॥ रामरक्षा आणि मी ॥

 

॥ रामरक्षा आणि मी ॥

                        एका गावामधे एक श्रीमंत परिवार रहात होता पण जणु काही दृष्ट लागावी तशी बघता बघता ह्या सधन परिवाराची घसरण सुरू झाली. एकदा गावात आलेल्या नव्या साधू महाराजांची ख्याती ऐकून ह्या घरातील मोठी स्त्री त्यांच्याकडे गेली. आणि परत चांगले दिवस यावेत ह्यासाठी काही उपाय विचारू लागली. साधूने घरातील सर्व माणसांची माहिती विचारून घेतली आणि थोडा विचार करून त्याच्या झोळीतून धूपाची एक पुडी काढली आणि म्हणाला, `` रोज ह्यातील धूप धूपदाणीत जाळून दिवसातून तिनदा सकाळ, दुपार, संध्याकाळ घराच्या कानाकोपर्‍यातून फिरवत जा. हे काम मात्र तूच केले पाहिजेस. घरातल्या बाकी कोणालाही हे काम सांगता कामा नये.

                              बाई तसे करू लागल्या आणि बघता बघता काही महिन्यांमधेच पूर्वीचे चांगले दिवस येऊ लागले. पण बाईंकडचा धूप संपत आल्याने मोठ्या काळजीने बाईंनी साधूकडे धाव घेतली. साधू हसत म्हणाला, ``धूपाचं काम संपलं. अहो साधा धूप होता तो. जसजशी तुमची श्रीमंती वाढत गेली तशी तुम्ही घर सोडून बाहेर पार्ट्यांना, भिशीला, शॉपिंगला मैत्रिणींसोबत पिकनिकांना/सहलीला बाहेर जायला लागला. घरातल्यांवर असलेला तुमचा वचक संपला. नोकर चाकर जे मिळेल ते पळवायला लागले. मुलेही नोकरांच्या संगतीत बिघडून वाईट मार्गाला लागली. घरामधे तुम्हाला धूप फिरवायला सागतांना माझा उद्देश तुम्ही तिन्ही त्रिकाळ घरात लक्ष घाला असा होता. घरात धूप फिरवायच्या नेमामुळे तुम्ही बाहेरच्या पार्ट्या, सिनेमे, पिकनिका, भिशा सर्व सोडून घरात परत नव्याने लक्ष देऊ लागला. आणि उद्देश सफळ झाला. हल्लीच्या मॅनेजमेटच्या जमान्यात तुम्हीच ह्याला Roving Management म्हणता. म्हणजे आपल्या कामाच्या जागेवर फिरत रहायचं आणि जिथे जिथे कमतरता दिसेल, जिथे चुका दिसतील त्या तेथल्या तथे दुरुस्त करायच्या. धूप फिरवायच्या निमित्ताने तिन्ही त्रिकाळ कोपर्‍या कोपर्‍यातून फिरतांना तुम्हाला नोकर काय करताएत, कामं न करता चटोरगिरी तर करत नाहीत? मुलं काय करताएत? घरातील जावा, दीर ह्यांनी काय आरंभलय? हे सर्व दिसायला लागलं. प्रत्येकवेळेला तुम्ही त्यांना हे काय चाललय म्हणून टोकायला लागलात. तिजोरीवरची तुमची पक्कड घट्ट झाली. तुमचीच बाहेर चाललेली संपत्ती तुम्हाला दिसायला लागली. आता धूपाचं प्रयोजन संपलं. मी जर `बाई तुम्ही बाहेरची मौज मजा सोडा आणि घरी लक्ष द्या' असं परखडपणे सांगितलं असत तर तुम्ही माझ्यावर स्त्री स्वातंत्र्याचा बडगा उगारला असता.''

                                मला बाळ झाल्यावर असाच एक धूप माझ्या आज्जीने माझ्या हाती दिला होता. म्हणाली, ``बाळाला मांडीवर घेऊन रोज रामरक्षा म्हणत जा हो. बाळाला दृष्टबिष्ट लागणार नाही.'' माझ्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या विज्ञानाधिष्ठित मेंदूलाही तिच्या निष्पाप डोळ्यांकडे पाहून नाही म्हणायचं धाडस झालं नाही आणि हो म्हणाव लागलं. बाळाला मांडीवर घेऊन रोज रामरक्षा म्हणतांना काही दिवसांनी रामरक्षेमागे दडलेलं एक सुंदर गुपित माझ्या लक्षात येऊ लागलं. रामरक्षेमधे रामाची अनेक नावं आहेत ही त्याची गुणविशेषणं आहेत. रामाच्या उत्तमोत्तम, श्रेष्ठ अशा गुणांची, पराक्रमांची स्फुरण देणारी गाथा मनात तेवत ठेवणारी आहेत. प्रत्येक माणसाला उभारी देणारी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव एका एका नावासोबत जोडून त्या त्या अवयवाचे रामाने रक्षण करावे असे बुधकौशिक ऋषी म्हणतात. म्हणजे शरीराचा एकएक अवयव एका एका दिव्य गुणाला जोडून सुश्रुंखलीत केला आहे. अनुस्यूत केला आहे. ही अवयव आणि गुणांची सांगड मोठी विलोभनीय आहे. शिवाय त्या रामनामाची मालिका अशी खुबीने केली आहे की नामाच्या क्रमानुसार रामायणातील घटनाही क्रमवार आठवल्या जातात आणि त्यासोबत रामायणाच्या सर्व प्रसंगांची उजळणी होते.

                                                     बाळाला मांडीवर घेऊन हे म्हणतांना बाळासोबत खेळही होईल म्हणून मी `शिरो मे राघवः पातु' ( राघव माझ्या डोक्याचे रक्षण करो ) असं म्हणतांना बाळाच्या जावळामधून बोटं फिरवत असे. बाळाला अंघोळ घालतांना कधिकधी त्याच्या केसात चिकटून राहिलेले डाळीचे पीठ सावकाश केसातून सोडवत असे. `भालं दशरथात्मजः' (कपाळाचे रक्षण दशरथपुत्र करो) म्हणतांना त्याच्या नाजुकशा कपाळावर माझी बोटं टेकवत असे. आणि हे काय? बाळाला ताप आहे? लगेच जाणवत असे. भुजौ भग्नेशकार्मुकः म्हणतांना त्यांच्या दंडावरच्या BCG कडे माझे लक्ष असे. पादौ बिभीषणः पातु म्हणून पाय बघतांना बाळाच्या पायावर रॅश कधी आला? हे मला लगेच दिसत असे कण्ठम् भरत वन्दितः म्हणतांना गळ्याभोवती हे टोपडं काचतय हं! हे लक्षात येई. हृदयं जामदग्न्यजित् म्हणतांना त्याच्या छातीवर ठेवलेल्या हाताला ठक् ठक् ठक् ठक् ठोक्यांच्या लयीचा परिचय झाला. मध्यं पातु खरध्वंसी म्हणतांना बाळाच्या पोटावर ओठ टेकवून फुर्रऽऽर्र् करायची बाळाला इतकी सवय झाली की `मध्यंशब्द यायच्या आधीच अंग घुसळत ते खुदखुदु लागे. बाळाच्या त्या त्या अवयवाला हात लावतांना त्याला गम्मत वाटून हसू येत असे. आणि आई आपल्याशी खेळत आहे, बोलत आहे ते लक्षपूर्वक ते ऐकत असे.

                           आमची घरे वैयक्तिक कमी आणि सार्वजनिकच जास्त असल्याने सतत लोकांचे जाणे येणे सुरू असे. बाळ सर्वांकडे फिरत असे. पण पातु रामोऽखिलं वपुः। म्हणतांना किंवा बाळ मांडीवर आल्या आल्या मी म्हणू लागले, ``कोणी घेतलं होतं बाळाला? सिगारेटचा वास का येतोय त्याच्या अंगड्याला? त्या व्यक्तीला शोधून परत बिड्या न फुंकण्याची तंबी देत असे. त्याच्या अंगावरचा लहानसा ओरखाडा पाहून बाळापासून माझ्यापासून घरातल्या सर्वांची नखे तपासली जाऊ लागली. बाळासोबतच्या रामरक्षेच्या ह्या सात मिनिटात माझा रोजचा बाळाचा हेल्थचेक पूर्ण होत असे. हा preventive medical checkup बाळापुरता मर्यादित न राहता, घरातल्यांच्याही वाईट सवयींवर लगाम लावत असे. सर्वांनाच बूट चपला काढून नळावर हात पाय धुवून मगच घरात प्रवेश मिळत असे. बाळाच्या पोटाला चावलेला डास पाहून मीही माझा आळशीपणा सोडून मच्छरदाणी लावत असे.

                                           बाळही आपल्या अवयवांची नावं अनुभवण्याच्या खेळासाठी संध्याकाळी वाट बघत असे. आईच्या मांडीवरचा बाळ रांगू लागला तरी `कौसल्येयो दृश्यौ पातु' असं मी म्हणतांना खेळता खेळता मागे वळून, तर कधी आपणच डोळ्यांना हात लावून डोळे मिचकावू लागला. `मध्यं पातु खरध्वंसी' म्हणतांना नेहमीप्रमाणे पोटावर फुर्रऽऽऽ कर म्हणून धावत येऊ लागला.

 

 

                                    आजारी पडल्यावर भीतीपोटी रामरक्षा म्हणायची नसते. बाळ आजारी पडायच्या अधीच घेतलेली ही काळजी असते. कुठल्याही येणार्‍या धोक्याची जाणीव ठेऊन संकटाचा सामना करण्यासाठी, संकट येण्याआधीच आपले हात, पाय, डोळे अशी सर्व इंद्रिय म्हणजेच आपली कामासाठी लागणारी उपकरणं, शस्त्र सज्ज ठेवायला नकोत? आज अशाच एका रामरक्षेची फार फार आवश्यकता आहे मला, तुम्हाला--- आपल्या सर्वांना. देशाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. जेंव्हा शरीर एखाद्या रोगाने पीडित आहे असं दिसतं तेंव्हा त्या रोगाचे जंतू पूर्वी पासून शरीरात सक्रीय असतात. त्याची लक्षण मात्र काही काळाने दिसू लागतात.

                                     भारताचे प्रत्येक प्रांत हे त्याचे अवयवच आहेत. प्रत्येक प्रांताच्या महत्वाच्या बातम्या दिवसातून एकदातरी मी ऐकायला नको? वाचायला नकोत? (सिगारेटच्या धूराप्रमाणे पसरणार्‍या आरोग्य विघातक खोटारड्या प्रचारांनी माहिती तंत्रज्ञानसुद्धा अपंग झाल आहे. कावीळीने जग पिवळं दिसणारे चॅनेल्स आणि वृत्तपत्र भरमसाठ आहेत. त्यातूनही योग्य शोध घ्यायलाच लागतो.) भारताच्या प्रत्येक प्रांताप्रांतावर आपली नजर फिरली गेली पाहिजे. तेथे काय अनिष्ट गोष्टी चालू आहेत हे कुणाच्या बहकाव्यात न येता मी पण जाणून घेतलं पाहिजे. मला काय करायचं आहे? माझा काय त्याच्याशी संबंध? असं मी म्हटलं तर, रोगट जंतूंसारखे तेथे घुसणारे लाभार्थी तसं म्हणत नाहीत. ते आपल्या उदासीनतचा आणि नेभळटपणाचा फायदा उठवत तेथील सर्व गोष्टींचा लाभ वसूल करत पुष्ट होत राहतात. माझ्या नजर न फिरवण्याने, आपल्या नजर न फिरवण्याने, आपण आवाज न उठविण्याने  , आपण थंड राहण्याने हे सर्व घडते मित्रांनो.

                                   मी? `माझा काय रोल आहे याच्यात?' असं म्हणत अंग झटकून मोकळी झाले आहे मी.---- फक्त नावं ठेवायला. -- आणि बघत बसते कुठले तरी अचकट-विचकट शो--- किंवा छान छान वाटणारे आणि मनाला खर्‍या प्रेरक विचारांपासून दूर दूर नेणारे गाणी, नाच! किंबहुना माझ्या सारख्या सामान्य `मी' ने तेच बघावे अशी लोण्यावर डोळा असलेल्या सर्वच बोक्यांची इच्छा आहे. `लोण्यासाठी आम्ही भांडतो तू भांडणात पडू नकोस. शांतपणे टिव्ही बघत बैस. तू काढलेलं लोणी आमच्यापैकी कोण खातो ह्याची उठाठव तू करू नकोस वर्षानुवर्ष तुला असच बसायच आहे. `सर्वं शरणं गच्छामि।' म्हणत.' हा उपदेश अंगवळणी पडला आहे माझ्या. तो मला पुढच्या पिढ्यांनाही पोचवायचा आहे. मध्यंतरी रियासतकार सरदेसाई यांचं ब्रिटिश रियासतीवर नजर फिरवत असतांना एका ब्रिटिश अधिकार्‍या ने लिहून ठेवल्या ओळी वाचनात आल्या. आजही त्या तंतोतंत खर्‍या आहेत असं वाटल.

                                १७५७ च्या प्लासी च्या लढाईत मिरजाफर नी गद्दारी केली होती आणि सिराजुद्दौला चा पराभव होऊन हिंदुस्थानात ब्रिटिश राजवटीची मुळे घट्ट रुजली. तेव्हा मुर्शिदाबाद बंगाल ची राजधानी होती. या विजया नंतर ब्रिटिशांनी तीला कोलकता ला हालवली आणि मुर्शिदाबाद ते कोलकाता अशी सिराजुद्दौला ची धिंड काढली तेव्हा ब्रिटिश गव्हर्नर नी हा प्रसंग लिहून ठेवला आहे की मुर्शिदाबाद ते कोलकाता लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून अधोवदनानी टाळ्या वाजवून आमचे स्वागत करत होते, परंतु यामधील प्रत्येकाने फक्त एक एक दगड उचलून जरी आमच्यावर फेकला असता तर हिंदुस्थान चे वर्तमान वेगळे असते. तेंव्हा मिर जाफर असो वा सिराज उद्दौला असो वा इंग्रज असो सर्वचजण हिंदूना सारख्याच अधमपणानी वागवत होते. आाज तसे नाही. आाज आापला देश स्वतंत्र आाहे. पण आजही त्वेशाने आम्ही फक्त आमचीच कत्तल करतो.

                            आजही रामाचे, कृष्णाचे प्रचंड उर्जा देणारे गुण आम्हाला वारंवार कथन करून आमच्यातील 100 वर्ष झोपणार्‍या राजकुमारीसारखे झोपी गेलेले चैतन्य जागृत करायची नितांत आवश्यकता आहे. पाय पडला तर धूळ सुद्धा उडून डोक्यावर बसते. मग आम्ही का नाही उठणार?

                        सतत भांडणार्‍या बेडकांनी एकदा देवाला राजा दे म्हणून मागणी केली. देवाने खूप सांगितलं तुमचा राजा तुम्हीच निवडा. पण व्यर्थ! शेवटी कंटाळून देवाने एक ओंडका टाकला तळ्यात. तो काहीच करत नाही अगदीच मिळमिळीत आहे हे पाहिल्यावर थोड्याच दिवसात त्यांना त्याचा कंटाळा आला आणि त्यांनी देवाला दुसरा राजा मागितला. मग देवानेही रागवून पाठवलं एका पांढर्‍या शुभ्र बगळ्याला. त्याचा रंग पाहूनच खूश झालेल्या बेडकांना थोड्याच वेळात गोजिरवाण्या बगळ्याने गट्टम करायला करायला सुरवात केली. घाबरलेले बेडूक देवाकडे आक्रोश करत धावू लागले. देव म्हणाला, `` If you don't want a frog as a king then you deserve a log or a stork! आाज ओंडकाही नाही बगळाही नाही आम्ही निवडून दिलेले पंतप्रधान देशाचा कारभार बघतात ही केवढी मोठी गोष्ट आहे.

चला फारा वर्षांपूर्वीच्या माझ्या पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील गोष्टीने आजची कहाणी सुफळ संपूर्ण!

--------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -