्यांच्या ज्यांच्यावर होती अशा कर्णासहित
सर्वांचे मनोधैर्य खच्ची करून कृष्ण परतला. युद्धाआधीच अर्धी लढाई जिंकून आला. हा `वृषकर्मा' म्हणजे धर्माने
वागणारा होताच पण `वृषाकृती' म्हणजे धर्माचं जणु सगुण रूपच होता.
त्यामुळेच भीष्म, द्रोण, कर्ण, जयद्रथ, दुर्योधन वा दुःशासन असो वा कंस, जरासंध, नरकासूर असो. अश्वत्थामा असो वा कृप
अधर्माची कास धरणार्या प्रत्येकाला सरळमार्गाचा अवलंब न करता वरवर वाटणार्या
`अधर्म' मार्गाने वधून वा शासन करून कृष्णाने
धर्मसंस्थापना केली आहे.
दुष्ट, दुर्जनांवर प्राणघातक प्रहार
करण्यासाठी सर्व शस्त्र, अस्त्र आणि
आयुधांनी सज्ज असा श्रीकृष्ण `सर्वप्रहरणायुध' (दुष्टांवर प्रहार करण्यास सतत सज्ज)
असला तरी तो `अक्षोभ्य' आहे. कोणीही त्याला क्षुब्ध करु शकत
नाही. त्याने दुष्टांना केलेले शासन हे कुठल्याही सूडबुद्धी, संताप, अहंकारातून झालेले नाही तर
अत्यंत समतोल मनाने घेतलेला तो निर्णय आहे. म्हणूनच तो सर्वशस्त्रधारींमधे श्रेष्ठ
म्हणजे `सर्वशस्त्रभृतांवरः' आहे.
भक्तांसाठी कुठलेही
कष्ट सोसण्यास तयार असलेल्या कृष्णाचे वैराग्य पाहिल्याशिवाय त्याच्या विवेकाची
पूर्ण कल्पना येत नाही. कंसानंतर मथुरेच्या किंवा द्वारकेच्या राज्याचेही राजेपद
त्याने स्वीकारले नाही. वेळ पडल्यास विदुराघरच्या कण्याही परमानंदाने स्वीकारल्या
तर द्रौपदीकडे भांड्याला चिकटलेल्या एका पानावर तो तृप्त झाला. कमलपत्रावर पडलेलं
पाणी त्याला जराही न चिकटल्यामुळे हिर्यामोत्याप्रमाणे चमकते त्याप्रमाणे कशाचाही
मोह नसलेला हा निर्मोही कुठल्याच बंधनात बांधला गेला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत
त्याच धैर्य, माधुर्य, विवेक जागृत होता.
``कृष्णा, तुम्हीही सारे यादव एकमेकात लढून मराल
आणि एका अनाथासारखा तुला क्षुल्लक कारणाने मृत्यू येईल.'' ही गांधारीची महाभयंकर शापवाणी ऐकून
सारे पांडवही जेथे भयाने थरथर कापू लागले तेथे कृष्णाने सुस्मित वदनाने तिचा शाप
स्वीकारला. परीक्षितीला जीवनदान देणार्या, पांडवांचं वेळोवेळी रक्षण करणार्या
कृष्णाने स्वतःला मिळालेला शाप व्यर्थ ठरावा ह्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत.
त्याच प्रमाणे उन्मत्त झालेल्या स्वतःच्या पुत्रांना ऋषींनी दिलेला कुलक्षयाचा
शापही त्याने धीरोदात्त पणे नुसता स्वीकारलाच नाही तर ऋषींच्या शब्दाचं सामर्थ्य
लोप पावू नये, त्यांची शापवाणी
खोटी होऊ नये म्हणून तो सर्व यादवांना प्रभासक्षेत्री घेऊन गेला. तेथे उन्मत्त
झालेल्या यादवांमध्ये झालेल्या यादवीत सर्व यादवकुलाचा नाश झाल्याचा उल्लेख येतो.
अशाही प्रसंगी सत्यधर्मपरायण असा कृष्ण विचलित झाला नाही. गांधारीच्या शापवाणीसाठी
योग्य वेळ आली आहे हे जाणून तो समाधिस्थ बसला. कृष्णाच्या पायावर व्याधाने बाण
सोडला. त्या व्याधावर क्रोधित न होता अत्यंत स्मितमुखाने त्यालाही क्षमा
करून हा परमविवेकचूडामणी कृष्ण निजधामास गेला.
श्रीमद् आद्य
शंकराचार्यांची प्रतिभा (श्रीकृष्णाष्टकम्) मराठीत मांडून म्हणावेसे वाटते,
शठांना संहारी, सुजन नित रक्षी सजग जो
मनी संदेहाला वितळवि, विवेका उठवितो
विसावा विश्वाचा सकल-जगजेठी निरुपमा
दिसो माझ्या नेत्री अविरत सखा कृष्ण हरि हा ।।
---------------------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
( संदर्भ - महाभारत -
गीताप्रेस, गोरखपूर; ज्ञानेश्वरी, विष्णूसहस्रनाम- कै. वरदानंदभारती, सुबोध स्तोत्र संग्रह-
कै.पांडुरंगशास्त्री गोस्वामी.)
Comments
Post a Comment