जीवनमुक्तात्मा

 

जीवनमुक्तात्मा


जीवनमुक्तात्मा

आपल्या अवती भवती असंख्य माणसं वावरत असतात. दिसायला म्हणावी तर सर्वसाधारणपणे एकसारखीच वाटणारी काळी, गोरी, उंच, बुटकी दिसायला फार वेगळी नसतात. त्यांच्यामधेच अत्यंत प्रतिभावंत, कलाकार, शास्त्रज्ञ किंवा सर्व जीवनाचा आस्वाद घेऊनही कमलपत्राप्रमाणे त्यापासून अलिप्त असलेले कितीतरी जीवनमुक्त आत्मे सहज वावरत असतात. माझ्या लहानपणी, पुण्याच्या गणपती चौकात कोपर्‍यावर एक ---सुगंधी उदबत्ती असं काहीसं छोटसं दुकान होतं. इमारतीला जोतं असल्याने दुकान उंचावर होतं. अनेक वेळेला संध्याकाळी त्या दुकानाच्या बाहेर एका साध्याशा छोट्या लाकडाच्या स्टुलावर बसून खूपवेळ दुकानदाराशी गप्पा मारत बसलेला एक निरुद्योगी, रिकामटेकडा इसम मी वर्षानुवर्ष पहायचे. एक दिवस वडिलांबरोबर जातांना वडिलांनी त्यांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तिने त्याहून नम्रपणे आदर भावाने प्रतिनमस्कार केला. ‘‘छोटा गंधर्व ---!’’ माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला उत्तर मिळालं. ज्याला आपण रिकामटेकडा समजत होतो तो रंगमंचावरील एक मोठा कलाकार आहे हे कळल्यावर माझीच मला लाज वाटली. त्यांचं सामान्य माणसाप्रमाणे अत्यंत साधं, आढ्यता नसलेलं वर्तन मनात एखाद्या जीवाश्मासारखं/फॅसिल सारखं कायमचं उमटून राहिलं. असे एक नाही तर अनेक अनेक फार फार मोठे स्त्रीपुरुष आपल्या भोवती वावरत असतात. सगळ्या गर्दीतून ह्या ऋषीतुल्य माणसांना ओळखणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी गुणांची पारख असलेला रत्नपारखीच पाहिजे. कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याचं वागणं सामान्य माणसाप्रमाणेच वाटतं. कारण,

मुलांमध्ये तोही हसुनि कधि टाळ्या पिटतसे

करी गप्पा-गोष्टी  चतुर तरुणींच्या कधि सवे

सवे वृद्धांच्याही समरस विलापा करितसे

रमे सर्वांसंगे परि कमलपत्रासम असे।।4.1

फरक एवढाच असतो की रमे सर्वांसंगे परि कमलपत्रासम असे।। गुरूकडून मिळालेल्या शिक्षणाला पूर्ण आत्मसात केल्याने अहंकाराचा लवलेश त्यांच्याकडे राहिलेला नसतो. जसे

नदीच्या पात्रासी वळण दिसते; ते जळि नसे

रवी स्पर्शे हाता परि किरण ये ना मुठिमधे

गुरूबोधे तैसे जयि मनि न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।।4.2

काहीवेळा अशी माणसं आपल्या घरात असतात पण कुटुंबीय त्यांना ओळखू शकतातच असे नाही. कित्येकवेळा एखाद्‌या माणसाची महती त्या माणसाच्या हयातीत कळत नाही. नंतर त्याचं काम पाहिल्यावर एखादे आचार्य अत्रे बहिणाबाईच्या प्रतिभेला न्याय देतात. चोखोबांचे अभंग कोणी अनंत भट्ट लिहून ठेवतात म्हणून आपल्यापर्यंत पोचतात. कस्तुरीमृगाच्या नाभीतील कस्तुरीचा त्यालाच जनक कळू नये त्याप्रमाणे ह्या थोर लोकांना आपली थोरवी माहित करून घेण्याची जरूरी पडत नाही. ते त्यांच्या कामाशी एकरूप झालेले असतात. हे ज्ञानी अवती भवतीचे जग कसे बघतात हे सांगताना श्री. आद्य शंकराचार्य ‘‘जीवन-मुक्तानन्द लहरीं’’ मधे म्हणतात,

सुवर्णालंकारे नटुनि, वसने लेवुन नवी

गमे चित्राऐसी नगर नर नारी सुबकशी

बघे त्यांना ज्ञानी जणु विविध आकार भवती

रमे साक्षीभावे परि न पडतो गुंतुन कधी।।1.1

जला स्पर्शूनीही किरण भिजती ना कधि जसे

न ये जाळ्यामध्ये सलिल कधि वा ओढुनि बळे

गुरूबोधे तैसे जयि मनि न अज्ञान उरले

नसे आसक्ति त्या; भुलवि नच त्या मोह कुठले।। 1.2

योगी, मुनी, साधू म्हटले की आपल्या मनात भगवे कपडे, जटा, भस्म, टिळे, माळा, तोंडावर अतिशय रूक्ष भाव असा कोणीतरी साधू-बैरागी उभा राहतो. श्री आद्यशंकराचार्यांना अभिप्रेत असलेला  मुनी मात्र मनन, चिंतन, अभ्यासाने प्रगल्भ असून अतिशय संवेदनाशील आहे. मीठ जसे आपले काठिण्य विसरून पाण्यात सहजपणे मिसळून जाते तसा हा योगी स्वतःचे स्वत्त्व विसरून समाजात मिसळूनही गेला आहे. मुलात मूल आणि विद्वानात विद्वान असलेला हा मुनी सगळ्यांनाच हवाहवासा आहे; कारण त्याला स्वत:चा कुठलाच स्वार्थ उरलेला नाही. सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाने त्याचे सर्व संभ्रम, विकल्प दूर झाले आहेत. जसे चिखलात उगवलेले कमळ चिखलापासून पूर्ण वेगळे असते; त्याला चिखलाचा अंश ही चिकटलेला नसतो. तसा हा मुनी संसारात राहूनही सतत प्रसन्न आहे. संसाराच्या ओझ्याने तो दबूनही गेलेला नाही किंवा दुःखी कष्टीही नाही. 

ठेवी मौना मुनिवरचि तो मौनधारी जनी त्या

सन्नीतीच्या गुणिजनसवे सद्गुणी शोभतो हा

विद्वानांच्या चतुर समुदायीच विद्वान मोठा

दुःखी कष्टी जनि दिसतसे शोकसंतप्त आत्मा।।18.1

त्यांच्या संगे समरसचि तो दीन दीनात  होई 

श्रीमंतांच्या सुभग समुदायी दिसे राव कोणी

संतोषाची अविरत स्त्रवे चित्ति निस्यंदिनी त्या

वाटे सौख्ये अनुभवुनि  हा  तृप्तकामा चि  झाला।।18.2

मूर्खांमध्ये नच  प्रकटवी  ज्ञानभांडार त्याचे

स्वत्त्वासी तो लपवि सहजी मूर्ख मूर्खात वाटे

उत्साहाने सळसळतसे तो युवा घोळक्यात

तारुण्याला जणु मिळतसे प्रेरणा ह्या मुळेच।।18.3

ज्ञानाभ्यासे जणुचि सविता ज्ञानवृद्धांमधेही

वक्त्यांमध्ये उठुनि दिसतो हाचि वाचस्पती ही

वैराग्याच्या नभि चमकतो शुक्र तारा जणू हा

योग्यांचाही मुकुटमणि हा त्यक्तकामा चि झाला।।18.4

शोधूनी हे त्रिभुवन मिळे ना महाभाग ऐसा

मुक्तात्मा तो त्रिभुवनजयी धन्य झाला जगी या।।18.5

(भावानुवाद करतांना विषय सहज सोपा व्हावा म्हणून काही पूरक असे ज्ञानदेवांचे दृष्टांत दिले आहेत.)

पहाटे पहाटे सर्व नक्षत्र-तारे लोप पावतात; किंवा सायंकाळी सूर्य मावळल्यावर जेव्हा तारकागण त्यांचं अस्तित्त्व दाखवू शकत नाहीत अशा वेळी अंगाला राखाडी फासलेल्या ह्या वैराग्याच्या नभात आपल्या शुभ्र तेजाने तळपणार्‍या शुक्र तार्‍याप्रमाणे मन वेधून घेणार्‍या श्री आद्य शंकराचार्यांची जयंती वैशाख शुद्ध पंचमीला आहे. त्यांनी लिहीलेलं ‘‘जीवनमुक्तानंदलहरी’’ हे स्तोत्र वाचताना मला ते आचार्यांच्याच जीवनाचं प्रतिक वाटतं. त्याच्याच भावानुवादाने ही सुमनांजली आचार्यांना समर्पित!

-----------------------

अरुंधतीप्रवीणदीक्षित-

वैशाख शु. द्वितीया परशुराम जयंती, 29 एप्रिल 2025



फोटो शंकरन्यास ओंकारेश्वरचे आहेत.


‘‘जीवनमुक्तानंदलहरी’’  वाचण्यासाठी क्लिक करा .

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

अनुवाद-पारिजात (स्तोत्र अनुक्रमणिका)

भौमासुर / नरकासुर वध –