19 भारतीय मान्यवरांच्या भेटी -

 

19 भारतीय मान्यवरांच्या भेटी -

राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची भेट

          ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं अशा शब्दातच आपल्या राष्ट्रपतींच्या भेटीविषयी बोलता येईल. दुसर्या देशाला भेट देतांना ह्या VVIP ना आपल्याबरोबर अजून एका व्यक्तीला घेऊन जाता येत असे. आम्ही मॉरिशसला असतांना पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांनीही मॉरिशसला भेट दिली होती. येतांना त्यांची पत्नी, मुले आणि नातवंडे असा परिवार घेऊन ते आले होते. राष्ट्रपती अब्दुल कलाम मात्र त्यांच्यासोबत एका निष्णात अशा प्राध्यापकांना घेऊन आले होते. राष्ट्रपतींनी 10-11 वी च्या अनेक विद्यार्थ्यांना, एका शाळेला, विद्यापीठाला भेट दिली. सर्व विभाग प्रमुख प्राध्यापकांसोबत त्यांची जी बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन केले. त्यावेळेस सर्वांना त्यांनी पहिलाच प्रश्न केला, तुमच्यापैकी कितीजण स्वतंत्र संशोधन करता? अब्दुल कलाम पुढे म्हणाले, पुस्तकात उपलब्ध असलेली माहिती विद्यार्थ्यांना सांगणे म्हणजे शिकवणे नव्हे. तुम्ही स्वतः संशोधन करा. ते संशोधन मुलांसमोर मांडा. तेच खरे शिकवणे आहे. नॉनो टेक्नॉलॉजीची सविस्तर माहिती देउन त्यांनी सर्व प्राध्यापकांना जागृत केले की येणार्या काळात जगावर नॅनो टेक्नॉलॉजीचे महत्त्व राहणार आहे. प्राध्यापकांसोबतही त्यांनी चर्चा करून अनेक विषय हाताळले. प्राध्यापकांना सतत नवीन संशोधन करण्यास उद्युक्त केले.

           विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केले. त्यावेळी पूर्वीचा समाज, औद्यौगिक क्रांतीने त्यात घडवलेला बदल आणि आता ज्ञानाधिष्ठित समाज आणि त्यात घडलेले बदल त्यांनी अधोरेखित केले. पूर्वीच्या काळी बहुसंख्य लोक शेतात काम करत असत. त्यांना औद्योगिक क्रांतीतील विविध यंत्रे आणि त्यांचे भाग कसे काम करतात हे समजाऊन सांगण्यासाठी एक प्रशिक्षक एका घोळक्याला माहिती देत असे त्यांच्याकडून यंत्रातील एक एक काम करवून घेत असे. परंतु ज्ञानाधिष्ठीत समाजात इंटरनेट अन्य माध्यमातून सर्व माहिती सर्वांना उपलब्ध असते. फक्त माहिती कुठे उपलब्ध आहे हे माहित असले म्हणजे झाले. `राजीव गांधी सायन्स म्युझियम' ह्या भारताने बांधून दिलेल्या वास्तूत अब्दुल कलाम यांनी शाळकरी मुलांसोबत संवाद साधला. हा संपूर्ण संवाद प्रश्नोत्तरे ह्या स्वरूपात होता. ``पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात?'' ``सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोचायला किती वेळ लागतो?'' असे अनेक प्रश्न अत्यंत उत्साहाने मुलांना विचारून अब्दुल कलाम त्यांची उत्सुकता वाढवत होते. पटापट उत्तरे सांगून मुलांचा आनंद ज्ञान द्विगुणीत करत होते. ``तुम्ही सारे संशोधक होणार ना?'' असा प्रश्न विचारून त्यांनी सर्व मुलांना उभे केले आणि त्यांच्याकडून मोठ्यांदा शपथ म्हणून घेतली. स्वतः ती शपथ उत्साहाने म्हटली. `एनर्जी सिक्युरिटी' हा त्यांचा लाडका विषय होता . एरंडेलाच्या बीयांपासून काढलेल्या तेलाने गरीब देशातील तेलाच्या समस्येवर कशी प्रभावी मात करता येईल हे ते त्यांना भरभरून सांगत होते. आफ्रिकेतील सर्व देशांना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळावे त्यांना उत्तम औषधोपचार मिळावे म्हणून भारतीय विद्यापीठे आणि इस्पितळे आफ्रिकेशी सॅटेलाईटच्या माध्यमातून जोडून नवीन पर्व सुरू करावे असे त्यांचे लाडके स्वप्न होते.

राजीव गांधी विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांसोबत झालेल्या गप्पांमधे संस्कृतीचं जतन आणि विज्ञान या गोष्टींची सांगड कशी घालावी या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी नाहीत का? दिवसेंदिवस संस्कृतीचा जो ह्रास चालू आहे त्याबद्दल आपलं मत काय असं विद्यार्थ्यांनी विचारल्यावर श्री कलाम म्हणाले, `` विज्ञान आणि आपला सांस्कृतीक वारसा बरोबर घेऊन होणार्या आर्थिक सुधारणांमुळेच एक चांगली पिढी उदयाला येते. MBC मधे त्यांच्या मुलाखतीत ते म्हणाले,-

When there is righteousness in the heart

There is beauty in the charecer

When there  is beauty in the charecer

There is harmony in the home.

When there is harmony in the home

There is order in the nation

When there is order in nation

There is peace in the world.

          अनेक जणांना आपापली प्रेझेंटेशन्स डॉ. अब्दुल कलाम यांना दाखवायची होती. त्या सगळ्यांची प्रेझेंटेशन्स ते अत्यंत उत्साहाने रोज रात्री दीड वाजेपर्यंत पहात होते. त्यांना मोलाच्या अनेक सूचना करत होते.  इतकं करूनही सकाळी लवकर नेहमीप्रमाणे त्यांचा दिवस चालू होत होता.

           त्यांची आणि तेव्हाचे मॉरिशसे राष्ट्रपती श्री.अनिरुद्ध जगन्नाथ याची अर्धा तासाची चर्चा ठरली होती. ती नंतर एक तास लांबली. तेंव्हाचे भारतीय दूतावासातील उपप्रमुख श्री राजीव शहारे त्यावेळी उपस्थित होते. नंतर ते सांगत होते की श्री. अब्दुल कलामांनी इतक्या विविध विषयांवर चर्चा केली की त्यांची नोंद घेता घेता त्यांचीच दमछाक झाली.

             अब्दुल कलाम यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी प्रवीणची होती. त्यामुळे त्यांच्या तीन दिवसाच्या वास्तव्यात प्रवीणला सतत त्यांचा सहवास लाभला. प्रवीणही त्यांच्या बरोबर असतांना त्यांनी `मॉरिशसचा नकाशा आणि माहिती पुस्तक मिळेल का'? म्हणून विचारणा केली. त्यावेळेसच काही कामासाठी मी भारतात आल्याने शाळेच्या  मुलांसाठी असलेलं नकाशाचं पुस्तक प्रवीणने खूप शोधूनही त्याला मिळालं नाही.  आपण ते पुस्तक श्री अब्दुल कलाम यांना देऊ शकलो नाही ह्याची मला राहून राहून खंत वाटत राहिली.

         अत्युच्च पदी विराजमान झालेले हे राष्ट्रपती इतके साधे होते की ज्या हॉटेलमधे ते उतरले होते तेथील काही कामगारांनी त्यांना `आमच्याबरोबर फोटो काढाल का?' विचारल्यावर सहजपणे त्यांच्यासोबत फोटोला उभे राहून त्यांनी फोटोही काढू दिला. संकोचून पहात असलेल्या आजूबाजूच्या कर्मचारी वर्गालाही आवर्जून बोलावून त्यांच्याबरोबरही फोटो काढले.

           त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून पसरणार्या उत्साहाच्या लाटा मॉरिशसभर उत्साहाचं वातावरण पसरवून गेल्या. नंतरही कित्येक दिवस मॉरिशसवासी कलाममय झाले होते. नंतर कित्येक दिवस सर्व वृत्तपत्रे त्यांच्याविषयी लिहीतांना थकत नव्हती.

कलाम त्याच्या ह्या छोट्याशा भेटीतही तेथील कोळी बांधवांना भेटायचे विसरले नाही. त्यावेळेस डॉ. कलाम म्हणाले, `` तुम्ही कुठेही रहा; पण अत्युत्तम काम करून; भारताचा डंका सर्वत्र वाजत राहील ; याची खात्री करा.’’  मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या लोकांसाठी त्यांनी एक जेवण ही ठेवलं होतं. श्री कलाम यांना भेटायला मिळेल, त्यांच्याशी हस्तांदोलन तरी करता येईल, त्यांच्या सोबत फोटो काढता येईल म्हणून लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.

 

 भारताच्या पंतप्रधानांची मॉरिशस भेट -

              आम्ही जाऊन दोन महिने होत आले होते. नवीन देशात आम्ही बर्यापैकी रुळलोही. आमचा मुलगा कणाद नोकरी आणि GRE ची तयारी करत भारतातच राहत होता. आम्ही जरा स्थिरस्थावर झाल्यावर आम्हाला एकमेकांना भेटायची ओढही लागली होती आणि मॉरिशस म्हटल्यावर त्याचे दोन मित्रही त्याच्यासोबत येणार होते. त्यांनी फेब्रुवारीची तिकिटंही काढून ठेवली होती. आणि त्याचवेळेस तेंव्हाचे भारताचे माननीय पंतप्रधान मनमोहनसिंग यांची मॉरिशस भेट ठरली. दोघांच्या तारखाही जुळत होत्या. कणाद आला की दुसर्याच दिवशी पंतप्रधान येणार होते. प्रवीण PM च्या सुरक्षेचे मुख्य असल्याने त्याला सतत पंतप्रधानांसोबत रहायचं होतं. येथे बाहेरदेशीच्या प्रमुखांची व्यवस्था राजभवनात होता हॉटेल्समधेच केली जाते. येथे त्यांच्यासाठी खास असे शासकीय सर्किटहाऊस ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्चही वाचतो. भारताच्या पंतप्रधानाची भेट मॉरिशसच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. भारताकडून अनेक सुविधा ह्या छोट्या देशाला मिळत. भारताने इंदिरा गांधी कल्चरल सेंटर, राजीव गांधी सायन्स सेंटर, विवेकानंद कन्हेंन्शन  हॉल अशा अनेक उत्तमोत्तम संस्था मॉरिशसला बांधूनही दिल्या आहेत. मॉरिशस मात्र या सर्व सुविधा मिळुनही नाखूशच दिसत असे. त्याचा ओढा चीन, फ्रांस, इंग्लंड या देशांकडेच जास्त दिसे. याच्याशीच सलोखा साधायचा त्यांचा प्रयत्न आहे असे वाटे. अर्थात हे त्या त्या वेळच्या शासनप्रमुखावर अवलंबून असे. हे सर्व असले तरी भारतातील उपचार हा अत्यंत योग्य आणि वाजवी दरात होतो हे लक्षात घेऊन मॉरिशसच्या नागरीकांना आजारी पडल्यास भारतात उपचारांसाठी येता येत असे. रुग्णाबरोबर एक डॉक्टर आणि त्याच्या सोबत एक नातेवाईक यांचा खर्च मॉरिशस सरकार देते.  मॉरिशसच्या विद्यार्थ्यांसाठी भारतात अनेक स्कॉलरशिप्सही ठेवलेल्या आहेत.

                 कणादला जेमतेम एअरपोर्टहून आम्ही घेऊन आलो आणि प्रवीणने गाडी आमच्या ताब्यात देऊन टाकली. प्रवीणला पंतप्रधानांच्या सोबत राहणं आवश्यक होतं. कणादला येतांना भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्स आणायला सांगितलं होतं. हवं तिथे फिरा पण सांभाळुन असं आधीच सांगून ठेवलं होतं. प्रवीण त्याचा बाड बिस्तरा घेऊन निघून गेला. पुढचे दोन चार दिवस T.V.वर आम्ही पंतप्रधानांच्याच बातम्या बघत होतो.

                         कार घेऊन आम्हाला बाहेर जाता येणार होतं. कणाद  आणि त्याचे मित्र  सहा फूटाच्यावर ऊंच होते. शिवाय एकजण सरदारजी असल्याने पगडी घालून तो साडेसहा फुटीच होता. कुठेही फिरायला गेलं की सगळ्यांच्या नजरा पगडीवाल्या दोस्तामुळे आमच्यावरच खिळत. बाजारात कुठे फिरायला गेलं की सगळे धावत एकमेकांना सांगत, मनमोहनसिंगजींचे नातेवाईक बाजारात आले आहेत. सगळे आम्हाला पहायला गोळा होत. सगळ्या गोष्टींचे भाव आमच्यासाठी दुप्पट होत. शेवटी तिघजणं ह्या स्वागताला कंटाळून एका कट्ट्यावर बसायला जात असतांना एक मुलींचा घोळका येत होता. ह्या तिघांना पाहून त्या आश्चर्याने एकदम वीऽऽऽऽ!!!  (वी म्हणजे हो किंवा अश्चर्याने ओह! सुद्धा.)करून ओरडल्याच. ``फोटो काढायचा आहे का तुम्हाला आमच्याबरोबर?’’ सरदारजीने हताशपणे विचारले परत  मोठ्ठा वीऽऽऽऽऽऽऽऽ! आला. शेवटी माझ्यासारख्या कलियुगातल्या आईला आपल्या मुलांचे असे परदेशी मुलींबरोबर फोटो काढायची वेळ आली. कारण सगळ्यांनाच त्यांच्याबरोबर फोटो काढायचे असल्याने फोटोग्राफर म्हणून एकटी मीच उरत होते.

              शेवटी तिघांनीही जंगलात ट्रेकिंगला जायचं ठरवलं. येथील हिरवीगार जंगलं, ठिकठिकाणी सर्व सोयी सुविधा असल्याने आणि जंगली पशू नसल्याने काळजीचं काही कारण नाही. असा विचार मीही बोलून दाखवला. ते आल्यावर   ``कसा होता ट्रेक''? असं आम्ही  कौतुकानी विचारल तर अनपेक्षितपणे त्यांनी सांगितलं, जंगलं चांगलं आहे पण त्यात कुठेच वाघ, कोल्हा काही नाहीत. अरे जपून! पुढे साप आहे! असं म्हणायलासुद्धा जंगली प्राणी नाहीत. त्यामुळे  कुठे उत्सुकताच राहिली नाही. किमान इथे जंगली प्राणी नाहीत हे तुम्ही पहिल्यांदा सांगितलं नसतं तर बरं झालं असतं.

------------------------------------------

  I.N.S.शारदा आणि  I.N.S. दिल्ली

मॉरिशसला ज्या मान्यवरांनी भेटी दिल्या त्यात महत्त्वाच्या व्यक्तीही होत्या आणि भारतातून आलेली जहाजेही होती. आम्ही मॉरिशसला असतांना  I.N.S. शारदा आणि I.N.S. दिल्ली ह्या दोन भारतीय जहाजांनी मॉरिशसला भेटी दिल्या. दोन्ही वेळेला ह्या जहाजाच्या कॅप्टननी आयोजित केलेल्या जहाजभेटीच्या कार्यक्रमाला प्रवीण दीक्षितांना आणि त्यांच्यासोबत मलाही निमंत्रण असे. दोन्ही जहाजांना दिलेल्या भेटी माझ्यासाठी अप्रूपच होत्या.

  I.N.S.शारदा(22एप्रिल 2005) -

मॉरिशस आणि भारताचे संबंध छान मैत्रिचे आहेत. हे सलोख्याचे संबध दृढ करण्यासाठी आपल्या ह्या छोट्या मित्राला भारत सरकार उदारपणे सहाय्य करते.  भारतातून अनेक वर्षांपूर्वी आपले सख्खे बांधव, भारतीय रक्ताचे लोक मॉरिशस ला गेले हे लक्षात ठेऊन भारत सरकारने आपल्या ह्या भारतीय वंशाच्या लोकांना ʻGuardianʼ नावाचे व्यापारी जहाज भेट म्हणून दिले आहे. जशी गाडीला serviceing ची जरुरी असते, तशी जहाजालाही असते. गार्डियनलाही सर्व्हिसिंगसाठी भारतात न्यायला I.N.S.  शारदा ही नौका भारताहून मॉरिशसला आली . शारदाच्या सर्व स्टाफनी शारदा भेटीचं खास आमंत्रण श्री. दीक्षितांना पाठवलं. सर्व मॉरशन्स साठी ही ही एक पर्वणीच होती. शारदाचं येणं ही एक तिथे फारच उल्लेखनीय घटना होती. अशा प्रसंगातून भारताबद्दल बोलले गेलेले चार गोड शब्द ऐकून, जगात भारताकडेही आशेनी पहाणारे कोणी आहे हे पाहून, मनाला सुखावल्या सारख झालं. ब्रेकिंग न्यूज म्हणून टि. व्ही. वर चार  चार वेळा  शारदाचे कॅप्टन दत्ता मॉरिशन ऑफिशियल्सना, मंत्र्यांना हस्तांदोलन करतांना दाखवत होते. आपल्याकडे अमेरिकन फॉरिन मिनिस्टर अथवा इंग्लंडचा राजपुत्र यावा तशी शारदाला विविध चॅनेल्सवर मिळणारी प्रसिद्धी नक्कीच आनंददायी होती. 

आम्ही I.N.S. शारदा आणि गार्डियन ला भेट देण्यासाठी पोर्ट लुई ला निघालो. गाड्यांच्या गर्दिमुळे दिवसा हा भाग फारच गजबजलेला असतो. संध्याकाळचे पावणेसात वाजले होते. आजचा अनुभव ही वेगळाच होता. दिव्यांच्या चमचमाटात रस्तारेड कार्पेटसारखाआमच्यासमोर उलगडून ठेवला होता. चंद्रप्रकाशात डोंगरही स्वप्नवत् भासत होते. पोर्टलुईपर्यंत पोचायला इतरवेळी एक-दिडतास घेणारी गाडी चवदाव्या मिनिटाला पोर्टलुईत हजर होती.थोडं अजुन पुढे जायचं होतं - – डावीकडे पाटी होती, Docks! आज ह्या वेळी जहाज फक्त अति विशिष्ट आणि वरिष्ठ लोकांसाठीच खुलं होतं त्यामुळे वळणावळणावर दिशादर्शक दिवे किंवा खास टॉर्चेस घेऊन पोलिस ऊभे होते.गाडी पार्क केली.समोर अजस्र आकाराचं जहाज उभं होतं जहाजावरच एक प्रचंड मोठी क्रेन होती. खणखणीत तटबंदिचा जणु एक किल्लाच समोर उभा होता. त्याच्या शेजारीच दुसरं जहाज उभं होतं. त्याच्यावरची I.N.S. शारदा ही सुस्पष्ट अक्षरं नजरेत भरत होती. शारदाच्या डेकवर छानसा शामियाना घातला होता. शामियान्याच्या छताचे दिवे वाऱयावर हेलकावत होते. डेकवर जाण्यासाठी जहाजावरून धक्क्यावर लाकडाची रुंद फळी किंवा रॅम म्हणुया लावली होती. ह्या लाकडाच्या घसरगुंडीला पाय घसरू नये म्हणून थोड्या थोड्या अंतरावर  आडव्या लाकडी पट्या म्बलर्स सारख्या लावल्या होत्या. ह्या जिन्याच्या सुरवातीलाच जेटीवर  पांढऱया स्वच्छ uniform मधे दोन स्मार्ट तरुण खलाशी S.L.R. (7.62 Rifle) घेऊन स्वागतासाठी ऊभे होते. त्यांनी कडक सॅल्यूट मारला. आणि हासर्या चेहर्यानी स्वागत केलं. विशीतील त्या कोवळ्या तरुण चेहऱयांबद्दल आम्हालाही  उत्सुकता होती. डेकवरही लगबग जाणवत होती. कोणाला भेटाव? हा  प्रश्न एका छोट्या तडफदार तरुणानी सोडवला. आमचं स्वागत करत आम्हाला आत  घेऊन जातांनाही त्याच्या चेहऱयावरचा आत्मविश्वास डोळ्यातून ही चमकत होता. आंध्राच्या चित्तुरचा हा छोटा खलाशी शारदाबरोबर मॉरिशसच्या मदतीसाठी आला होता. background  ला आकाशात वीजा तळपत आणि पळत होत्या. ’मॉरिशस च्या मदतीसाठी भारताचा मदतीचा हात कायमच पुढे आहे’’. छोटा खलाशी अत्मविश्वासानी सांगत होता. ``आम्ही गार्डियनला टो करून मुंबईला घेऊन जाणार आहोत. तिला तिथे सोडून  आम्ही कोचिनला जाऊ. गाडीला जशी सर्व्हिसिंगची गरज असते तशी जहाजाला सुद्धा असते. जहाजाच्या सरव्हिसिंगला refitting म्हणतात. जहाज किती वर्ष वापरलं आहे ह्यावर त्याला refitting ला किती वेळ लागणार हे अवलंबून असतं.’’ “ पण गार्डियनला बांधून ओढत कसे नेणार''? गार्डियन तर केवढं प्रचंड आहे तो हसला. ``मॅम गार्डियन  आणि शारदाच्या बनावटीत फरक आहे. गार्डियनची बांधणी व्यापारउदिमासाठी योग्य अशी आहे तर शारदा ही लढाऊ बांधणीची आहे. मॅम, आम्ही जहाजाचा उल्लेख  she असा म्हणजे, स्त्रीलिंगी करतो. म्हणून त्यांची नावही स्त्रीलिंगीच असतात.'' शारदावर 15 ऑफिसर्स आणि प्रत्येक ऑफिसर बरोबर 10 ते 12 खलाशी असा दिडएकशे लोकांचा स्टाफ होता. प्रत्येकाबरोबर थोडं थोडं बोलतांना नवीन नवीन माहिती कळत होती.26 डिसेंबर2004 च्या त्सुनामीच्यावेळी इंडोनेशिया पासून श्रीलंकेपर्यंत भारतीय नौदलाची 45 जहाजं त्सुनामी पीडीत देशांना मदत करत होती. ’मी तेंव्हा श्रीलंकेत मदतकार्य करीत होतो“. अजुन एक चमकदार डोळ्याचा तरुण उत्तरला. वादळात जहाजाला खूप धोका असेल ना? तो म्हणाला ,- ``बंदरावर असतांना जहाजाला वादळापासून जास्तीत जास्त धोका असतो. त्याला बांधून ठेवलेल्या दोऱया तुटणं, किंवा त्या वेड्यावाकड्या होणं असं काहीही होऊ शकतं. नांगरून ठेवलेल्या जहाजाचे इंजिन बंद असल्याने त्या जहाजावर कसलाही ताबा रहात नाही. अशावेळी हे जहाज पाण्याबरोबर भरकटत कुठेही जाऊ शकतं. तर कधी कधी उथळ वाळुकिनाऱयावर चढून बसतं. त्यामुळे वादळाची सुचना मिळताच जहाज प्रथम खोल समुद्रात नेणं फार आवश्यक असतं. तरच ते सुरक्षित रहायला मदत होते. जहाजावरच्या लोकांसाठी जरी वादळातील समुद्र फारसा चांगला अनुभव नसला तरी जहाजासाठीमात्र तो  बर्यापैकी सुरक्षित असतो. वादळात सापडता वादळाच्या बाजूने जहाज घेऊन जायला लागतं. तू मॉरिशस पाहिलस का? विचारल्यावर आमच्या त्या छोट्या मित्रानी त्याच्या गळ्यातील साखळी आणि त्याला लावलेल्या किल्या दाखविल्या. ज्याच्या जवळ ह्या किल्ल्या आहेत त्याला हे जहाज सोडता येत नाही.तो अतिशय जबाबदारीने सांगत होता. प्रत्येक जहाजावर असे दोन सर्व्हिस ऑफिसर असतात. जहाजावरच्या प्रत्येक गोष्टीला त्यांना जबाबदार धरलं जातं.जहाजाला आग लागली, जहाजावरच्या लोकांमधे भांडण झाली तरी सगळी जबाबदारी त्यांची असते.

-----------------------------------------------------

 ( पुढचे प्रकरण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. ) 

 20 रॉड्रिग्ज द्वीप समुह I’lle Rodrigues  

खाली  दिलेल्या प्रकरणाच्या नंबरवर क्लिक केल्यास ते प्रकरण उघडेल

 0  1   3  4  5  6  7  8  9  10   11 

12  13  14  15  16  17  18  19  20  21.

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -