खाणे आणि जुन्या म्हणी -


खाणे आणि जुन्या म्हणी -

परकीयांचं नवीन वर्ष असो वा आपलं! होळी, दिवाळी, नाताळ, इदुलफित्र असे कुठले कुठले सण असो वा गणेशोत्सव, नवरात्र, शिवरात्र, कोजागिरी सारखे धार्मिक पूजा उत्सव ! पण फोनवर रोजचा येऊन कोसळणारा  हजारो हजारों मेसेजेस, व्हिडिओ क्लिपा, फोटोंचा व्हॉटसॅप-कचरा डस्टबीनमधे लोटता लोटता नाकीनऊ येतात. प्रत्येक सणांनुसार बदलत्या व्हॉटसॅप गिफ्टा, सोने, दिवे, केक, वाईनचे पेले, रेनडिअर, सांटा------ आणि संदेश न उघडताच डस्टबीनमधे भिरकावले जाऊ लागतात. प्रत्येक जण घराच्या कुठल्यातरी सुरक्षित कोपर्‍यात बसून येड लागल्यागत हातातल्या करमणुकीकडे बघून हसत असतो. मेसेजेसवर डिलिटचा बुलडोझर फिरवता फिरवता सुक्या बरोबर ओलंही जळत तसे काही आवडलेले मेसेजेस कचर्‍यात लोटले जातात.

कोणीतरी `आमच्या हिंदीची समृद्धी' दाखविण्यासाठी `खाणे' या विषयावर पाठविलेल्या पन्नासेक म्हणींचा खजिना माझ्या डिलिटनी लुटला.

खजिना वाचतांना तो मला फार फार मागे घेऊन गेला. सव्वाशे वर्षांपूर्वी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्या द्रष्ट्या लेखकाने लिहिलेला एक लेख काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आला होता. आता मला तो थोडासाच आठवत असला तरी त्यातील विचार एक नवीच दिशा दाखवून गेला. मराठीतील ` खाणे ' ह्या विषयावर त्यांनी अशाच पाचपन्नास म्हणी दिल्या होत्या.

                 रोज समाज जीवनात जे जे घडतं त्याचा पहिला प्रभाव हा भाषेवर पडतो. त्यामुळे भाषा प्रवाही राहते. कालची भाषा आज जुनी होते आणि आजची भाषा उद्या कालबाह्य ठरते. भाषेमधे सतत नवीन शब्दांची भर पडली पाहिजे. नवनवीन विषयांमधील हे शब्द भाषेचे वैभव, समृद्धी वाढवतातच पण ते समाजाच्या उन्नतीचं परिमाणही ठरतात. समाजाने कुठल्या विषयात प्रगती साधली हे त्या त्या कालखंडाची भाषा ठरवत असते. जेवढे विविध विषयातील शब्द भाषेत येत राहतील तेवढी विविध क्षेत्रात त्या माणसांची प्रगती होत आहे असे समजावे.

            भारतात एक कालखंड असा आला की भारतीय समाज सतत होणार्‍या परकीय आक्रमणांनी पार देशोधडीला लागला. ( सोरटी सोमनाथ वाचविण्यासाठी जमलेल्या लाखभर हिंदुंची खुले आम कत्तल करून  सोरटीसोमनाथाची हिरे आणि रत्नांनी जडविलेली,  अधांतरी असलेली पिंड फोडल्याचे पुरावे रियासतकार सरदेसाईंच्या पुस्तकात आजही उपलब्ध आहेत.) इंग्रजांनी उरली सुरली कसर भरून काढली. सर्व कला, ज्ञान ह्यांचा ह्रास झाला. आपल्या धर्मग्रंथांमधे वाट्टेल तसे बदल इंग्रजांनी सोयीस्करपणे करून घेतले. पूर्व पश्चिम समुद्रात दूरवर व्यापार करणार्‍या दर्यावर्दी भारतीयांनी व्यापारच करू नये म्हणून समुद्र पार केला तर प्रायश्चित्त घ्यावं लागतं हा एकच नव्हे तर असे अनेक बदल आपल्या शास्त्रांमधे करवून त्यावर श्रुतीस्मृती पुराणोक्त ही सच्चेपणाची मानली गेलेली मोहोर लुच्चेपणानी उमटवली. अनेक खोट्या गोष्टी घुसडवून आपण म्हणजे फक्त होम हवन करणारे आणि बाकी शास्त्रात निर्बुद्ध अशी प्रतिमा तयार करून आापल्यासमोर सतत धरली. गरीब झालेल्या जनतेला त्यांच्या हो ला हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता.

 

अन्नान्न दशेला लागलेल्या विद्वान आणि गरीब प्रजेला भट,भिक्षुकी किंवा पोटासाठी भटकंती वाचून पर्यायच राहिला नाही. नवीन प्रगती सोडाच पण कसाबसा तग धरून राहणारा हा समाज आपल्याच दुःखावर हसत ,पिचत असतांना नवीन तयार होणारे साहित्य, कविता तयार होणार्‍या म्हणीही तशाच दारिद्र्यावर आधारीत आणि कसेबसे पोटभरणे ह्या संबंधीच तयार होत गेल्या ह्याचे नवल नाही. काप गेले भोकं राहिली. (कापा फणसाचे गरे, म्हणजे काप काढून घेतले की फणसात त्या गर्‍यांच्या आकाराचे नुसतेच खड्डे किंवा भोकं शिल्लक राहतात.) त्या प्रमाणे वैभव गेलं आणि त्याच्या निशाण्या कुठेतरी शिल्लक राहिल्या. कोंड्याचा मांडा करता करता आयुष्य संपली. पण कधी काळी पुरणाचे मांडे खाणारी ही प्रजा होती हे नक्की. आज नुसते मनातच मांडे खात होती. `घरात नाही तीळ आणि मिशांना देई पीळ' अशी गरीबीची खिल्ली उडवली जाऊ लागली. जीवनभर मरमर करून थोडसं कमावलं तर `दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत' अशी  लोकांची परिस्थिती होऊ लागली.

 

                कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडु ते कडुच. केळी खाता हरखले हिशेब देता टरकले. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. ताटात सांडलं काय आणि वाटित सांडलं काय एकच. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. एकादशीच्या घरी शिवरात्र. एक मासा आणि खंडीभर रस्सा. एक तीळ सात जणात वाटुन खावा. उखळात घालावं तरी मुसळात सापडत नाही. अशी दारिद्र्याच्या द्योतक असलेल्या खंडीभर म्हणी तयार झाल्या. इतकेच का ``बा नीज गडे---‘’ म्हणत आपल्या उपाशी छकुल्याला  झोपवणारी आई

`` उंदिर हे खुडबुड करिती,

 कण शोधाया ते फिरती,

परि अंती निराश होती’’

(अरे! ही काय कविता आहे?  पण म्हणायची माझी आई. ----डोळ्यात पाणी अणून! ) अशा कविताही खंडीभर रचल्या गेल्या.

 मला वाटत होते फक्त मराठीतच अशा कविता वा म्हणी आहेत का? पण नाही. हिंदितही अशा म्हणी पाहून हिंदीचा दारिद्रयकाळातील समृद्ध खजिना असं म्हणावसं वाटलं. म्हणजे भारतभर हिंदूची त्या काळी असलेली परिस्थिती सारखीच दयनीय होती असे म्हणता येईल. आज कानावर येणारे नवनवीन शब्द आजच्या प्रगतीचं लक्षण आहे हे मान्यच करायला पहिजे. घोघा आणि दहेज ह्या दोन शहरांना जोडणारी नवीन रो रो सेवा सुरू करतांना आदरणीय पंतप्रधानांनी गुजरातच्या पूर्वीच्या समृद्धीचा उल्लेख करणारी, पूर्वी अनेक देशांबरोबर आपला व्यापार उदीम होता हे सांगणारी एक म्हण सांगितली. ती अशी - `लंकानु लाडली घोघानु वर' पूर्वी श्रीलंका हिरेमाणकांनी अत्यंत समृद्ध असलेलं बेट आणि त्या रत्नांना पैलू पाडणारे गुजराथी व्यापारी यांच्यात रोटीबेटीचा व्यवहार होता. खूप समाधान वाटलं ऐकून. आजही जुन्या दारिद्र्याची बोच देणार्‍या जुन्या म्हणी जेवढ्या लवकर हद्दपार होतील तेवढा आनंदच आहे.

                        काही वर्षांपूर्वी असाच एक पी.एच्.डी.चा जुना प्रबंध हाती आला होता. त्याने शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रांचा अभ्यास केला होता. काही पत्रे जशीच्या तशी छापली होती. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक होऊन स्वराज्याची स्थापना झाल्या झाल्या रोजच्या बोली भाषेतून अरबी फारसी हद्दपार करायचा धडाकाच लावला. नवीन संशोधन करून मराठीला तिचा बहुमान प्राप्त करून दिला. महाराजांची आधीची पत्रे आणि नंतरची पत्रे ह्यात हळुहळु झालेले बदल इतके स्पृहणीय होते की मन आनंदून गेले. आता मात्र  एक बोच मनात राहून जाते. आम्ही आमची संस्कृती नष्ट करण्याचा चंग बांधणार्‍या इंग्रजी मिडियमचे गोडवे गात किती पिढ्या बरबाद करणार?

              एकदा माझी अमेरिकन मैत्रीण मेरी मला म्हणाली, ``मला विद्यापीठातल्या, कॉलेजमधल्या मुलांना भेटायला फार आवडते.'' ``का ग?'' - मी `` कारण कॉलेजे आणि विद्यापीठातच नवीन भाषा तयार होत असते.'' `` ती कशी काय?'' अगं परवाच एक मुलांचा घोळका ह्या मॉलमधे आला होता. तेंव्हा एक लहान मूल काहीतरी हट्ट करून रडत होतं. त्याचे गाल रडून रडून भिजून गेले होते. आणि त्या घोळक्यातील एक मुलगी अचानक म्हणाली, ``Oh! Iceberg is melting!'' आम्ही मनसोक्त हसत असतांना ती म्हणाली, समोर पाटी बघ दुकानावरची. कसलं दुकान असेल ओळख पाहु? ( आम्ही पहाटेचं फिरणं चुकवायला नको म्हणून मॉलमधे आलो होतो. दुकानं बंद होती.) पाटी होती, ` Pea in a pod ' विचार करकरून आणि डोक खाजवून शेवटी मी म्हटलं,``हरले'' `` गरोदर स्त्रियांचं सामान मिळतं तेथे.’’  ज्या त्या परिसराप्रमाणे त्या त्या भाषेतच नवीन कालखंड जन्माला येत असतो.

   आज संगणक, संवाद, संपर्क, दळणवळण, क्षेपणास्त्रे, उपग्रह, ड्रोन, चलन, मुद्रा,  भीम, फोन पे, क्यु आर कोड, इंटरनेट ऑफ थिंग्ज, IOT, Artificial intelligence -------- आणि अनेक अनेक नवीन  क्षेत्रातील नवनवीन शब्दांचा झालेला विस्फोट नक्कीच भारतातील प्रगतीची वाटचाल, प्रगतीची उमदी गती दाखवणारेच आहेत.  त्यांचे स्वागत करतांना मन आनंदून जाईल प्रत्येकाचे !

------------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –