कालिया -

 

कालिया -

कृष्णाला मारण्यासाठी कंस सतत दहशतवादी राक्षसांना पाठवत राहिला आणि कृष्ण त्यांचा नायनाट करत राहिला. पुतना, शकटक, तृणावर्त, वत्सासुर, बकासुर, अघासुर, धेनुकासुर, प्रलंबासुर असे अनेक मारेकरी आले आणि स्वर्गलोकी गेले. पण कृष्णाने गोकुळात दिलेले दोन लढे पूर्ण वेगळे होते. एक होता गतानुगतिक परंपरांना संपवून नवीन आशादायी जास्त निरोगी, सकस परंपरा सुरू करणारा गोवर्धनाचा लढा तर दुसरा होता घरात घुसलेल्या शत्रूला पिटाळून लावणारा कालियाचा लढा. हा लढाच वेगळा होता. कालिया आणि कंसाचे हेतू पूर्ण वेगळे आहेत. कालिया कृष्णाला मारण्यासाठी गोकुळात आला नव्हता. कालिया दुसर्‍या देशातून आलेला घुसखोर होता. वृंदावन परिसरातील समृद्ध भूभाग आणि यमुनेचं पाणी बळकावून त्याने तिथेच डेरा टाकला होता.

जसा एखादा दुर्धर रोग त्याच्या त्याच्या त्याच्या कलेने रोग्याला कळु देता रोग्याच्या शरीरात हळु हळु पसरत राहतो. शरीर पोखरत राहतो तरीही वर वर कुठलीच लक्षण दिसत नाहीत; रोगाचं अस्तित्व कळत नाही. लवकर निदान होत नाही; आणि निदान होते तेंव्हा उशीर झालेला असतो; तसे काही शत्रूही प्रतिस्पर्धी शत्रूच्या राज्यात गुपचुप शिरकाव करून तेथे रहायला सुरवात करतात. त्यांना कोणी ओळखत नसतं. सकृत् दर्शनी साधासुधा, निरुपद्रवी, निष्पाप, भोळसट, दुबळा वाटण्यामुळे लोकांच्या डोळ्यात भरलेला, खुपलेला हा शत्रू दुर्लक्षितच राहून जातो. ह्या सर्वाचा फायदा घेऊन तो शांतपणे स्वार्थ साधण्यात तत्पर असतो. लोकांच्या नजरेत भरल्याचा फायदा घेऊन तो कधी आपण लोकांच्याच हिताचे वागत आहोत असे दाखवून तर कधी गोडीगुलाबीने तर हळुहळु साम, दाम दंड भेद या नीतीने सुपीक जमीनी, मोक्याच्या जागा, पाणी, नैसर्गिक साधनसम्पत्तीवर कब्जा करतो. हळु हळु राज्यातील एका एका महत्वाच्या निर्णयप्रक्रियेतील समित्यांमधे, शासकीय खात्यातील महत्त्वाच्या खात्यांमधील जागांवर शिरकाव करत स्वतःचा जम बसवायला लागला की मात्र राज्यासाठी कमालीची डोकेदुखी ठरतो.

उपेक्षेत शत्रुं स्वं प्रसरन्तं यदृच्छया।

रोगञ्चास्यसंयुक्तः शनैस्तेन हन्यते ।।

असा शत्रू किंवा रोग योग्यवेळी कळला तर बरे. किमान योग्य चिकित्सेने त्याला आटोक्यात आणता येते. पण कळल्यानंतरही त्याला दबून, घाबरून, आता काय होणार? वा दुर्लक्ष करून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली गेली नाही तर तिसर्‍या, चौथ्या टप्प्यातील कॅन्सरसारखा घातक असतो. वेळच्या वेळी औषधोपचाराने आटोक्यात आणले नाही तर तो एखाद्या बलाढ्य भरभक्कम प्रकृतीच्या माणसालाही हळु हळु आतून पोखरत निकामी करून टाकतो. शत्रूचेही तसेच असते. तो महाप्रबळ होऊन राज्यालाच घातक ठरतो. अशा शत्रूंच्या घुसखोरीवर, शिरकावावर, हालचालींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतं. कालियाही असाच होता.

श्रीकृष्णाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, शत्रूची खडान खडा माहिती, त्याची पार्श्वभूमी, त्याचे गुण, अवगुण, त्याच्यातील मर्मभेद करता येईल अशी स्थाने श्रीकृष्ण आधीच जाणून घेत असे.  प्रचंड आत्मविश्वासाने, सर्व तयारीनिशी संग्रामासाठी उतरणार्‍या श्रीकृष्णाला त्यामुळे भय ही दोन अक्षरे माहितच नव्हती. अस्वलाआधी आरोळी ह्या उक्तीला अनुसरून शत्रूने चाल करून येण्यापूर्वीच बेसावध शत्रूची नाकेबंदी करायची योजना श्रीकृष्णाने आधीच आखलेली असे. त्याप्रमाणे तो ती अमलातही आणत होता. कोणाला कृष्णाचे काही लढे अकस्मिक /अचानक लढले असे वाटले तरी त्यामागे संपूर्ण इतिहास कृष्णाने अभ्यासून मगच पाऊल टाकल्याचे दिसते. त्यामुळेच सर्व घटना कृष्णाने जशा ठरवल्या असतील तशाच घडतांना दिसतात. जेथे अन्याय दिसेल तेथे कुणाच्या मदतीचीही वाट बघता कष्ण पुढे सरसावला आहे. त्याला देवत्व देतांना आपण कृष्णाची अभ्यासू वृत्ती, दूरदर्शीपणा, शत्रूचा समग्र इतिहास अवगत करणे, आणि त्यानुसार त्याचे योजनाबद्ध परिश्रम कधीही विचारात घेत नाही. तो देव असल्यामुळे त्याला जसं घडवायचं होत तसं त्याने घडवलं असं म्हणून मोकळे होतो.

मग वर उल्लेख आलेला हा कालिया कोण ?  कालिया कुठला? कालिया हा काही कोणी जलचर प्राणी नव्हता मग तो यमुनेच्या डोहात का आला? (आपण जरी कालियाडोह असा उल्लेख करत असलो तरी आजही यमुनेच्या काठी कालियादह नावाचे गाव आहे. कालिया तेथे रहात होता असे तेथील लोक सांगतात.)  कालियाचा इतिहास जाणून घेतला तर दिसेल की कालिया हा भारताचा, वृंदावनचा वा कालियादहचा रहिवासीही नव्हताच. तेंव्हा भारत/जम्बुद्वीपाची आठ उपद्वीपे होती. स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन, रमणक, मानदहरिण, पाञ्चजन्य, सिंहल आणि लंका. कालिया हा रमणक ह्या उपद्वीपाचा रहिवासी होता. रमणक द्वीपावर तेंव्हा गरुडाचे राज्य होते. गरुडाची आगळीक केल्याने गरुडाचा कालीयावर राग होता.  त्याच्यापासून बचाव व्हावा ह्या प्राणभयाने कालिया रमणकावरून परागंदा झाला. कालियाने थेट यमुनेचा आश्रय घेतला. रमणक सोडून कालिया थेट यमुनेच्या डोहात दाखल होण्याचे कारणही तसेच होते. यमुनेच्या ह्या डोहापाशी सौभरी ऋषींचा आश्रम होता. ह्या डोहात अनेक मासे होते. गरूड हे मासे खात असे. सौभरी ऋषींनी गरुडाला तेथे येऊन मासे खाण्यास मनाई केली. तरीही त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून गरूड मासे खात राहिला. त्यामुळे सौभरी ऋषींनी गरुडाला शाप दिला की, `गरूड जर परत यमुनेच्या डोहात परत आला तर तो मरण पावेल.' त्यामुळे यमुनादह गरुडासाठी असुरक्षित तर कालियासाठी सुरक्षित होता. गरुडाची नजर कितीही तिखट असली, त्याच्या बळकट पंखांद्वारे त्याला कुठलीही जागा अगम्य नसली किंवा त्याच्या मजबूत पंज्यांची पकड कितीही घट्ट असली तरी गरुड यमुनेच्या ह्या डोहापाशी येऊ शकत नव्हता. त्यामुळेच आपल्या कुटुंब कबिल्यासह कालिया यमुनेकाठी वस्तीला आला होता. गोकुळाचे नागरिकही आक्रमक नसून सौम्य होते. कालियाला तू येथे कसा आलास हा जाब त्यांनी विचारला नाही. आणि नागरीकांची `जाऊ दे ना. कशाला विचारा आणि टोका' हीच उदासीन वृत्ती चढाईखोर, आक्रमक, दबाव तंत्र वापरणार्‍या आणि शांतवृत्तीच्या जनसामान्यांवर हुकुमत गाजवणार्‍या कालियाच्या पथ्यावरच पडली.

 आपण येथे सुरक्षित आहोत, येथे आपल्याला कोठला धोका नाही ही खात्री झाल्यावर ह्या परकीयाने हळु हळु तेथील नैसर्गिक साधनसम्पत्तीवर तसेच यमुनेच्या पाण्यावर आपला अधिकार जमवायला सुरवात केली. तो त्या पाण्याच्या आजूबाजूस कोणालाही फिरकू देत नसे. गोपांचा यमुनेच्या पाण्यावर पहिला हक्क होता. तरीही सर्व नियमांची पायमल्ली करत `उलटा चोर कोतवालको डाटे' ह्या न्यायाने त्यानेच वनवासी, अप्रगत समजून गोपालकांना धाकात ठेवले होते. जो कोणी तेथे पाणी घ्यावयास येई त्याला तो ठार मारत असे. गायी गुरांनाही तो तेथे फिरकू देत नसे. उंटाला मिळाली ओसरी आणि हळु हळु पाय पसरी त्याप्रमाणे ह्या परकीयाने यमुनेच्या पाण्याभोवती त्याची सत्ता मजबूत करायला सुरवात केली. यमुनेच्या पाण्यावर कालियादहच्या आजूबाजूच्या प्रदेशावर त्याने आपला हक्क प्रस्थापित केला. गायी गुरांना लागणारे गवत यमुनेच्या किनार्‍यावर चांगले वाढत असे. त्याने त्याचाही नायनाट केला. वृंदावनच्या गोपांचे आयुष्य ज्या झाडांवर अवलंबून होते ती वृक्षराजी त्याने नामशेष केली. कालियाचे प्रस्थ वाढतच गेले.

शत्रूने आपली कुरापत काढल्यानंतरही जर आपण स्वस्थच बसलो, त्याच्यावर काही कारवाई केली नाही तर शत्रूचं मनोबल वाढून तो कुरापतींची तीव्रता आणि क्षेत्र अजून वाढवू शकतो. सतत जर शत्रूकडे दुर्लक्ष केलं, त्याच्या आगळीकीकडे कानाडोळा केला अथवा शत्रूच्या कारनाम्यांची आपल्याला गहनताच लक्षात आली नाही तर त्याचं धाडसं एवढं वाढतं की तो आपलाच निप्पात करतो. त्यामुळे शत्रूच्या कारवायांकडे डोळ्यात तेल घालून जागरूकपणे पाहणे , त्याला वेळच्यावेळी चोख प्रत्युत्तर देणे हे आवश्यकच आहे.

इस्रायलने इराणच्या अत्यंत महत्त्वपूर्ण जनरल कासिम सुलेमानींना जेव्हां ठार मारले  तेव्हा इराणने आम्ही बदला घेऊ अशी नुसतीच धमकी दिली पण काहीही कृती केली नाही. इराणच्या ह्या नाकर्तेपणाच्या कृतीची इस्रायलने चांगली दखल घेतली. अत्यंत योजनाबद्धपणे हल्ला करून त्यांच्या फक्रिझादे fakhrizadeh ह्या  इराणच्या महत्त्वाच्या न्युक्लिअर शास्त्रज्ञाला मारले त्याउलट भारताच्या सैनिक तुकडीला कारगील रसत्यावर मारल्यावर मोदींनी बाळाकोटमधे घुसून हल्ला केल्याने काही काळ तरी पाकिस्तान गप्प बसला. 

 कालियाचं प्रस्थ वाढू दिल्याने पाण्याअभावी गोपालक, त्यांची गायीगुरे सारेच हवालदील झाले. तरीही दिसामाजी बलाढ्य झालेल्या कालियाविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिम्मत नव्हती. ह्या उपद्व्यापी परदेशी पाहुण्या नागरीकाला तेथून हाकलवून लावणे जरुरीचे होते. पण यशोदा असो नंद असो किंवा इतर वृंदावनवासी असोत कालियाच्या दहशतीने दबून कालियाशी लढण्याऐवजी, त्या दुष्टाचा नायनाट करण्याऐवजी, त्याला हाकलवून देण्याऐवजी म्हणून त्याला आापल्याच राज्यात सुरक्षित आणि सुस्थिर करत होते. `कोणी त्याच्या वाटेला जाऊ नका.' म्हणूनच सर्व बाळगोपाळांना सांगत होते. खरेतर दुष्टांविरुद्ध वेळच्यावेळी पाऊल उचलून त्यांचा नायनाट करायलाच पाहिजे.

कृष्ण योग्य संधी शोधत होता. एकदा बलरामही सोबत नव्हता. गायी चरायला घेऊन गेलेला कृष्ण सवंगड्यांसोबत चेंडू खेळत होता. खेळता खेळता कृष्णाने श्रीदामाचा चेंडू कालियाच्या डोहात टाकला. श्रीदामा आपला चेंडू पाण्यात पडलेला पाहून कृष्णावर रागावला. ``तू माझा चेंडू पाण्यात टाकलास आता तूच बाहेर काढ'' म्हणू लागला.  हीच संधी होती. वा अशी संधी कृष्णाने तयार केली होती. यमुनेकाठची झाडं कालियाच्या बेपर्वा आणि पर्यावरणाला धोकादायक अशा कृतींमुळे पार जळून गेली होती. कृष्ण तेथील वठलेल्या एका कदंबाच्या झाडावर चढला. एकाद्या मल्लाप्रमाणे मांडीवर थोपटून कालियाला आव्हान दिले आणि त्याने डोहामधे उडी मारली. सारे गोप कृष्णाला नको नको म्हणून विनवीत असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कृष्णाने यमुनेच्या डोहात उडी मारली. कृष्णाने कालियाच्या डोहात उडी मारली. ही वार्ता हा हा म्हणता वार्‍यासारखी गोकुळात पसरली आणि सारे गोकुळ धावत कालिया डोहापाशी जमले. यमुनेच्या डोहात स्वतःची सत्ता स्थापन केलेला कालिया संतापला.  कृष्णावर धावून गेला. कालियाला आपल्या सामर्थ्याचा, बळाचा माज होता. मला कोण काय करु शकते? असा उन्मत्तपणा त्याच्या नसानसात भरला होता. येथे सत्ता कालियाची चालते अन्य कोणाची नाही असा पराकोटीचा अहंकार असलेला कालिया त्यांच्याच राज्यात राहून वृंदावनवासी गोपालकांना तुच्छ समजत होता. त्यांचा द्वेष करत होता. आसरा देणार्‍यावरच फुत्कारणारा असल्यानेही कदाचित त्याला सारे साप म्हणत असतील त्याला असलेले शंभर फणे तो कोणासमोरही वाकवत नसे असे त्याचे वर्णन म्हणजे महा विखारी, अहंकारी व्यक्तीचे वर्णन असावे.

पाण्यात उडी घेतलेल्या कृष्णाच्या शरीराभोवती घट्ट विळखा घालून, कालिया कृष्णाला श्वास कोंडून मारायचा प्रयत्न करू लागला. कालियाच्या विळख्यात थरथर कापणारा कृष्ण पाहून सारे गोप, गोपी, यशोदा रडू लागले. पण मल्लविद्येत, कुस्तीत निष्णात असलेल्या कृष्णाला त्याचे शरीर फुगवता येत असे. कालियाने कृष्णाभोवतीचा विळखा घट्ट करताच कृष्णाने त्याचे शरीर फुगवायलाला सुरवात केली. कालियाचा देह जागोजागी फाटला,फुटला. त्याचा विळखा सैल पडला. कृष्णाने कालियाला स्वबळावर नमवले. एका हातात चेंडु तर दुस र्‍या हातात बासरी घेतलेला लोभस कृष्ण कालियाच्या फण्यांवर नाचत असलेला पाहून गोपाळांच्या जीवात जीव आला.

कालियामर्दनाचे अत्यंत रोचक वर्णन प्रज्ञाभारती कै. श्रीधर वर्णेकर ह्यांच्या वात्सल्यरसायन ह्या काव्याचा अनुवाद खाली दिला आहे.

कालिंदिच्या भयद खोल विशाल डोही

जाऊ नकोस कधिही म्हणतीच गोपी

तो कालियाचि बसला लपुनी विषारी

सांगुनि त्या अडविती हरिसीच गोपी।। 72.1

 

दुर्लक्षुनीच उपदेशचि गोपिकांचा

कालिंदिच्या तिरि कदंब-तरूवरी हा

राहीच निर्भय उभा करुनी पुकारा

ये कालिया लपु नको बघतो तुला हां! ।।

 

आव्हान थोपटुनि दे, हरि दंड, मांड्या

खेळेचि कुस्ति समवेतचि कालियाच्या

जो बालमल्ल नमवी अति क्रूर नागा

घेओ चिरंतन मनी हरि तो विसावा।।72.3

 

घालून सर्प विळखे हरिच्याच अंगा

वेढून रज्जुसम तो करि बद्ध कृष्णा

कंठात श्वास अडला हरि कापतो हा

पाहून हंबरति ह्या प्रिय धेनु सार्‍या।।73.1

 

गाई-गुरांसहि असे प्रिय जो कन्हैया

माझ्याच अंतरि वसो गुणिबाळ कान्हा।।73.2

 

 

 

फुत्कारुनीच उसळे अति घोर सर्प

घेई तयावरि उडी चकवोनि त्यास

काढे तया घुसळुनी हरि अंग अंग

झालाचि तो गलितगात्र विशाल नाग।।74.1

 

विस्फारल्या विषभर्‍या अति भव्यची त्या -

नाचे फण्यावरि सुखे हरि कालियाच्या

रंगीत त्या चमकत्या खल कालियाचा

जो रंगमंच करितो करण्यासि नृत्या।।74.2

 

जो मोहवी जनमना नटराज छोटा

तो कृष्ण बाल-नटची हृदयी रहावा।।74.3

 

कालियाच्या एका फण्यावर पाय देताच कालियाचा दुसरा फणा वर येई. पण कालियाच्या सर्व फण्यांवर पदाघात करून कृष्णाने त्याचा अहंकार चूर चूर करून टाकला. कोणापुढेही मान तुकवणार्‍या कालियाच्या फण्यावर नाचणार्‍या कृष्णाने रक्तबंबाळ झालेल्या कालियाचा अहंकार मातीला मिळवला. कालियाच्या डोक्यावर कृष्णाचे पदचिन्ह कायम राहिले. कृष्णाकडून झालेल्या दारूण पराभवाचा कलंक कालियाच्या माथी कायमचा चिकटला. कालियाच्या स्त्रिया कालियाच्या मदतीला धावल्या आणि कृष्णाला दयेची, कालियाच्य प्राणांची भीक मागू लागल्या.

कालियाच्या स्त्रियांच्या विनवणीमुळे कृष्णाने कालियाला ठार मारले नाही. कालिया शरण आला. अहंकारी कालियाला प्राणांच्या बदल्यात कृष्णाने घातलेल्या जाचक अटी मान्य करण्याशिवाय पर्यायच नव्हता. कालियाने त्याच्या सर्व परिवार, अनुचर आणि स्वजनांसह कालियादह गाव कायमचे सोडून रमणक द्वीपावर कायमचे वास्तव्य करावे ही जाचक अट कालियाला मान्य करायला लागली. त्याबदल्यात गरूडाकडून त्याला प्राणांचे अभय देण्याचे कृष्णाने मान्य केले. कृष्णाच्या सांगण्यामुळे गरूडाच्या राज्यात कालिया राहू शकणार होता पण गरूडाचे नीतीनियम पाळून त्याला दुय्यम दर्जाचे प्रजाजन म्हणून राहणे भाग होते. गरुडाचे अधिपत्य मान्य करणेही भाग होते. कृष्णाने कालियाची पुरती कोंडी केली. आपल्या देशात घुसलेल्या तेथील संस्कृतीशी फटकून वागणारया आगाऊ परदेशी व्यक्तींना वेळीच त्यांच्या देशात परत पाठवून योग्य धडा शिकवावाच लागतो तो असा.

कालियाशी झालेला लढा आणि त्यानंतर त्याला कालियादह गाव सोडून जाण्याचा दिलेला इशारा कालियाने नाइलाजाने मान्य केला तरी वर्षानुवर्ष उपभोग घेतलेली साधनसम्पत्तीने समृद्ध असलेली जागा इतक्या सहजासहजी कोणी सोडत नाहीच. जाता जाता आपल्या शत्रूला जेवढा जोरदार फटका देऊन जाता येईल तेवढा प्रयत्न केला जातोच. जिंकलेला शत्रू बेसावध असला तर ह्या शेवटच्या फटक्यात परत विजयश्री आपल्याकडे खेचून आणता येते. नाहीतर किमान शत्रूचे जेवढे नुकसान शक्य आहे तेवढे तरी करता येते.  कालियानेही तसा विचार नक्कीच केला. आत्ता आत्ता भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि फाळणीनंतर हिंदुंच्या झालेल्या बेसुमार हत्यांचा विचार केल्यावर कुठलंही स्थित्यंतर इतकं सहज, साधं सोपे, सुरळीत विनासंघर्ष, विनारक्तपात होईल असे मानणेही चुकीचेच आहे.

कालियाशी संघर्ष आणि तह ह्या सर्व घडामोडीत सारा दिवस गेला. अंधार पडला. अंधारात गोकुळात परतणं शक्य नव्हतं. सारे गोप, गोपी, गायी, गुरे, मुले दमली होती. सार्‍यांनी यमुनेकाठीच झोपायचा निर्णय घेतला. दिवसभरच्या श्रमाने दमलेल्या सार्‍या गोकुळवासीयांना लगेचच झोप लागली. जाग आली ती  आगीच्या चटक्यांमुळे. सर्व बाजूंनी वणवा पेटला होता. ही नैसर्गिक आपत्ती असू शकते किंवा जाता जाता कालियाने केलेला हा विध्वंसही असू शकतो. समुद्रमंथनातून अमृताच्या सोबतीने परिणामस्वरूप वर आलेले हालाहल शिवाने आपल्या कंठात धारण केल्याचे आपण जाणतो पण यमुना मुक्तीसंग्रामा नंतर कालियाने जाता जाता घातलेल्या हैदोसाची आग, सर्व बेसावध वृंदानवासीयांना जाळून टाकण्यास पुरेशी होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अभूतपूर्व कामगिरी कृष्णाने केली आहे. हा दावानल कृष्णाने प्राशन केल्याची, रिचवल्याची, दखल आपण फारच क्वचित घेतो. किंवा कृष्णाच्या देवत्वाच्या नावाखाली कृष्णाच्या फार मोठ्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करतो.

घरात शिरलेला साप घराबाहेर निघून जाईपर्यंत अथवा त्याला ठार मारले जात नाही तोपर्यंत जागरूक असावे. स्वस्थपणे झोपू नये. जो  झोपतो तो स्वतःचे मरण ओढवून घेत असतो. माघार घेणारा शत्रू आणि शत्रुसैन्य ह्यांच्यापासून कायम सावधच रहायला पाहिजे.

ही कालियाने लावलेली आग असावी असं म्हणायला वाव अशासाठी आहे की, पुढे महाभारत युद्धातील एक घटना ह्या घटनेशी मिळती जुळती आहे. दुर्योधन रणांगणात पडला. भीमाने त्याची मांडी गदेने फोडली. युद्ध संपलं असं वाटलं तेंव्हाही अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा हे तीन शत्रुवीर शेष आहेत आणि ते राख साचलेल्या निखार्‍यांप्रमाणे वरवर विझलेले वाटले तरी सर्व काही जाळून टाकायची क्षमता असलेले आहेत हे जाणून कृष्णाने पांडवांना त्यांच्या शिबिरात झोपण्याचा सल्ला दिला. सल्ला सर्वांना दिला असला तरी पाच पांडवांव्यतिरिक्त तो कोणी मनावर घेतला नाही. त्याच रात्री सूडाने पेटलेला अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा पांडवांच्या शिबिरात घुसले. युद्ध संपलं ह्या विश्वासाने गाढ झोपलेल्या पांडव योध्यांना त्यांनी कापून काढलं. कृपाचार्यांनी सर्व शिबिरात आग लावली. कोणीही दरवाजातून बाहेर पडणार नाही याची खात्री केली. चुकून जरी पांडव तेथे असते तर जिंकलेल्या युद्धाचं पारड कधीच दुसर्‍या बाजूस झुकायला वेळ लागला नसता.

ह्या सर्व गोष्टींचा इतिहास म्हणून आपण विचार करायला पाहिजे. आत्ताच्या मितीस त्यांचे काही आत्ताच्या घडामोडींशी साधर्म्य आहे. त्याचे निराकरण करण्याचे उत्तर जणु कृष्णाने दिले आहे. 

हजारो वर्षांपूर्वीच्या यमुनेच्या पाण्याच्या समस्येशी तंतोतंत जुळणा र्‍या  समस्या आजही कमी नाहीत. आजही मराठवाड्यातील पाण्याची समस्या ह्या परकीयांच्या आक्रमाणातून जास्त जटिल झालेली  आहे. सातशे साडेसातशे वर्षांपूर्वी भारतावर जी आक्रमणे झाली त्यात अरब, येमेन अशा निसर्गतःच वाळवंटी भागात राहणार्‍या लोकांचा समावेश होता. त्यांनी भारताचा भूभाग जिंकून घेताच येथील नैसर्गिक साधनसम्पत्ती मग ते मुख्य मुख्य पाण्याचे स्त्रोत असतील वा अत्यंत सुपीक जमीन असेल, आपल्या कब्जात घेतले. आणि मूळ रहिवाश्यांना दुष्काळी प्रदेशात हाकलवून दिले. आजही हे पाण्याचे स्त्रोत काही मुठभर लोकांच्याच अधिकाराखाली असण्याने त्यांच्या उसाच्या मळ्यांना, फळबागांना मुबलक पाणी लाभते. इतर जनता मात्र पाण्याविना हालात जगते. हे सर्व पाण्याचे स्त्रोत आजही सर्व जनतेला सारख्याप्रमाणात उपलब्ध करून दिल्यास लातूर असो वा मराठवाडा पाण्याची समस्या बर्‍याच अंशी कमी होईल. कालियाची वृत्ती ही त्या काळापासून आजपर्यंत तशीच आहे.

आजच्या मितीस भारतात कालियासदृश अनेक परदेशी नागरीकांनी तळ ठोकला आहे. ह्या लोकांना स्थानिक जनतेबद्दल ना आपुलकी असते ना त्यांच्या हिताची चिंता. येथील साधन संपत्तीचा अपहार करून नियमबाह्यरीतीने येथील जागा बळकावून स्थानिकांनाच धमकावून ते राहातात. त्यांच्या आक्रमक चढाईखोर वृत्तीने स्थानिक लोकच त्यांच्यासमोर दबून वागतात. ते बांगला देशी असतील, रोहिंग्या असतील, इराणी, अफगाण नायजेरियन असतील. ड्रग्जची चोरटी आयात, स्त्रिया, मुले, मुली यांना फसवून, फूस लावून पळवून त्यांची दुसर्‍या देशांमधे विक्री करणे, अशा शेकडो नियमबाह्य गोष्टींचे जे विषारी फणे त्यांनी आपल्यावरच फुत्कारण्यासाठी उगारले आहेत, ते ठेचणे आवश्यक आहे. त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून त्यांच्या देशात घालवून देणे हा एकमेव योग्य उपाय आहे.

 ईशान्य भारतात गारो, राभा, जैंतिया अशा अनेक आदिवासी जमाती आहेत. बांगलादेशी घुसखोर एखाद्या रात्री गारोंचे गाव जाळून टाकतात. अफवा अशी पसरवतात की राभांनी हे कृत्य केले. मग राभा जाऊन गारोंचं गाव जाळून टाकतात. अशाप्रकारे गारो-राभात दंगली सुरू होतात. बांगलादेशी मुस्लीम शांतपणे मजा बघत आपला स्वार्थ साधत राहतात. दोन्ही बाजूंनी 20-25 गावात जाळपोळ झाली की मग तेथील दोन्ही जनजाती समुदाय निर्वासितांच्या शिबिरात राहतात. त्यांपैकी कोणीही भीतीने आपापल्या गावात परत जाऊ इच्छित नसतो. मग त्या जागांवर बांगलादेशी मुसलमान आपली घरं थाटायला सुरवात करतात. अशा प्रकारचा खेळ गेली कित्येक वर्ष तेथे चालू आहे. तेथे स्थलांतरीत  झालेले ख्रिश्चन मिशनरीही अशीच खेळी खेळतात. आसाममधे स्थलांतरित झालेले ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार मधील हिंदू, चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार आदिंबद्दल स्थानिकांची माथी भडकविण्यासाठी प्रयत्नशील असतात. मग दहशतवाद्यांच्या माध्यमातून एखाद्या बिहारी हिंदूची हत्या  वगैरे प्रकार घडत राहतात. मग `बिहारी विरुद्ध आसामी' असं भांडण सुरू होतं. अशी षड्यंत्र ईशान्य भारतात चीनच्या, अमेरिकन बाप्टिस्ट चर्च, कॅथॉलिक चर्चच्या छुप्या प्रोत्साहनातून गेली अनेक वर्षे रचली जात आहेत. (सुनील देवधर यांच्या लेखातून मुंबई तरुण भारत 14 डिसेंबर 2019 पान क्र. -5)

 

--------------------------------------------

 

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –