18 अनपेक्षित अनुभव -

 

18 अनपेक्षित अनुभव -

हनिमून

            विशाल उत्साहाने आम्हाला सांगत होता, बहिणीचं लग्न झालं की दोन दिवसांनी ती आणि तिचा नवरा  हनिमूनला जाणार आहे. उत्साहाने मीही विचारलं, ``अरे वा! कुठे जाणार आहेत?'' पोर्ट लुईच्या हॉटेलचं बुकिंग केलं आहे. इथे दक्षिणेला राहणारे लोक उत्तरेला हनिमूनला जातात आणि उत्तरेचे लोक दक्षिणेला येतात. विशालच्या घरापासून गाडीने कितीही फिरत फिरत गेलं तरी पो. लुई दिड तासाच्या अंतरावर होतं. म्हणजे भारताच्या भव्यतेच्या परिमाणात बोलायचं झालं तर बोरीवलीच्या लोकांनी कुलाब्याला किंवा कुलाब्याच्या लोकांनी हनिमूनला कांदिवली विरारला जाणयासारखं होतं. फार फार लांबचं बोलायचं झालं तर पुण्याच्या लोकांनी मुंबईला आणि मुंबईच्या लोकांनी पुण्याला जाण्यासारखं होतं. उद्या मुंबईकरांवर पासपोर्ट, व्हिसा शिवाय मुंबईबाहेर कुठेही बाहेर जायचं नाही असे निर्बंध आले तर त्यांचं काय होईल? किंबहुना काय काय होईल ह्याचा विचारच मी करु शकत नव्हते. मानसिक होणारी घुसमट मी विचारच करु शकत नव्हते. आजही शनिवार रविवार दोन सुट्ट्या जोडून आल्या की मुंबई पुणे express way वर गाड्यांच्या खचाखच रांगा लागतात. एका छोट्याशा बेटावर राहणार्या लोकांचा वावर आणि विचार किती सीमित होऊन जातो.

         आम्ही नोकरीनिमित्त भारतभर आनंदाने फिरत होतो. अनेक लोकांना भेटत होतो. पहात होतो. विविध भाषांची, मजा अनुभवत होतो. अनेक प्रांत पादाक्रांत करत होतो. इतक्या दूरदूरच्या गावांना जाऊनही तिरंग्याचं केवढं मोठ्ठ छत्र सतत आपल्या डोक्यावर आहे, आपण किती सुदैवी आहोत ही जाणीव कधी झाली नव्हती. आई आपल्यासाठी काय करते ह्याची जाणीव लहान बाळाला कुठे  असते? ती आज प्रकर्षाने झाली. भारतात असतांना एकमेकांविरुद्ध दंड थोपटतांना ह्या तिरंग्याची छाया आपल्या डोक्यावरून गेली तर किती पोरकेपण येईल ह्याची कधी कल्पनाही केली नव्हती. एका भल्या मोठ्या देशाने आपल्याला कुशीत घेतल्याची , सनाथ केल्याची भव्य जाणीव मॉरिशस नाव्याच्या छोट्याशा देशात गेल्यावरच झाली.

                        प्रवीणला तेथील एक मंत्री म्हणाले मला 15 दिवस भारतात सुट्टीवर यायचं आहे कुठे जावं ते सुचव. प्रवीणने एक छानसा प्लॅन बनवला.  त्यांना नैनिताल पहायचे होते. दिल्लीहून नैनितालला गाडीने जायला 4-5 तास तरी लागतील असं म्हटल्यावर इतका वेळ? इतका वेळ गाडीने प्रवास? छे छे मी इतका वेळ गाडीत बसूच शकत नाही म्हणून त्यांनी नकारच दिला. मॉरिशसचं दक्षिणोत्तर अंतर अवघ्या दोन-तीन तासात संपून जायचं तिथे भारताचं दक्षिणोत्तर सोडाच पण दिल्ली नैनितालही प्रचंड दूर वाटणं सहाजिकच होतं.  मॉरिशस मध्ये ट्रेन नसल्याने अनेकांना भारतातील ट्रेन-प्रवासाची भीती वाटायची. ट्रेनशिवाय आम्ही कुठे जाऊ शकू हे सांगा म्हणतं.

           मॉरिशसमधून मी जेंव्हा काही कामासाठी भारतात आले, तेंव्हा पुणे-मुंबई अंतर हे फारच लांब वाटायला लागलं. घाटरस्ता आणि सह्याद्रिचे डोंगर हिमालयासारखे विशाल वाटायला लागले. छोट्या देशातून मोठ्या देशात आल्याचं दडपण दिवसभर तरी टिकून राहिलं. म्हणजे नुसता शरीराला जेटलॅगचाच सामना करायला लागतो असं नाही तर मनाला छोट्याकडून विशालतेकडे जायचाही सामना करायला लागतो

परत आज गलिव्हरच्या गोष्टींची सत्यता अनुभवत होतो.  मॉरिशसमधल्या छोट्या छोट्या घटना कधी आम्हाला आश्चर्यचकित करत तर कधी अंतर्मुख करत. कधी हताश करत कधी उत्साहित करत. अशीच एक घटना बहुलीची.

बाहुली - 

येणार्या प्रत्येक पाहुण्यांना वेगवेगळ्या गोष्टींमधे असलेली रुची लक्षात घेऊन मी मॉरिशस दाखवत असे. माझ्याकडे भाऊ आणि वहिनी आले असतांना  भावाने आल्या आल्याच ``मला काहीही खरेदी करायचं नाही'' हे स्पष्ट केलं. तरीही इथले मॉल कसे असतात हे दाखवायला मी त्याला आणि वहिनीला घेऊन गेले. मॉलमधून सगळ्या गोष्टींवरून नजर टाकता टाकता आम्ही शेवटच्या मुलांच्या विभागात आलो. मी आणि वहिनी काहीतरी बघण्यात गढून गेलो होतो. खरेदीसाठी मला वहिनीला प्रत्येक गोष्टीत रस वाटत होता आणि भावाला प्रत्येक गोष्ट निरस.  तो एकटाच पुढे पुढे चालला होता. आणि अचानक ओरडलाच - -- -``अफलातून! अगं बघ बघ !'' ``काय रे काय झालं '' ? ``अग त्या बघ. त्या भावल्या.'' मीही गमतीने तो दाखवत होता त्या दिशेकडे नजर टाकली. ह्याला बाहुल्या पाहून एकदम काय झालं?  समोरच्या शेल्फवर बाहुल्या होत्या. ब्राऊन, काही अजुन गडद चॉकलेटी, काळ्या, मोठ्या मोठ्या बोलक्या डोळ्याच्या, जाड ओठाच्या, मॅगीसारख्या कुरळ्या केसाच्या. काहींच्या कुरळ्या केसांच्या खूप छोट्या छोट्या वेण्या घातलेल्या. अफ्रिकन अंगकाठीच्या. त्याच चेहर्यांची छोटी बाळं, भावले. ``सुंदर'' मीही बघतच राहिले. मुंबईला एखाद्या छोट्याशा अरुंद गल्लीतून आत आत जात असतांनाच अचानक ती गल्ली भव्य समुद्रापाशीच आपल्याला सोडून चकित करून जाते तसं बाहुलीच्या छोट्याशा विषयाने एका मोठ्या प्रश्नापर्यंत आम्हाला आणून सोडलं होतं. .....  भला मोठा .....सागरासारखा मोठा, गहन. भारतात मिळणार्या बाहुल्या गोर्या, सोनेरी केसाच्या नीळ्या डोळ्याच्याच का असतात? त्यांचं दिसणं जरासुद्धा आपल्यासारखं नसतं. तरी आपल्या मुलांवर लहानपणापासून ह्या बाहुल्यांना जवळ करायची सक्ती का?

           अमेरिकेत जातांना मला विमानात भेटलेल्या एका अमेरीकन बाईची आठवण आली. ती भारतातून अमेरिकेत परत चालली होती. सहज मी तिला विचारलं, ``तुला भारतात काय आवडलं?''  आणि पटकन ती बोलून गेली, ``भारतातल्या मुलांचे काळेभोर मोठ्ठे मोठ्ठे डोळे!'' मग आम्हालाच का आमच्या मुलांना अशा बाहुल्या देण्याची लाज वाटावी? सौंदर्यवती द्रौपदी काळीच होती ना? भारतीयांच्या ह्दयात आजही विराजमान असलेला कृष्णही तर काळाच आहे. मग?  माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणूनही प्रश्नच येत होता. भारतात सर्वात जास्त उजळ होण्याची क्रीम्स खपतात - -का? ---- आमची गुलामगीरी अजूनही आमच्या रक्तारक्तातून सळसळत आहे का? आपण जसे दिसतो तशाच सावळ्या, काळ्या डोळ्यांच्या, काळ्या केसांच्या, लांब शेपटा किंवा अंबाडा घालणार्या, परकर पोलकं घातलेल्या  बाहुल्या बनवाव्यात असं कोणालाच कसं वाटलं नाही? पूर्वी असायच्या अशा बाहुल्या. परकर पोलकंवाल्या. त्या काळाच्या प्रवाहात वाहून गेल्या, लुप्त झाल्या. कधी? कशा? त्याची जाणीवही मनाला शिवली नाही. रक्तचंदनाची ठकीही चालायची आम्हाला. अचानक ह्या गोर्या भावल्यांनी अतिक्रमण केलं आमच्या ठकीवर. परदेशी कुत्र्यांनी आमच्या गावठी मोत्या, वाघ्याला बेघर केलं. रस्तोरस्ती ती भटकी कुत्री म्हणून फिरू लागली. आमच्या टपोर्या, कारुण्याने ओथंबलेल्या डोळ्याच्या गाई गोठ्यातून हद्दपार झाल्या. त्यांची जागा जर्सी नावाच्या प्राण्याने घेतली. तशीच ठकीलाही बार्बी नावाच्या गोर्या मडमेनी देशातूनच हद्दपार केलं.   गुलामगिरीच्या रोवलेल्या मुळ्या आमच्या देशाच्या गळ्याभोवती अजून अजून जखडुन टाकतायत. स्वातंत्र्य मिळवतांना इंग्रजांना भारतातून `चले जाव' म्हणत गुलामगिरीची वरवरची पालवीच फक्त आम्ही खुडली. स्वातंत्र्य मिळूनही आमचे गुलामगिरीचेचे रोगट जीन्स तसेच आहेत का? संस्कृतचं सुभाषित आठवत होतं. शस्त्रहता हताः ; बुद्धिहता हता शस्त्राने मारून मृत्यू येत नाही. बुद्धी मारली तर कायमचा मृत्यू होतो. एका छोट्याशा बाहुलीनी आमचं मन ढवळून काढलं होत. काही घ्यायचं नाही असा निश्चय करून निघालेल्या भावाने अत्यंत प्रेमाने एक बाहुली खरेदी केली. ब्राऊन रंगाची, काळ्या, मोठ्या मोठ्या बोलक्या डोळ्याची, जाड ओठाची, मॅगीसारख्या कुरळ्या केसाची.  मनात विचांरांची वावटळ घेऊन आम्ही घरी परतलो. पूर्ण दिवस अस्वस्थतेतच गेला. तो परत भारतात गेल्यावर मी मुद्दाम फोन करून बाहुलीची चौकशी केली. बाहुली माझ्या भाच्चीला आणि तिच्या मैत्रीणींना खूप खूप आवडली होती.

लवकुश पाळणाघर-

            बाहुलीसारखी अशीच एक छोटीशी गोष्ट माझ्या बाहेर धावणार्या सर्व विचारांना मनाच्या तळापर्यंत आत घेऊन गेली. सहज मॉरिशसच्या अंतरंगातून फिरतांना एका पाटीने लक्ष वेधून घेतल. पाटी होती `Lav-Koosh Creche ' (लवकुश पाळणाघर) पाळणाघरासाठी इतकं सुंदर नाव अजुनसुद्धा मला सापडलं नाही. लव-कुशांचा अत्यंत प्रेमाने सांभाळ करणार्या वाल्मिकींचा  आश्रम जणु त्या लवकुश पाळणाघराच्या रूपाने माझ्या डोळ्यासमोर साकार झाला. अनिवासी भारतीयांनी जपलेल्या संस्कृतीतून असे अचानक सोनेरी क्षण अनुभवायला मिळायचे. आणि आम्हाला चकित करुन जायचे.

समस्त मातृशक्ती -

 भारतातून आलेल्या प्रा. नवलगुंदकरांच्या भाषणाला गेलो होतो. Mrs. घोष या Black River Council च्या President बाईंनी त्याच्या भाषणाची ``समस्त मातृशक्ती - - -'' अशी सुरवात केली. अभावितपणे आमच्या दोघांच्या हातानी टाळ्या वाजविल्या गेल्या. भगिनींनो ह्यासाठी पर्यायी फार पूर्वापार वापरात असलेला सोन्यासारखा शब्द जणु भाषेच्या उत्खननातून सापडल्याचा आनंद झाला.

शकुंतलेला निरोप -

               अशीच एकदा मॉरिशसचं अंतरंग शोधत बसने जात होते.  बसमधे फार प्रवासी नव्हते. गावागावांना ओवत जाणारी बस एका थांब्यापाशी थांबली. एक कृष्णवर्णी तरुणी बाळाला कडेवर घेऊन बसची वाट पहात होती. तिला पोचवायला तिची आईही आली होती. बस थांबताच सासरी चाललेली लेक आईच्या गळ्यात पडली. आई समजूत काढत होती. तिचे डोळे पुसत होती. बसमधले सर्वजण खिडकीतून हे दृश्य पाहून हेलावून जाऊन काळजी करू नकोस असं तिला सांगत असावेत. बसच्या चालकानेही शांतपणे गाडी थांबवली. निरोपाचा सोहळा जणु प्रत्येकाच्या घरचाच झाला होता. चालकानेही आईची, लेकीची समजूत काढली. बहुतेक `बोल बाई अजुन दोन मिनिटं' म्हणून गाडीही अजुन दोन पाच दहा मिनिटं उभी राहिली. शेवटी जड पावलांनी लेक बसमधे चढली. आणि आईला हात करत करत बस सुरू झाली. कण्वांनी शकुंतलेला निरोप द्यावा इतक्या आस्थेने हा सारा निरोप समारंभ मी अनुभवला.

जगभर कुठेही जा. माणसांचा बाह्य पोशाख, राहणीमान, कितीही बदललं तरी नाती तशीच असतात. मानसिक भावना त्याच राहतात.  . दि. मां च्या मराठी गाण्याची ओळ  ` दीर थांबले खोळंबुन गाडी - - जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा ' ही गाण्याची ओळ त्या मॉरिशियन प्रसंगालाही चपखल जुळतांना पाहुन गंमत वाटुन गेली.

 पुतळ्याखालील मनाला यातना देणारी ती ओळ -

        मॉरिशसचं सौंदर्य निरखतांना काही गोष्टी मात्र मनाला अशा काही सलत राहिल्या की कधी कधी सारा दिवस मन उदास होऊन जाई. को डा वॉटर फ्रंट ही भारतीयांची लाडकी जागा असली तरी तेथील एक पुतळा आणि त्याखाली लिहीलेली एक ओळ मला फार टोचत राही.  

भारताच्या पारतंत्र्याच्या काळी उभारलेला , अजूनही उभा असलेला तो पुतळा आहे राणी व्हिक्टोरियाचा.  त्याच्या खाली कोरलेली अक्षरं माझ्या मनावर छिन्नीनी कोरल्यासारखी आजही मला यातना देतात. `EMPRESS OF INDIA' इंग्लंडच्या राणीला इंग्लंड ऐवजी एवढ्या मोठ्या भारताची साम्राज्ञी म्हणवून घ्यायचा लोभ मी जाणू शकत होते. पण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या पुतळ्याखालची  `EMPRESS OF INDIA' ही ओळ बदलावी असं तेथे स्थायिक झालेल्या भारतीयांनाही वाटू नये? इतके भारतीय आजही मॉरिशसला भेट देतात. त्यांच्याही डोळ्यांना ही ओळ खुपू नये? मला दर वेळेस त्या ओळीवरून डोळे फिरले की ओशाळवाणं आणि हतबल वाटे. 

http://c8.alamy.com/comp/DN3Y6/the-queen-victoria-statue-port-louis-mauritius-DN3YP6.jpg ह्या लिंकवर त्याखालील अक्षरेही वाचता येतील

 

अमूलची हरलेली लढाई

मॉरिशसवर निसर्गाने सौदर्याची उधळण केली आहे. नैसर्गिक सौदर्याचा ठेवा अत्यादराने जपणार्या मॉरिशसमधे गोधनाचं दर्शन दुर्मिळच होतं. सर्वत्र पसरलेली उसाची शेतीही बैलांवर अवलंबून नव्हती. सर्वत्र मशिननेच शेती होत होती. गाय, बैल, म्हैस हे प्राणी जेवढे दुर्मिळ होते तेवढेच गाढव आदि प्राणीही. नाही म्हणायला पँम्पलेमूसच्या बोटॅनिकल गार्डनमधे हरणांच्या जोडीने ठेवलेलं एक गाढव मात्र पहायला मिळायचं.

             आमच्या घरापासून काही अंतरावर दूध डेअरी होती. मॉरिशसच्या मानाने ती फारच छोटी होती. गाईचं फ्रेश दूध प्लॅस्टिकच्या अर्ध्या लिटरच्या बंद प्लॅस्टिक  थैलीत तथे सकाळी नऊ वाजेपर्यंत उपलब्ध असे. आमच्या सारखे भारतीयच त्याचे जास्त ग्राहक असू. भारतातलं अत्यंत सकस, मधुर दूध प्यायची सवय झाल्यावर बाहेरच्या देशातलं (अगदि अमेरिकेतील सुद्धा) दूध किती वाईट चवीचं असतं. हे पटतं. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला नाही किंवा जे जाहिरातींच्या बहकाव्यात आले असतील त्यांनाच माझं म्हणणं पटणार नाही. इथले ज्यास्त करून सर्व लोकं मिल्क पावडरवरच त्यांची दुधाची तहान भागवत असत. रस्तोरस्ती Twin Cow आणि Red Cow पावडर मिल्कच्या बोर्डस् झळकत असत. ह्या दूध पावडरी न्यूझिलंड, ऑस्ट्रेलियाहून येत असत. मॉरिशियन लोकं अतिशय चोखंदळ आहेत ते महाग असल्या तरी फक्त ब्रँडेड गोष्टीच वापरतात असा लोकांचा अहंकार फुलवत आपल्या गोष्टीच वापरायला लावायचा त्यांचा प्रचार थाट असे.

                 एक दिवस पेपरमधे बातमी आली की भारतातून जहाज भरून `अमूल्या'ची दूधपावडर मॉरिशसमधे येत आहे. उदबत्त्या आणि आरतीच्या सामानाव्यतिरिक्त काहीतरी भारतीय गोष्टी मॉरिशसच्या मॉल्समधे पहायला मिळणार म्हणून आम्ही खूष होतो. अमूल्याला  `या या' म्हणत त्याचं स्वागत करायला आपण भारतीय तिथे उपस्थित असल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. दुसर्या दिवसापासूनच अमूल्याच्या दोषांची यादी ज्याच्या त्याच्या जिभेवर फिरतांना दिसायला लागली. 1 red cow milk पेक्षा अमूल्यात preservatives ज्यास्त आहेत.  2 ही दूध पावडर पाण्यात नीट मिसळत नाही. 3 हे दूध homogenous होत नाही. 4 हे दूध गाईचं नसून म्हशीचं आहे. 5 म्हणूनच त्यात  स्निग्धांश (fat percentage) जास्त आहे. 6 त्याचं पॅकेजिंग वाईट आहे. - - - अशी अनेक. खेदाची गोष्ट अशी की अमूल्याची ओझरती झलकही बघता त्याला नावं ठेवणार्यांमधे भारतातून आलेले भारतीयच जास्त होते.  मी उत्साहाने मॉलमधे गेले. अनुभव अजून दारूण होता. आपल्या अमूल्य मालाची जाहिरात करायला कोणीही अमूलच्या बाजूने तेथे उभा नव्हता. त्या उलट मॉलच्या दरवाजातच टेबलावर Red cow milk ची पिवळी खोकी सुबकपणे मांडून सजवून ठेवली होती. लालचुटुक शॉर्ट स्कर्ट घातलेल्या स्मार्ट तरुणी red cow milk च्या दूधाची असाधारण महत्ता लोकांना समजावून सांगत होत्या. शिवाय एका खोक्यावर एक खोकं फ्री मिळणार होतं. लोकांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही पॅकेजिंगलाही कसं महत्त्व देतो हेही त्या खूबीने पटवून देत होत्या. आमचं अमूलचं दूध बेवारसपणे मॉलच्या दुर्लक्षित शेल्फांवर अगदी खालच्या कप्प्यांमधे दयनीय अवस्थेत दिसणारही नाही अशा प्रकारे ठेवलं होतं. खाली बसून घेतल्याशिवाय ते हाती लागणार नव्हतं. खाली बसून घ्यायला लागणार्या मालाला फारच कमी उठाव असतो; हे लक्षात घेऊन सर्व अग्रेसर कंपन्यांनी मॉलमधल्या मोक्याच्या जागी (prime shelves) वर आपला माल ठेवण्यासाठी आग्रह धरलेला होता. अमूल्या रिफिल पॅकमधे होतं. त्याच्यावर छानशा खोक्याची खोळ नव्हती. पहिला नकार मिळायला तेथूनच सुरवात झाली. मी घरी अमूल्या घेऊन आले. त्यांनी सांगितलेल्या कृतीनुसार दूध बनवून पाहिलं; दूध मस्तच होतं. बाकीच्या दूधांपेक्षा कितीतरीपट चविष्ट आणि गोड होतं; फक्त पावडर आधी घालून वरून पाणी ओतायचं होतं. कोमट पाण्यात पावडर लगेचच विरघळत होती. पाण्यात वरतून घातली तर विरघळायला थोडासा वेळ लागत होता. सरळ नाकाच्या मुलीला आधीच नकटी ठरवून मग तिच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्न कशी निर्माण केली जातात हे पाहून वाईट वाटत होत. आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त दूध पावडर मी खरेदी करत होते. भेटेल त्याला जीव तोडून अमूल्या चांगलं आहे हे सांगत होते. पण माझ्या एकटीच्या खरेदीने आणि सांगण्याने किती खप वाढणार? शेवटी flop अशी काट मारून ही सर्व दूधपाकिटं एक दिवस मॉलमधून गायब झाली. परत एकदा Red Cow Milk चे भाव चढणीला लागले. एकावर एक फुकट वाटलेल्या पाकिटांचा हिशिबही त्यांनी चुकता करून घेतला. अमूल्या मिल्क पावडर गाईगुरांना खायला घातल्याच्या बातम्याही छापून आल्या. व्यापारी लढाया कशा लढल्या जातात ते जवळून पाहिलं आणि अमूल्याचा व्यापारी अस्त पाहिला.

            मॉरिशसमधे फूड अॅनेलिसिस करणारी अद्ययावत लॅब होती. तेथील मशिनरी युरोपियन युनियनने भेट दिली होती. देशात येणारा प्रत्येक माल हा युरोपिय स्टँडर्डप्रमाणे आहे की नाही हे पाहिले जायचे. साहजिकच अमूल बाजारात येण्यापूर्वीच त्याचे नसलेले दोष बाजारात फिरायला लागले. ह्या ना त्या कारणाने भारतातील गहू आणि  आट्याचाही शिरकाव झाला नाही. गहू ऑस्ट्रेलियाहूनच यायचा. गहू दळायच्या मोठ्या गिरण्या पोर्ट लुईला बंदराजवळच स्थानापन्न झाल्या होत्या. फक्त ब्रेड योग्य आटा मिळे. सर्वजण ब्रेडच खात असल्याने साधारणपणे आटा घेऊन पोळ्या करणार्यांची संख्या नगण्य होती. आपल्याकडची मऊसूत पोळ्यांची सरबती,लोकवाण, नाहीतर सिल्होर गव्हाची कणीक कुठे आणि इथे मिळणारी लॅबचं `येस'चं लेबल लावून आलेली कणीक कुठे?   आपल्या बासमतीला फक्त परवानगी होती. पाकिस्तानी बासमतीची स्पर्धा करत त्याला टिकाव धरावा लागे. बाकी आंबेमोहोर, विष्णुभोग असा तांदूळ नाही. त्यामुळे रोज फक्त बासमतीचाच भात खावा लागे. खरतर आपल्या चांगल्या गोष्टींची सवय इथल्या लोकांना लागली तर परत ते इतर देशांच्या मालाकडे ढूंकून पाहणार नाहीत. मनाची तगमग मनात कोंडतांना त्याचा कधीतरी ज्वालामुखी होईल असं वाटत राहिलं. काही दिवसांनी दुसर्या देशात राहून आलेल्या काही तरूण भारतीय डिप्लोमॅटस् बरोबर जेंव्हा जेंव्हा बोललो तेंव्हा सगळ्यांच्या बोलण्यात भारतीय माल कसा वाईट असतो, परदेशातील माल कसा उत्कृष्ट असतो अशी वचनं ऐकायला मिळायची. ते ज्या देशात राहून आले असतील त्या देशाच्या बेगडीपणाने भाळून त्याच देशाची वकीली सुरू करत. त्यांना आवर्जून ह्या व्यापारी लढाईची गोष्ट मी सांगत असे.

 चिकनगुन्याचा उद्रेक -

                         ह्या सुंदर देशात 2005 मधे एका भयंकर रोगाची साथ तेथे सुरू झाली. ताप, प्रचंड सांधेदुखी अशी रोगाची लक्षण असलेला तो रोग होता चिकनगुन्या. हे नाव चार चार वेळेला म्हटल्यानंतरच तोंडात बसेल असं वाटत होतं. आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनीही हा रोग भारतात नाही. आफ्रिकेत असतो असं ऐकिवात आहे म्हणून  सांगितलं. किंबहुना हा रोग भारतीयांना काय मॉरिशसमधील डॉक्टरांनाही तो पर्यंत माहित नव्हता. हा रोगही मलेरियाप्रमाणे डासांमुळेच होणारा रोग आहे. व्हिक्टोरिया जनरल हॉस्पिटलचे डीन  दर आठवड्याला एका नवीन मेडिकल टॉपिकवर चर्चा घेत असत. त्यावेळेला CME (continuous Medical education) तर्फे त्यांनी चिकनगुन्यावर चर्चा ठेवली होती कारण तेथील डॉक्टरही ह्या बाबत अनभिज्ञ होते. प्रायव्हेट डॉक्टर मॉरिशसमधे फारच कमी होते. आणि जे होते ते फार सक्षम नव्हते. त्यामुळे बहुतेक सर्वांना सरकारी व्यवस्थेवरच अवलंबून रहावे लागे. मॉरिशस हा देश सपूर्णपणे टुरिझमच्या पायावरच उभा असल्याने ह्या साथीची वाच्यता कुठेच केली जात नव्हती. वर्तमानपत्रातून बातमी आली तर ती सुद्धा एखादि दुसरी पण तिला फार महत्त्व नसे. मला काही महत्त्वाच्या कामासाठी महिनाभर भारतात येणं भाग होतं. मी परत य़ायला 2-4 दिवस असतांनाच प्रवीणचा फोन आला, ``पाय खूप दुखतोय, जरासा तापही वाटतोय''. ``कसंही कर पण हॉस्पटल गाठ'' मी त्याला सांगितलं. घरी आम्ही दोघंच असल्याने काम करायला आम्ही कोणाला ठेवलं नव्हतं. प्रवीणला स्वयंपाक करून, बाकी सर्व आवरून एकट्यालाच हॉस्पिटला पोचायला लागलं. हॉस्पिटलमधे रक्ताचा नमुना घेतला गेला आणि गोळ्याही दिल्या गेल्या रक्ताचा रिपोर्ट घ्यायला मात्र 15 दिवसांनी बोलावण्यात आलं. नेहमी मलेरियाचा रिपोर्ट काही तासात कळविणार्या आरोग्य विभागाने चिकनगुन्या बरा झाल्यावरच तो चिकनगुन्या होता हे सांगायची दक्षता घेतली होती. सुदैवाने रोजचा नियमित आणि भरपूर व्यायाम ह्या एकाच गोष्टीने प्रवीण तरून गेला. बाकी अनेकांचा ह्या रोगाने चांगलाच पिच्छा पुरविला. सहा महिने, वर्षभर सांधेदुखीने हे रुग्ण अक्षरशः जायबंदी झाले होते.

                    थोड्याच दिवसात भारतातून चिकनगुन्याच्या बातम्या आमच्या कानावर येऊ लागल्या. आपल्याकडे बाकी देशातून  येणार्यांचे रक्त तपासण्याने आपण केवढी मोठी संकटं ओढवून घेतो. किमान दुसर्या देशातील भारताच्या दूतावासाने त्या देशात असलेल्या साथीच्या रोगांवर बारीक नजर ठेऊन वारंवार भारतात कळवायला पाहिजे आणि भारतानेही त्या त्या देशात जाणार्या आपल्या नागरीकांना सावधतेचा इशारा द्यायला हवा. तेथून येणार्यांना तर सक्त क्वारंटाईनमध्ये ठेवायला हवे.  Yelllow Fever साठी ही काळजी घेतली जाते.  अमेरिका, युरोप सारख्या देशांमधे बाहेरच्या देशातून साथीचे रोग येऊ नयेत म्हणून केवढी काळजी घेतली जाते! भारताच्या पैशांचा आणि आरोग्याचा विनाश करणार्या ह्या साथींची सुरवात ही भारताबाहेरूनच होते.

---------------------------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

19 भारतीय मान्यवरांच्या भेटी -

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.


Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -