स्यमंतक मणी -

 


लोकापवादात् भजेत भीतिम्

गोष्ट असते छोटीशीच . पण नुकसान खूप करून जाते. रस्त्याच्या कडेला उगवलेल्या वाघनखीचा काटा नव्या कोर्‍या भारी कपड्यात अडकून, जाता जाता नवा अंगरखा टरकावून टाकतो. वाघनखीचा पोपटाच्या चोचीसारखा वाकडा काटा इवलासा असला तरी त्याच्या लांबूनच जायला लागते. त्यापासून बचावात्मकच पवित्रा घ्यायला लागतो. आणि समजा काटा कपड्यात अडकला आणि घिसडघाई करून कपडा ओढलाच तर त्याची लक्तरे होण्यास वेळ लागत नाही. अडकलेला कपडा हळुवारपणे काट्यातून सोडवावा लागतो. काटेरी जाळीतून कमळाची कळी ओढून घेतली तर तिच्या चिंधड्याच होतात. लोकापवादाचेही तसेच. एकदा का लोकापवादाचा काटा एखाद्याला अडकला की, तो सावकाशपणे, शांत डोक्याने, मनाचा थोडाही तोल ढळू न देता काढावा लागतो. तो खरा आहे का खोटा आहे ह्याची शहानिशा लोक करत नाहीत. पण एकमेकांशी बोलतांना त्याचा उल्लेख मात्र जरूर करतात. बघता बघता असा लोकापवाद शीलाच्या, उजळ प्रतिमेच्या चिंध्या चिंध्या करून जातो.

अशा वेळेस आरोप करणार्‍याशी लढून चालत नाही. शांतपणे सर्व प्रयत्नानिशी आपल्यावर आलेलं किटाळ दूर करण्याचा प्रयत्न करावा लागतो. सिद्ध करून दाखवावं लागतं की मी शुद्ध आहे. माझं आचरण वादातीत आहे. मुशीत घातलेल्या सोन्यासारखी परत एकदा उजळवून दाखवावी लागते स्वतःची प्रतिमा. त्यासाठी स्वतःला मुशीत घालून घ्यायचीही तयारी लागते.

लोकापवाद दूर करण्यासाठी स्यमंतकाची लढाई  कृष्णाला लढावी लागली. एकदा नव्हे दोनदा. त्यामुळेच लोकांच्या मनात कृष्णाबद्दल असलेला संदेह दूर झाला. `कृष्ण चोर आहे. त्यानेच स्यमन्तक मण्याचा अपहार केला. केंव्हापासून त्याचाच त्या मण्यावर डोळा होता' ह्या सर्व वादातून कृष्ण परत एकदा स्वच्छ प्रतिमेने बाहेर आला. कृष्णवचनावरची लोकांची श्रद्धा दृढ झाली.

कृष्णाची राणी सत्यभामेचा पिता राजा सत्राजित. सत्राजिताला सूर्याकडून मिळालेला स्यमंतक मणी सत्राजिताला रोज आठ भार सोने देत असे. सत्राजिताला कृष्णाने तो मणी मागितला इतकाच काय तो कृष्णाचा ह्या बाबीत संबंध. सत्राजिताने तो कृष्णाला देता स्वतःच्या भावाला प्रसेनाला तो दिला. प्रसेन शिकारीला गेला असता एका वाघानेच त्याची शिकार केली. प्रसेनाच्या गळ्यातील स्यमंतक रानात राहणार्‍या जांबवंताने काढून घेतला आणि स्वतःच्या मुलीला दिला. प्रसेनाचा संशयास्पदरित्या झालेला मृत्यू आणि गायब झालेला स्यमंतक ह्यांचा परस्पर संबंध जोडत सत्राजिताच्या मनातील शंकेची सुई सहजपणे श्रीकृष्णावर स्थिरावली. श्रीकृष्णानेच प्रसेनाला मारून स्यमंतक चोरला हे तो उघड उघड बोलून लोकांचे कृष्णाच्या संबंधी असलेले अनुकूल मत कलुषित करू लागला. कृष्णाची उज्ज्वल प्रतिमा मलीन करण्यास तेवढे कारण पुरेसे होते. स्यमंतक मणी चोरल्याचा आळ कृष्णावर आला. लोक गुप्तपणे तर कधी उघड उघड कृष्णाच्या विरोधात बोलू लागले. ``राजा चोर आहे, रक्षकच भक्षक झाला.'' ह्या आरोळ्या आत्ताच्या नाहीत. हजारो वर्षांपासून विरोधकांची मनस्थिती आणि वागणुकीचा परिचय देणारी आहे. हे सर्व कुठेतरी थांबवणे जरुरीचे होते.  ह्या वावड्या उठवणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी मी चोर नाही, मी कोणालाही लुबाडले नाही हे प्रजेला शांतपणे दाखवून देण्याची, पटवून देण्याची ती वेळ होती. त्यासाठी सुयोग्यपणे अत्यंत खोलवर तपास करणे गरजेचे होते. श्रीकृष्णानेही सर्व गोष्टींचा छडा लावला. प्रसेनाच्या मृत्यूचे कारण शोधले.  जांबवंताशी युद्ध छेडले. जांबवंत रामभक्त असल्याने त्याचा कोणी पराजय करू शकणार नाही हा वर त्याला प्राप्त होता. 21 दिवस युद्ध चालले तरी श्रीकृष्णाचा पराजय होत नाही हे पाहिल्यावर कृष्ण नक्कीच प्रभुरामाचाच अवतार असणार हे जाणून जांबवंताने स्यमंतक कृष्णाला आणि कृष्णाने सत्राजिताला परत केला. कृष्णाचा खरेपणा, सत्यवादी स्वभाव पाहून जांबवंताने आपली मुलगी जांबवंती तर सत्राजिताने त्याची मुलगी सत्यभामा कृष्णास दिली.

ही गोष्ट येथेच संपली नाही. पुढे काही काळानंतर वारणावतला लाक्षागृहात पांडवांचा मृत्यू झाला अशी खात्री झाल्याने कौरव आणि धृतराष्ट्राने हस्तिनापुरात योजलेल्या पांडवांच्या अखेरच्या क्रियाकर्माला किमान तोंडदेखले जाणे कृष्ण-बलरामाला आवश्यक होते. सत्य वेगळे आहे हे माहित असूनही सत्य उघड करायची योग्यवेळ येईपर्यंत मौन राहणे आवश्यक होते.

श्रीकृष्णाविरुद्ध कुरापत काढण्यास टपून बसलेल्या अक्रूर आणि कृतवर्म्याने ह्या संधीचा गैरफायदा घेतला. सत्राजिताने सत्यभामा शतधन्व्यास देण्याचे कबूल केले होते. पण श्रीकृष्णाचा प्रामाणिकपणा पाहून ती श्रीकृष्णाला दिली त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी शतधनव्याला सत्राजिताविरुद्ध भडकवले. श्रीकृष्ण नसतांना शतधन्व्याने सत्राजितास मोठ्या क्रूरपणे ठार करून स्यमंतक ताब्यात घेतला. वडिलांच्या मृत्यूने हादरून गेलेली सत्यभामा वडिलांचा मृतदेह तेलात ठेऊन थेट हस्तिनापूरच्या दिशेने निघाली.

सत्यभामेकडून ही गोष्ट कानावर येताच श्रीकृष्ण द्वारकेला येता शतधन्व्याच्या मागावर गेले. कृष्ण येत आहे हे कळताच कृष्णाच्या भयाने शतधन्व्याने स्यमंतक अक्रूराकडे सोपवला. अक्रूरावर कृष्णाचा विश्वास आहे हे शतधन्वा जाणून होता.  कृष्णाने शतधन्वाला ठार मारले  पण शतधन्वाकडे स्यमंतक मणी आढळला नाही. शतधन्वाला मारून स्यमंन्तक परत कृष्णानेच चोरला असे बलरामाला आणि सत्यभामेला वाटले. आणि त्यामुळे बलराम निघून गेला असे काहींचे म्हणणे आहे तर काहींच्या मते  स्यमन्तकाचा शोध घेण्यास एकटा कृष्ण समर्थ आहे हे बलराम जाणून होते. त्यामुळे कृष्णाला द्वारकेला पाठवून बलराम त्यांच्या मित्रास विदर्भराज मिथिला नरेश जनकाला भेटवयास गेले. काहीही असो. पण बलराम अनेक वर्ष द्वारकेपासून दूर राहिले हे खरे.

श्रीकृष्ण एकटा द्वारकेला येताच तेथील लोकांनी कृष्णविरोधात मोठे आंदोलन उभारले आणि मोठ्या कडकपणे कृष्णाचा निषेध केला. स्यमंतकासाठी कृष्णाने बलरामाचाही त्याग केला अशा अफवांनी सारे द्वारकेचे वातावरण कृष्णविरोधी झाले. स्यमंतकाचा जरासाही लोभ नसतांना झालेल्या अपमानाने श्रीकृष्ण फार दुःखी झाले. त्याचवेळेस अक्रूर आणि कृतवर्मा गायब असल्याचे कृष्णाच्या लक्षात आले.

अक्रूरासंदर्भात एक गोष्ट अशी होती की अक्रूर ज्या राज्यात रहात असे तेथे पाऊसपाणी चांगले होत असे आणि कुठले साथीचे रोग येत नसत. त्या संदर्भात अशी आख्यायिका होती की, एकदा काशीराज्यात दुष्काळ पडल्याने काशीराजाने श्वफल्काला बोलावून श्वफल्कासोबत त्याच्या मुलीचा गांदिनीचा विवाह केला. श्वफल्क जेथे जाईल तेथे उत्तम पाऊस होत असे. त्याप्रमाणे काशीराज्यातही उत्तम पाऊस झाला. अक्रूर हा श्वफल्काचाच मुलगा असल्याने त्याच्याही बाबतीत असेच घडत असे. त्यामुळे कृष्णाने अक्रूराचा माग काढला आणि मोठ्या प्रेमाने त्याला बोलावून घेतले. त्याचे भव्य स्वागत सत्कार करून त्याच्याशी गोड गोड बोलून मरतांना शतधन्वाने स्यमंतक अक्रूराकडे दिला असल्याचे सांगितले. कृष्णाच्या ह्या चालीत अक्रूर अलगद अडकला आणि त्याने स्यमंतक त्याच्याचपाशी असल्याचे कबूल केले.

स्यमंतकाचा मोह कृष्णाला नव्हताच त्यामुळे त्याने अक्रूराला तो मणी लोकांना तसेच जांबुवंतीला आणि सत्यभामेला दाखवायला लावून तो अक्रूराकडेच कायम ठेवला. आणि स्वतःवरचा लोकापवादाचा डागही कायमचा दूर केला. खरतर स्यमंतक चोरीमधे अक्रूर शतधन्व्याइतकाच दोषी होता. त्याने फूस लावण्यामुळेच शतधन्वा सत्राजिताला ठार मारण्यास उद्युक्त झाला होता. असे असतांनाही शतधन्व्याला ठार करणार्‍या कृष्णाच्या राजनितीज्ञ असल्याची एक चुणुक पहायला मिळते. अक्रूर जेथे राहील तेथे पाऊसपाणी उत्तम होते ही माहिती अलगद वापरून घेऊन त्याने आपल्याही प्रजेचे हित साधून घेतले आहे.

-----------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –